भोग आणि ईश्वर ६२
एकात्म भाव.
श्रद्धा, भक्तीचा भाव ज्यावेळी एकाच ठिकाणी स्थिर होतो. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी त्याला स्थिर होण्याची गरज उरत नाही, त्यावेळी त्या स्वरूपाला, स्थितीला, एकात्म भाव म्हणतात. मग ती मूर्ती असेल, देव ही न पाहिलेली पण जाणवणारी कल्पना असेल, किंवा गुरुतत्व असेल. तो एकात्म भाव जागृत झाला की, इतर कोणत्याही गोष्टीची, बाह्य वा अंतरातील कोणत्याही कृत्रिम प्रेरणेची गरज उरत नाही.
श्रद्धा त्या ठिकाणी स्थिर होते. त्यावेळी वा तद्नंतर मनाला, जाणिवांना, नामाला स्थिरता येते. म्हणून एक स्थान, एक नाम, एक श्रद्धेचं मानक जरुरी असतं. त्याठिकाणी मन स्थिर करून मनातील सर्व शंका कुशंका दूर करून, श्रद्धेला, भक्तीच्या जाणिवेला स्थिरता द्यावी, जेणेकरून मनात उमटणाऱ्या भक्तीरुप नामतरंगांना शक्ती, चेतना व योग्य दिशा मिळेल.
या एकात्म भावाचा परिणाम नामाच्या नादात, उच्चारात हरवून जाण्यात, त्या लहरींचा आनंद घेण्यात होतो. एकदा एकात्म भाव साधला की पुढे सर्व सुलभ होत जातं. त्यात एक प्रकारचा आनंद आहे. तो मिळवण्यासाठी हा एकात्म भाव साधा बुद्धी मन श्रद्धा एका ठिकाणी स्थिर करून नामाचा अलौकिक आनंद घ्या. हे करताना फक्त आणि फक्त नामासाठी नाम घ्या.
याचं कारण असं की कोणताही इतर भाव वा हेतू मनात ठेवून अथवा कोणत्याही कारणाने नाम घेतलं तर त्या नामाच्या तरंगांना मनाची पूर्ण शक्ती व इच्छेचं पूर्ण बळ मिळत नाही. त्यामुळे इच्छित हेतू साध्य न झाल्यामुळे मनात नामाविषयी साशंकता येऊ शकते, जे आपल्याच प्रगतीला घातक आहे. म्हणून हेतू, उद्देश वा शंका दोन्हीपैकी काहीही मनात ठेवून नाम घेऊ नये.
नामाची शक्ती अपूर्व आहे. नाम हे स्वयंसिद्ध आहे. परमेश्वराच्या मानवी देहातील अवतार समाप्ती नंतर किंवा सद्गुरुंचं मानवी देहातील अस्तित्व नाहीसं झाल्यानंतरसुद्धा आत्मरूपातील त्यांच्या शक्तीचं अस्तित्व नामरूपात शिल्लक आहे. म्हणून नाम हे आदि आणि अंत यांच्या पार आहे. त्याला कोणतीही गोष्ट अपवित्र करू शकत नाही. कारण देहरुप अस्तित्व संपल्यानंतर नाम हे निर्गुण आणि निराकार स्वरूप होतं. निर्गुण आणि निराकार असं हे नाम सर्व विकार, षड्रिपु, वास, स्वाद, गंध, या सर्वांच्या पलीकडे जातं.
त्याच्या तेजाला कसलाही मानवनिर्मित वा पंचमहाभूतरुप वस्तू अशुद्धता आणू शकत नाही. त्या सर्वांच्या पलीकडे नाम आणि नामाची शक्ती आहे. म्हणून नामाच्या त्या शक्तीचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच नामासाठी नाम घ्या. हेतूरहीत, शुद्ध भावाने मन शून्यात नेऊन नाम घ्या. मन शून्यात नेणं म्हणजे एकात्म भावाने, फक्त नाम मनात योजून नाम घ्या.
नामामागे नामाची देवता आणि सद्गुरू यांचं पाठबळ असतं.
सदुगुरूंना सर्वात प्रिय काय असेल तर साधकांनी, भक्तांनी नाम घेणं. म्हणून सद्गुरू आनंद लक्षात आणून नाम घ्या.
सद्गुरू प्रेरणादायी आहेत. त्यांना आनंद देणारे साधक सर्वश्रेष्ठ असतात आणि सदुगुरूंना नाम प्रिय असतं.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment