भोग आणि ईश्वर ४६
काल आपण योगभ्रष्ट म्हणून जन्माला आलेल्या लोकां बद्दल चर्चा केली. अश्या प्रकारच्या व्यक्तींना आपण ओळखत होतो पण आपल्याला त्याची जाण नसल्यामुळे आपण कदाचित त्यांची टिंगल, हेटाळणी वा टीका तरी केली असेल. पण त्यामागचं कारण उमगल्यामुळे इथून पुढे नक्कीच आपण त्यांच्याबद्दल योग्य तो विचार करू.
आज अजून एका वेगळ्या गोष्टीचा विचार करूया. आपण कधी विचार केला आहे का की अमुक एक व्यक्ती आपली नातेवाईक म्हणून का जन्माला आली, किंवा हेच आई वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी, इतर आप्त स्वकीय, सगेसोयरे, ओळखीचे हेच का आहेत. एखादी लांबची व्यक्ती एखाद्या अनोळखी गावामध्ये जाते आणि तिथे एखाद्या व्यक्तीशी दृढ संबंध जुळून येतात, ती मैत्री असेल वा अगदी प्रेम पण असेल.
किंवा एखादी अनोळखी व्यक्ती अनपेक्षितपणे आपल्याला काही संबंध नसताना मदत करते, अगदी निरपेक्ष भावनेने. कदाचित त्या व्यक्तीचा तो स्वभाव देखील नसेल, पण आपल्यासाठी ती व्यक्ती वाट वाकडी करून पदरमोड करून मदत करते. याचा कुठेतरी आपल्या गतजन्मातील ऋणाशी वा ऋणानुबंधाशी संबंध असतो. अन्यथा इतक्या आप्तपणे त्याला मदत करायची भावना होणार नाही. जर ती त्या व्यक्तीची नित्य वागणूक असेल तरीही इतक्या प्रचंड पसाऱ्यात आपण त्याच्या संपर्कात यावं, यात कुठेतरी काही धागा नक्कीच असतो.
मला माझा स्वतःचा एक प्रसंग आठवतो. साधारण १९९५ ९६ मधली गोष्ट असावी. मी, आई बाबा, दोन काकू आणि चुलतभाऊ असे चुलतभावाच्या गाडीने अंबेजोगाईला चाललो होतो, बहुतेक उत्सव असेल. त्याचवेळी एक एस टी सुद्धा डोंबिवलीवरून निघणार होती. पण त्यामध्ये जागा नव्हती म्हणून काकू व आई अश्या तीनही स्त्रिया आमच्याबरोबर येत होत्या, अन्यथा त्यांना बसमध्ये बसवून आम्ही तीन जण गाडीने जाणार होतो.
बस आणि आम्ही साधारण एकाच वेळी, रात्री साडेआठ नऊला, निघालो. उत्सव असल्यामुळे बरेच ओळखीचे बसमध्ये होते, म्हणून एकत्र जाण्याचा बेत केला, तेवढीच साथसोबत. आम्ही बसच्या पुढे मुद्दाम होतो म्हणजे काही समस्या आलीच तर ते असतील मागे, म्हणून.
माळशेज घाटात आमची कार नेमकी बंद पडली, वेळ साधारण रात्रीचे साडेबारा एक असतील. मागच्या बसने प्रसंग पाहून आई व दोन्ही काकू अश्या स्त्रियांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी स्वतः आळे फाट्याला उतरून एखादा मेकॅनिक घेऊन येण्याचं ठरलं. म्हणून मी बसमध्ये बसून निघालो आणि आळेफाट्याला उतरलो. मागे सुनसान घाटात राहिले बाबा आणि चुलतभाऊ. त्यात महिना डिसेंबर जानेवारी होता आणि त्यावेळची थंडी.
साधारण अडीच वाजले असतील. आळेफाट्याला फार नाही पण बऱ्यापैकी जाग होती. मी एका चहाच्या टपरिचा आडोसा घेऊन बसलो. तिथे चहासाठी जरा वर्दळ होती. साधारण पहाटे साडेतीनच्या सुमारास, म्हणजे ब्रह्ममुहूर्ती माझ्या जवळ एक तरुण मुलगा आला. माझ्यापेक्षा काही वर्षे लहान होता.
चहा पिता पिता चौकशी करताना विषय निघाला, त्यावेळी तो म्हणाला सकाळी आठ साडेआठच्या आधी काही मिळणार नाही. पण मी तुम्हाला मेकॅनिक मिळवून देईन. मी वेळ जाण्यासाठी हो म्हटलं. हा पठ्ठ्या सोबत थांबला. त्याने त्याचं नाव सलीम सांगितलं. तो म्हणाला मीच आलो असतो, पण मला एका निकाहला जायचय.
साधारण सकाळी सात साडेसातला त्याचे काही जातभाई त्याला शोधत जीप घेऊन आले, बहुतेक तो त्याचा नेहमीचा परिसर असावा. ते त्या निकाहलाच जात होते आणि याला यायचा आग्रह करत होते. मी थोडा धास्तावलेलो होतो. हा त्यांना म्हणाला की, तुम्ही पुढे जा मी यांचं काम झालं की येतो नऊच्या आत.
साधारण सव्वाआठला त्याचा तो मित्र आला. त्याने माझी ओळख करून दिली दोस्त आहे असं सांगून त्याला माझ्या सोबत घाटात जाऊन गाडी बघायला सांगितलं.मी त्याला धन्यवाद देऊन विचारलं की तुझ्या थांबण्याचं कारण काय. आपण तर ओळखत पण नव्हतो. त्यावेळी त्याने दिलेलं उत्तर मला अजूनही आठवतंय. ते उत्तर आजच्या विषयावर प्रकाश टाकेल.
तो म्हणाला का ते का ते माहीत नाही, पण तुम्हाला पाहिलं आणि वाटलं की तुमची मदत करावी, बाकी काहीही कारण नाही. मी मात्र शेवटपर्यंत त्याच्या हेतू बद्दल शंका घेत धास्तीत होतो. आता या जन्मी ती पहिली आणि शेवटची भेट. पण तरीही त्याला वाटलं, याचं कारण कुठेतरी मागच्या एखाद्या जन्माचे ऋण फेडून गेला असाच निघतो. आपणसुद्धा अश्या प्रसंगातून गेला असाल तर आठवा आणि जुळवा संदर्भ सद्य जन्माशी. जर नाही जुळला संबंध वा नाही सापडला संदर्भ तर नक्क्की एखादा गत जन्मीचा ऋणी ऋण फेडून गेला असाच अर्थ निघू शकतो.
यावर अजून प्रकाश टाकू पुढील भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment