Skip to main content

गीता संदेश १

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥
( श्रीमद्भगवद्गीता ; अध्याय – ९ , श्लोक – २२)

अन्य या शब्दाचा अर्थ  दुसरा आणि अनन्य शब्दाचा अर्थ एकनिष्ठ एकाश्रयी  अर्थात श्लोकाच्या पहिल्या ओळीचा अर्थ, जे अन्य कोणत्याही गोष्टीची चिंता न करता, मात्र माझी उपासना करतात,  अर्थात ज्यांना इतर कोणत्याही चिंतेचा वा चिंतनाचा अथवा काळजीचा विचार नसतो आणि जे अनन्यभावाने म्हणजे एकनिष्ठपणे एकाश्रयी  होऊन फक्त आणि फक्त माझाच विचार करतात व माझीच भक्ती करतात त्या भक्तांबद्दल सांगताना भगवंत म्काय हणतात, ते त्यांनी श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये मांडलेला आहे

दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत सांगतात की अशा, माझ्याशीच संलग्न असलेल्या किंवा जोडल्या गेलेल्या किंवा नित्य आणि निरंतर माझ्याशी माझ्याबरोबर असलेल्या वा माझ्याशी एकनिष्ठ असलेल्या  भक्तांचं योग आणि क्षेम हे मी सांभाळतो किंवा त्यांचं वहन मी करतो.  यामध्ये मुख्यत दोन शब्द आहेत योग आणि क्षेम. योग या शब्दाचा अर्थ अप्राप्य ते प्राप्त करणे आणि क्षेम या शब्दाचा अर्थ प्राप्त केलेलं राखणं किंवा त्याचं रक्षण करणे.

म्हणजेच याचा अर्थ असा होतो कि जे भक्त प्रभुशी, ईश्वराशी निष्ठेने वा निष्ठापूर्वक बद्ध आहेत आणि जे आपल्या निर्वाहाची चिंता किंवा आपलं क्षेमकुशल याची चिंता करत नाहीत, त्यांचं क्षेम आणि कुशल हे भगवंत बघतात.  त्यातून असा अर्थ निघू शकतो का की त्यांनी काहीही केलं नाही तरी त्याची चिंता भगवंत करतील,  तर असा अर्थ ध्वनित होणार नाही, याची काळजी भगवंतांनी पहिल्या श्लोकात घेतलेली आहे.

कशी तर जे अनन्य होऊन माझी उपासना करतात कोणतीही चिंता न करता अर्थात यामध्ये फक्त चिंतन न करणे चिंता न करणे इतकाच अपेक्षित आहे. पण कर्माबद्दल प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये स्पष्ट केला आहे की कर्म रहित प्राणी असू शकत नाही. मग याचा अर्थ कसा घ्यायचा, तर याचा अर्थ असा घ्यायचा की, इतर कोणत्याही गोष्टीची चिंता न करता आपल्या साधनेत  राहून नित्य भगवंताची उपासना करतात त्यांची चिंता भगवंत वाहतात.

आता हे अध्यात्मिक पातळीवरचं झालं व्यावहारिक पातळीवर हा श्लोक मोठा संदेश देऊन जातो किंबहुना मला तर लॉज ऑफ अट्रॅक्शन या सिद्धांताचं मूळ या श्लोकात आहे असंच वाटतं. म्हणजे जे आपल्या सर्वोच्च लक्ष्याच्या प्राप्तीसाठी नित्य सातत्य ठेवून, सर्वोच्च क्षमतेने, दृढतेने, निष्ठापूर्वक आपल्या लक्षाचा पाठलाग करतात, त्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करतात, त्यांना त्यांच्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी चिंता करायचं कारण नाही,  कारण त्यांची ती चिंता मी वाहतो

याच न्यायाने किंवा सूत्राने किंवा तर्काने,  असं म्हणता येईल की कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्च स्थान हे परमेश्वरा समान मानून, त्यासाठी जो कार्यरत राहतो आणि त्या कार्यात जो आपले सर्वोच्च श्रम आणि सर्वोच्च बुद्धिमत्ता देतो, त्याला त्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी कोणतीही चिंता करायचं कारण नाही. का तर अशा जिवाच्या लक्षाची किंवा लक्ष्याच्या प्राप्तीची चिंता, भगवंत स्वतः वाहतात. कदाचित हा खूप मोठा संदेश भगवंतांनी सर्वच क्षेत्रात कार्य करणाऱ्या या लोकांसाठी देऊन ठेवला आहे. 

मला इथे इंग्लिश मध्ये एक म्हण आठवते not failure but low aims is a crime. म्हणजेच अपयश नाही तर नीचतम लक्ष किंवा कमी प्रतीचे लक्ष किंवा ध्येय ठेवणं हा गुन्हा आहे.  अर्थात सर्वोच्च लक्ष हे परमेश्वराच्या सर्वोच्च शक्ती सम आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी ते पूर्ण क्षमतेने कार्य करतात, त्यांना त्यांच्या यशाची चिंता करण्याचं कोणतेही कारण नाही,  ही ग्वाही भगवंतांनी या श्लोकात दिलेली आहे.  म्हणजेच हा श्लोक जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी भगवंतांचे वचन आहे, असं मला स्वतःला वाटतं.

©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
०३/०१/२०२१
१३:४१

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...