भोग आणि ईश्वर ४१
जागेपणी माणूस प्रत्येक क्षण काही ना काहीतरी करत असतोच. त्या प्रत्येक गोष्टी साठवून ठेवण्याचं काम सुप्तमन करत असतं. यासाठी मेंदूचा वा त्यातील पेशींचा वापर केला जातो. हे म्हणजे साधारण संगणकाच्या सॉफ्टवेअर व हार्डवेअर सारखं आहे. म्हणजे सॉफ्टवेअर अर्थात प्रोग्रॅम काय करायचं ते ठरवून करून घेतो, केलेली कामं संगणकातील हार्डडिस्क मध्ये साठवतात त्याप्रमाणे अर्थात मेंदूतील पेशींमध्ये साठवतो.
हा प्रोग्रॅम आपण दिलेल्या कमांड अर्थात आज्ञेनुसार कार्य करतो व त्या त्यावेळी ती ती फाईल समोर उघडून दाखवतो व आपण ज्याप्रमाणे त्या फाईल मध्ये पुढचं काम वा बदल करू त्याप्रमाणे ती फाईल पुन्हा साठवली जाते. ह्या सर्व प्रक्रिया मेंदूत होतात आणि त्यासाठी मेंदू चेतासंस्था, मज्जासंस्था, मज्जासंस्थेचं पूर्ण जाळं यासाठी कार्य करतं. यासाठी मन हे सॉफ्टवेअरसारखं काम करतं. आज्ञाप्रणाली मेंदूत तयार होते तरी त्याला कल्पनेने फुलवणं, प्रत्येक गोष्टीत कृतीत लागणारा उत्साह, ऊर्जा देण्याचं काम मन करतं.
खरतर सुप्तमानाची बरीच गुपितं अजून विज्ञानाला माहीत व्हायची आहेत. पण एक नक्की की जे अंतर्यामी ठामपणे कोरलं वा नोंदलं जातं ते कुठेतरी सुप्तमानात लिहिलं जात असावं आणि सुप्तमानाचा संबंध आत्म्याशी असावा. म्हणूनच आपल्याकडे एखादी गोष्ट बिंबवणं म्हणत असत ते याच अर्थाने असेल. म्हणजे जी गोष्ट जागृत मनात नोंदली जाते, ती काळाच्या व्यापात मागे पडू शकते वा विसरली जाऊ शकते. परंतु जी गोष्ट सुप्तमानाच्या तळात नोंदली जाते ती अर्थातच माणूस सहसा विसरू शकत नाही आणि अर्धजागृत मन त्या गोष्टी योग्य वेळी समोर आणून त्यानुसार कार्य करवून घेतं.
म्हणजे यातून एक गोष्ट समजली की जागृतमन, अर्धजागृत मन आणि सुप्तमन हे तिन्ही एकाच पातळीवर वा विचाराने कार्य करत असतील आणि मेंदुसह देहाची त्याला योग्य साथ असेल तर माणूस अशक्य भासणारी कार्य घडवून आणू शकतो. हे सर्व जर एकाच ईश्वरी कार्यासाठी वा साधनेसाठी एक होऊन कार्य करतात किंवा एकसमान विचार व कृती करतात त्यावेळी ध्यानधारणा या गोष्टींचा प्रत्यय येतो.
ध्यान धारणा हे, तिन्ही मनं, देह आणि त्यायोगे अंतरात्मा एकाच पातळीवर आणून त्यांना त्यास्थितीत शांतपणे, सहजवस्थेत निर्विकार, शून्यवत ठेवणं आणि त्यायोगे त्यांना उच्च भावावस्थेत नेऊन अत्यंत दुर्मिळ अश्या अलौकिक शांततेचा अनुभव घेणं. खरतर अशी अवस्था खूप वेळा आपण मध्ये मध्ये कधीतरी अनुभवतो, थोड्या प्रमाणात पूर्णतः नाही. ज्यावेळी कोणताही विचार न करता, आपण निद्रावस्था नाही, पण जागृतावस्थेत, तरीही शांततेचा अनुभव घेतो. ज्यावेळी काही शीणवटा घालवण्यासाठी फक्त डोळे मिटून नुसते बसून काही मिनिटं घालवून मनाला , देहाला शांतता देऊन एकप्रकारे योग साधतो.
हे नकळतपणे करतो काही काळ, चुकून कधीतरीच. पण हेच जाणीवपूर्वक करायचं असेल तर सहजावस्थेत बसून, शांतपणे, डोळे मिटून काहीही विचार न करण्याचं ठरवून, फक्त मनातल्या मनात नाम घेत, अलौकिक शांततेचा विलक्षण असा अनुभव घेऊ शकतो. सर्व शरीरासह मनाला मेंदूला यातून गरजेचा आराम, शांतता मिळतेच, पण नामाच्या लहरींवर, मन अंतरात आत जाण्याचा प्रयत्न करतं. मनाला या माध्यमातून वा कृतीतून आत नेऊन आत डोकावण्याचा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. पण अर्थातच वेळ काढून. यानंतर मिळणारा आनंद हा अद्वितीय असतो.
घेऊन बघा या छोट्याश्या कृतीचा अनुभव, जिथे फक्त तुम्ही, मन व आत्मरूपाने साक्षी असाल, देह शांत झालेला असेल, रक्तप्रवाह धिमा असेल, मन निराकार व निर्विकार असेल आत्मा मनातल्या मनात शांतपणे होत असलेल्या नामाचा व नामाच्या लहरींचा अनुभव घेत असेल आणि तोच आत्मा साक्षीत्वाने काही आनंदछटा दाखवून वेगळा अनुभव देईल.
करून बघा आणि सांगा.
यातील अजून काही विचार बघूया पुढील भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment