भोग आणि ईश्वर ४२
देह आणि मन शांत करून त्याद्वारे अंतरात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करण्यासाठी महत्वाचा टप्पा म्हणजे चित्त स्थिर राखता येणं. चित्ताची स्थिरता हा अनुभव छोट्या प्रमाणात वा काही क्षण प्रत्येकजण कधीतरी घेतो. बरेचवेळा आपण एखाद्या विचारात काही काळ गुंग होऊन जातो, अक्षरशः त्या विचारात हरवून जातो.
खूपदा विचार थांबतो आणि आपण त्याच भावावस्थेत स्थिर होतो, अगदी स्टेचू या खेळासारखे लॉक होतो. ही अवस्था काही क्षणांचीच असते. पण आठवून पहा त्यावेळी वा लगेचच वेगळाच अनुभव मनाला व आपल्याला येतो.
कधीतरी एखादा विचार मती आणि मन गुंगवून टाकतो, कधीतरी असं होतं. यात मुख्य गोष्ट साध्य होते ती चित्ताची स्थिरता. त्यावेळी देह आपली अवस्था, मन आपले भाव विसरून जातं. मनातले इतर विचार थांबतात आणि मन त्या एकाच विचाराचा धागा पकडून स्तब्ध होतं. याचा अनुभव चुकून येतो, तोच मुद्दामहून घेऊन बघायला हरकत नाही. फक्त क्षणिक होणारी ही गोष्ट एक सूत्र म्हणून धरून मुद्दाम साध्य करायला हरकत नाही.
आता त्यासाठी, सूत्र म्हणून काहीतरी मुद्दा वा गोष्ट मनात धरण्यापेक्षा, एक नाम मनात योजून, त्याच्या मागे मनाला नेऊन, त्या नामावर मन स्थिर करून, काही काळ डोळे मिटून, फक्त आपण व नाम या दोन गोष्टी जगात अस्तित्वात आहेत असं समजून, सुरवातीला काही क्षण याच स्थितीत राहून, पुन्हा मूळ स्थितीला येण्याचा प्रयत्न करावा. नन्तर सातत्याने प्रयत्न करून काही क्षणांची ही स्थिती प्रयत्नपूर्वक वाढवत न्यायला हरकत नाही.
यायोगे नाम आणि ते घेत असताना चित्ताची स्थिरता आपोआप साध्य होईल. ही चित्ताची स्थिरता साधताना आपोआप दीर्घकाळ नाम घेण्याचा सराव होत राहील आणि अश्या चित्ताच्या वा मनाच्या स्थिरतेमुळे मिळणाऱ्या शांततेत विलक्षण आनंद सामावलेला आहे, हे जाणवेल. अश्या स्थितीत मन जितकं शांत होईल तितकी मनाची सुदृढता वाढत जाईल आणि तितकाच त्याचा सकारात्मक परिणाम शरीरावर देखील होत जाईल.
मनाला जितकं स्थिर ठेवाल, तितकी त्याची शक्ती व ऊर्जा सकारात्मक कार्याला वळवता येते. कारण आपण पाहिलं आहेच की मनातील इच्छांचा आणि त्या इच्छाशक्तीचा परिणाम आपण करत असणाऱ्या कार्यात आपल्याला दिसून येतो.
त्याचप्रमाणे त्याचा प्रयत्नपूर्वक वापर आपल्या मनातील इच्छा कार्यान्वित करण्यासाठी करता येऊ शकतो. विशेषतः ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या घडवून आणण्यासाठी याचा उपयोग करता येतो. यात इच्छेच्या मागे प्रयत्नाने मनाची पूर्ण शक्ती लावून त्याद्वारे आपल्या देहाच्या कक्षेबाहेर असलेल्या गोष्टी नियंत्रित होऊ शकतात. अर्थात ही खूप पुढील गोष्ट आहे. पण मनाच्या शक्तीने काही अचाट गोष्टी घडू शकतात हे नक्की.
याचं शास्त्र असं आहे की, मनातील इच्छांच्या तरंगलहरी या, त्या इच्छित कार्याच्या पूर्ततेसाठी कार्य करू लागतात. त्यामुळे त्या जितक्या बळकट, तितकी त्यांची कार्यक्षमता प्रबळ. म्हणून प्रबळ इच्छाशक्ती ही कार्यक्षमतेने आपलं काम करते. म्हणून आपण नेहमी म्हणतो की चांगलं बोला, चांगल्या इच्छा धरा. कारण एखादी इच्छा मनात दृढ झाली तर त्याचे तरंग हे संपूर्ण वातावरण भारून टाकतात आणि त्या इच्छेचा उचित परिणाम दिसू शकतो.
अर्थात हे सर्व चित्त स्थिर ठेवून, त्याद्वारे मनाला वा मनातील इच्छांना कार्यान्वित करण्याने होऊ शकते. आपल्या दृष्टीने याचा उपयोग नाम आणि नामाचे सकारात्मक परिणाम साधण्यासाठी होऊ शकतो. म्हणून स्थिर चित्त करण्याचा प्रयत्न करून, त्या स्थितीत नाम घेण्याचा संकल्प करा व करून पहा, नक्की जमेल.
बघूया पुढील भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment