भोग आणि ईश्वर ४७
काल आपण एक प्रातिनिधिक अनुभव वाचला. प्रत्येकाला आयुष्यात असा अनुभव आला असेल वा असे अनुभव असतील. फक्त आपण त्यामागचं तत्व वा कारणमीमांसा फार विचारात घेत नाही. पण आज आपण त्याची दुसरी बाजू बघूया.
एक विचार करा की त्या त्या प्रसंगात आपल्याला तीच व्यक्ती का भेटावी, एवढ्या अफाट जगव्यापातून. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या व्यक्तीचेसुद्धा काही ऋण शिल्लक असतात, जे त्याचं कर्मफल त्याच्याकडून योग्यवेळी फेडून घेत असतं. आता हे ऋण कोणाचंही असेल आणि कोणा कडूनही फेडून घेतलं जातं का ते बघूया.
तर माझ्या मते तसं नसावं. कारण आपल्या बारीकसारीक कर्मांचा योग्य तो हिशोब आणि ताळेबंद ठेवणारा विधाता किंवा विधात्याची कर्मफलव्यवस्था नक्कीच याचासुद्धा अचूक हिशोब ठेवतच असणार. म्हणजेच जर ती व्यक्ती काही ऋण फेडण्यासाठी बद्ध असेल तर ज्या व्यक्तीचे हे ऋण आहेत, तीच व्यक्ती समोर येईपर्यंत त्याला हे ऋण फेडता येणं शक्य नाही.
आपणसुद्धा व्यवसायात वा नोकरीत हिशोब ठेवताना क्ष व्यक्तीचे वा कंपनीचे ऋण वा येणं असेल तर ते त्यांच्या नावावरच मांडतो आणि त्यांच्याकडून ते येईपर्यंत ते येणं तसंच दाखवतो, अनेक आर्थिक वर्षांपर्यंत, प्रत्येक ताळे बंदात. जर, मानवनिर्मित हिशोबव्यवस्था इतकी शास्त्रशुद्ध आहे, तर ईश्वरनिर्मित व्यवस्थादेखील तितकीच चोख किंबहुना त्याहून चोख असली पाहिजेच. म्हणजेच तिचे काळवेळ याचे गणितदेखील अचूक असलेच पाहिजे. काळवेळ यावर नन्तर चर्चा करू.
म्हणजेच जी व्यक्ती आपल्याला अश्या कठीण प्रसंगात मदत करते, त्या व्यक्तीचे व आपले, काहीतरी ऋण शिल्लक असतीलच वा असलेच पाहिजेत. फक्त त्या हिशोबाचं पान वा वहीखातं आपल्याकडे नाही इतकंच. म्हणून अश्या प्रसंगात आपल्याला मदत करणारी व्यक्ती सहसा नन्तर भेटत नाही. कारण त्या व्यक्तीचं कर्म वा कर्मफलहिशोब पूर्ण झालेला असतो किंवा असणार.
याच तत्वाला आता थोडं व्यापक स्वरूपात पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, कुठेनाकुठेतरी, आपल्या गतजन्मातील कर्माशी निगडित असते किंवा असलीच पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्रास, आनंद, दुःख, सकारात्मकता नकारात्मकता वा छोटे छोटे सर्व भावानुभव देणारी प्रत्येक व्यक्ती कुठंतरी तिचेही ऋण फेडत असणार.
याचा अजून थोडा खोलात जाऊन विचार केला तर जाणवेल की आपल्या लांबच्या वा जवळात जवळच्या नातेसंबंध वा मित्रसंबंधातील व्यक्तीसुद्धा दैवयोगाने न भेटता कुठेतरी आधीचे ऋण व ऋणानुबंध असल्याशिवाय भेटत नाहीत. म्हणजे आपले आई वडील, भाऊबहिण, पती वा पत्नी, मुलं मित्रसंबंध, अगदी शत्रूसुद्धा कुठेतरी आपल्याच गतजन्मातील संबंधातील असतात वा असूच शकतात, अन्यथा कुठेतरी कोणत्याही दूरच्या प्रदेशातील दोन जण पतीपत्नीच्या दृढ व कायमस्वरूपी नात्यात बांधले जात नाहीत.
हा विषय खूप व्यापक आणि मोठा असल्यामुळे आणि याचे अनेक कंगोरे अजून बघायचे असल्यामुळे उद्यासुद्धा यावर अजून थोडं मोठं भिंग लावून खोलात शिरून चर्चा करूया. भेटूया उद्याच्या भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment