Skip to main content

भोग आणि ईश्वर ३९

भोग आणि ईश्वर  ३९
 
 विश्वनियंत्याच्या मनातील दया आणि त्याचा  कर्मावरचा गाढा विश्वास कसा दृढ आहे आणि त्यासाठी तो काहीही कसा करू शकतो याचा जरा विचार करूया. जरा विचार करा हाच ईश्वर गजेन्द्राच्या सुटकेसाठी स्वतः धावून येतो, भक्त प्रल्हादाला सर्व आपत्तीतून सोडवतो, पण स्वतः रामजन्मांत चौदा वर्ष वनवास भोगतो, महालात आयुष्य गेल्यानंतर वल्कलं नेसून मिळेल ते कंदमुळं खाऊन चौदा वर्षं काढतो, 

आपल्या अनेक अत्यंत लाडक्या भक्तांसाठी हाकेसारशी धावून येतो, भक्तसंकटात असताना जमेल त्या मार्गाने मदत करतो वा पोचवतो. पण तोच भगवंत साक्षात पृथ्वीतलावर उपस्थित असूनसुद्धा समस्त वेदांचं, उपनिषदांचं सार तयार करून ते अर्जुनाच्या हृदयात ओतून त्याला कर्मप्रवृत्त करतो आणि युद्धासाठी तयार करतो, पण स्वतः शस्त्र उचलत नाही. 

यातून एक गोष्ट वास्तविकपणे सिद्ध होते की, त्याचा स्वतःचा संपूर्ण विश्वास कर्मावर आहे. त्याने केलेलं सहाय्य हे फक्त आणि फक्त आता जिथे श्वासच शिल्लक राहणार नाहीत, तिथे ते श्वास जगवायला केलेलं होतं आणि असेल. अन्यथा श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय सखा असलेला अर्जुन आणि पांडव तेरा वर्षांचा वनवास व अज्ञातवास उपभोगत असताना त्यांना सहाय्य करत नाही, तर त्यांच्या त्या वनवासाचा अनुभव त्यांना स्वतःला घ्यायला लावतो. 

किती विलक्षण आहे. याला कारण पण आहे. आधीच्या रामजन्मांत स्वतःची काहीही चूक वा प्रमाद नसताना चौदा वर्ष वनवास स्वतः भोगून दाखवलेला आहे. त्यामुळे पांडवांनी जर स्वतःच्या चुकीसाठी प्रायश्चित्त म्हणून वा शिक्षा म्हणून वनवास भोगला तर काहीच तर्काविरुद्ध नाही हे तो आपल्यासाठी दाखवून देतो.  

म्हणजेच जिथे सहाय्याची जरूर आहे, तिथे हा भगवंत क्षणमात्र विचार न करता धावून येईल. भक्तरक्षणार्थ आपलं ब्रीद राखण्यासाठी प्रसंगी भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन यांना त्यांच्याच कर्मबंधनात अडकवून संपवेल, जयद्रथाला मारण्यासाठी प्रसंगी सूर्याची साथ घेऊन संभ्रम निर्माण करेल पण कर्माच्या बाहेर कोणालाही जाऊ देणार नाही. 

युद्धनीती , क्षत्रियधर्म यांचं ज्ञान पाजून अर्जुनाला हरप्रकारे प्रयत्न करून युद्धाला तयार करेल, पण एकदाही असं म्हणणार नाही की तुझी लढाई मी लढेन. उलट तुझी लढाई तुलाच लढायची आहे हे समजावून सांगण्यासाठी  कर्मयोग , ज्ञानयोग आणि भक्तियोग सांगून जीवनाचं सर्वोच्च ज्ञान प्रदान करेल, त्यासाठी युद्ध कर हे मनावर बिंबवेल. का तर ते तुझं कर्म आहे, कर्तव्य आहे आणि तेवढंच तुझ्या हातात आहे. ते तुलाच करायचं आहे आणि करावं लागेलच. 

मला असं वाटतं की अर्जुनाला पुढे करून समस्त जगतासाठी एक गूढ , गुह्य आणि गहन ज्ञान सहजी सोप्प करून सांगण्याचा प्रसंग भगवंतांनी पूर्ण विचारांती योजला आणि अर्जुनविषाद हा घडला नाही तर घडवला गेला. अन्यथा इतका ज्ञानी, भगवंताच्या हृदयात स्थान प्राप्त असलेला सखा, शूरवीर, क्षत्रिय व क्षात्रधर्म जाणणारा असा युद्ध सुरू होण्याच्या क्षणी गलितगात्र विषादग्रस्त झाला नसता. 

कारण महाभारत युद्धाचा काळ हा द्वापारयुगाचा अंतकाळ होता. भगवंताचा अवतार, द्वापारयुग संपताना पांडवांच्या माध्यमातून पृथ्वीवरील त्याकाळचे सर्व पापी संहारून पृथ्वी पुनः पापीमुक्त करून कलियुगाच्या सुरवातीला तरी पापभार हलका करणं, हा उद्देश साध्य करण्यासाठी होता. 

मला असं वाटतं की जे अर्जुनाला सांगितलं ते त्रिवार सत्य आपल्यासाठीच आहे. प्रत्येक निर्णयात, कर्मात, कर्तव्यात ते सत्य, ते ज्ञान, ते तत्व आपला आधार असायला हवं. ते म्हणजे फक्त कर्म आपल्या हातात आहे आणि फल काय येईल हे न पाहता व न अपेक्षित करता निष्काम कर्म करत जायचं. पण  हे शक्य नाही कारण आपण भावनेत अडकलेले व भावनेचा पसारा मांडलेले सर्वसामान्य जन आहोत. यावरही गीतेतच भगवंतानी मार्ग सांगितला आहे.

आपण निदान एवढं तर नक्की करू शकतो की, जे जे कर्म करू ते ते करताना, भगवंतानी गीतेत सांगितल्या प्रणाने ईश्वरार्पण भावनेने ते करणं. म्हणजे त्याच्या फलाची जबाबदारी ही ईश्वराची असेल. अर्थातच इथून पुढल्या  कर्माचं फल हे ईश्वराधीन असेल आणि अश्या ईश्वराला समर्पित भावनेने केलेल्या वा करत असलेल्या कर्मात मायेला फार वाव राहणार नाही. त्यामुळे जे फलस्वरूप समोर येईल ते ईश्वरी इच्छा म्हणून मन स्वीकारेल.

आता प्रश्न फक्त एकच की आपण प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण कसं करू शकतो. प्रत्यक्षात ते कसं शक्य आहे. तर यासाठी सर्वात सोप्पा मार्ग जो सदुगुरूंनी दिलेला सांगितलेला नामाचा किंवा आपण करत असलेला नामाचा घोष, जाप नित्य प्रत्येक काम करताना म्हणण्याची वा करण्याची सवय लावून घेणं आणि याच भावनेने वा संकल्पाने नाम घेणं की, हे ईश्वरा माझं यापुढील प्रत्येक कर्म हे तुला समर्पित असेल. त्यामुळे तू त्यातून जे फल मला देशील, ते मला स्वीकार्य असेल. 

नक्की खात्रीपूर्वक सांगतो अश्या समर्पित भावाने केलेलं प्रत्येक कर्म ईश्वरचरणी रुजू होऊन त्या ईश्वराला त्याच्या योग्य त्या फलाचं अंकित करतं. हे करत असताना त्याला हे नक्की सांगा की, मागचं सर्व तुझ्या चरणी वाहात आहोत, त्याचं हे योग्य मोजमाप असेल ते दुरुस्त करून घे. ईश्वर हा आपल्या भक्तीसाठी, या आर्ततेसाठी आणि त्या समर्पणाच्या पूर्ततेसाठी बद्ध आहे. फक्त आपण पुढे होऊन चरणी लीन होणं अपेक्षित आहे आणि हे करताना वृत्ती शून्यात जाणं अर्थात समर्पण पूर्ण असणं गरजेचं आहे. ते कार्य नाम घेत असताना आपले सद्गुरू करवून घेतील.  म्हणून नाम घेत रहा, नाम घेत रहा.

पुढील भागात बघूया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...