भोग आणि ईश्वर ३५
ईश्वराच्या चिंतनाच्या वाटेवर नामस्मरण मार्गाने जाण्याचा निर्णय घेण्याचं ठरवलं की तुमचं काम काही प्रमाणात झालं असं समजायला हरकत नाही. आता या टप्प्यावर येऊन मागे जाण्याइतका कपाळकरंटेपणा दुसरा नाही असं माझं मत आहे. इथे सुद्धा मायेचे पाश पाठ सोडत नाहीत. माया अश्या मार्गावर जास्त जोर लावून मागे लागते.
माया ही अनेक रुपात समोर येऊन उभी राहते. विशेषतः ज्यावेळी कोणी जीव पारमार्थिक मार्गावर मार्गक्रमण सुरू करतो, त्यावेळी माया अनेक मार्गांनी पथभ्रष्ट करून साधना थांबवण्याचा प्रयत्न करते. जसं बुद्धीचा अनेक मार्गांनी वा तर्कांनी बुद्धिभेद करून, जे करत आहोत वा करणार आहोत त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करते. यात इतरांची उदाहरणं नेमकी अश्यावेळी डोळ्यासमोर येतात वा आणली जातात.
त्यावरून मन साशंक होतं. मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. खूप जण मधेच साधना सोडून देतात, या विचाराने की, इतक्या जणांना करूनसुद्धा काही फायदा झालेला दिसत नाही, वा काहींना काहीही न करतासुद्धा बरच काही मिळालेलं असतं. हे सर्व बुद्धिभेदक विचार येतात आणि आपलं करणं बंद होतं किंवा त्यावरील निष्ठा कमी होते किंवा वेग मंदावतो. या सर्व गोष्टी मायेच्या आधीन होत असतात.
कोणताही आत्मा ज्यावेळी पंचमहाभूतरूप देहात प्रवेशतो त्यावेळेपासून माया त्याच्या पाठीशी असते. वस्तुतः माया हीच षड्रिपुसह जीवाला आपल्या अंकित ठेवते. जेणेकरून जडजीव कर्माच्या बंधनातून मुक्त न होता, नित्य मायेच्या आधीन राहून, जन्मजन्माचा मिंधा राहील. माया ही प्रत्यक्ष ईश्वराचीच निर्मिती असल्याने आणि ती त्यांच्या छत्रछायेत वावरत असल्यामुळे जीवाला पथभ्रष्ट आणि मतीभ्रष्ट करण्यात तिला सहजी यश येतं.
मायेच्या तापातून सद्गुरुकृपा आणि ईश्वराचा आशीर्वाद प्राण्याला सन्मार्गावरून भ्रष्ट होण्यापासून वाचवतो. म्हणून नामधारकाने आपलं नाम आणि सद्गुरुंचा हात कधीही सोडू नये. या दोन गोष्टी कोणत्याही जीवाला कोणत्याही स्थितीत मार्ग सोडू देत नाहीत. अध्यात्माचं फार वाचन वा अभ्यास नसलेल्या माणसांना फार काही करण्याची गरज नाही.
फक्त नाम, त्यावरील व सद्गुरूंवरील निष्ठा आणि दृढ इच्छाशक्ती या तीन गोष्टी सांभाळणं जमवलं तरी काम झालं. कर्माची बंधन, फलाच्या गोष्टी या सर्व बाजूला ठेवून सद्गुरूंना शरण जाऊन, त्यांना नित्य वंदन करून नामाचा जोर कायम ठेवला तरी बाकी गोष्टी योग्य वेळी सुरळीत व्हायला सुरुवात होईल. कारण आपली श्रद्धा आपल्या साधनेत आपली मदत करते आणि गुरू व नाम यावरील निष्ठा त्याची शक्ती वाढवून, त्यांना ऊर्जा प्रदान करते.
म्हणून निष्ठा श्रद्धा आणि सातत्य यांचं अध्यात्मासह सर्वच क्षेत्रांत महत्व अवर्णनीय आहे. या त्रयीच्या आधारावर अनेक संत महंत ऋषीमुनी यांसह कित्येक साधक लक्ष प्राप्त करते झाले. भोगांचा अंत होईल त्यावेळी होईल, पण मी आज नाम घेऊन पुढील वाटचाल सुलभ करतो आहे हा विश्वास या त्रयीबरोबर ठेवल्यास, वर सांगितलेल्या त्रयीमध्ये एकसूत्रता येते. विचारांची पक्की बैठक तयार होते, जी कायमस्वरूपी कामाला येते.
विचार करा, कृती करा, करत असाल तर नेटाने करा, विश्वास ठेवून करा आणि समार्ग सोडू नका, तोच योग्य लक्षापर्यंत घेऊन जाईल, ही खूणगाठ बांधून पुढे चला. बाकी जगज्जेता, व सद्गुरू करतील.
पुढील भागात बघूया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment