Skip to main content

भोग आणि ईश्वर ४०

भोग आणि ईश्वर  ४०
 

खूप वेळा मन हे एखादी गोष्ट करायला वा त्याकडे वळायला साशंक असतं, वा काही कारणाने मनात  संदेह  निर्माण होऊन आपण ते कार्य अर्धवट सोडतो किंवा पूर्ण मनापासून करत नाही. नाम हे त्यापैकीच एक आहे. ज्याची दृढता काही काळ टिकवली जाते, परंतु काही, व्यक्तिगत वा प्रासंगिक कारणाने, त्यात खंड पडण्याचा धोका होतो. तो धोका आपण बरेच वेळा जाणूनबुजून निर्माण केलेला नसतो. पण तरीही निर्माण होतोच. कारणं घडलेली असोत वा आपसून आलेली असोत, पण त्या कारणांनी मनाला उसंत मिळते, नामपासून ढळण्यासाठी.

याचं कारण कळत नकळत आपलेच दोष असतात. मुख्य कारण मनाला असा एक कोणताही पद्धतशीर उद्योग नको असतो. त्यामुळे ते कारणं शोधत असतं. त्यात आपली वृत्ती आळसाकडे झुकणारी असेल तर, देहाचा आळस आणि मनाचा चंचलपणा हे एकत्रित येऊन कार्य साधतात. नामात  खंड पडतो. नित्य  उपासना म्हणून करायचं ते आपण जमेल तसं करतो. कारणं बघतो वा शोधतो. बर तो छंद म्हणून सुरवातीला वा चाळा म्हणून जिभेला जडवून घेतला की, वेळी  अवेळी कधीही ते काम जिव्हा सुरू करते, आपल्याला ते कळतसुद्धा नाही, इतकं ते सहजी होऊन जातं.

नेटाने आणि सातत्याने ठराविक संख्येने घेण्यामागचं मुख्य प्रयोजन हेच आहे की, एका बारीक पण संततधारेने एखाद्या दगडालासुद्धा भेग पडून तद्नंतर त्याचे तुकडेसुद्धा होऊ शकतात, तर मग देहातून सवय लावून, मनाला सवयीचे होऊन, ते सुप्त मनात पोहोचले की, आत्म्यापर्यंत त्याची धग जायला लागणारा नेट आणि सातत्य, आपण थोडा त्रास घेऊन, सुरवातीला कमी प्रमाणात, पण निर्धारपूर्वक, करत गेलो, तर खचितच त्याचा योग्य परिणाम घडून येईल. 

यात बोलता बोलता एक शब्द आला सुप्तमन. त्याबद्दल थोडं विवेचन करूया. मनाचे जागृत, अर्धजागृत आणि सुप्तमन असे प्रकार वा कप्पे वा अवस्था आहेत. जागृतीमन म्हणजे सकृतदर्शनी आपल्या मनात येणारे विचार जे जाणवतात, ज्यावर आधारित सर्व कार्य घडतं, घडवलं जातं, बुद्धीला चालना मिळते, देह कार्य करतो इत्यादी सर्व जे आपण नोंदवू शकतो ते जागृत मन.

दुसरा प्रकार हा सुप्तमन. हा आपल्या दृष्टीने पूर्ण अज्ञात असलेला मनाचा कप्पा वा प्रकार किंवा अवस्था म्हणूया. ही अवस्था म्हणजे  अलौकिक जागा वा स्पेस असलेला प्रकार. आपण जे जे जागृत मनाने करतो, बघतो, जाणतो ते ते सर्व वा ती सर्व निरीक्षणं सुप्त मनात साठवली जातात. या दोन्हींच्या मध्ये खरा शक्तीयुक्त प्रकार म्हणजे अर्धजागृत मन. खरतर ही एक अशी अवस्था वा व्यवस्था आहे की जी, सुप्त मनातील काही गोष्टी जागृत मनाकडे पोहोचवून बुद्धीला जाणीव करून देते, प्रसंगी जागृत मनाकडून कार्य करवून घेते. थोडक्यात ही दोन्ही मनांना जोडून आपलं कार्य योग्यवेळी करवून घेते. 

बरेच वेळा खूप घाईघाईत आपण पाहिलेली, ऐकलेली किंवा सकृतदर्शनी नुसती कानावरून गेलेली एखादी गोष्ट, वाक्य, गाण्याची ओळ किंवा अन्य काही संदेश, जो आपण ओझरता वाचला असेल,  असं काहीही हे आपण निवांत असतो वा थोडे स्वस्थ वा सावध होतो, त्यावेळी, अचानक आठवून ते गाणं गुणगुणतो किंवा त्या संदेशाचा विचार करतो किंवा त्याप्रमाणे पूर्ण संदेश बघून कृती करतो. निदान आपल्याला ते आठवतं. हे कार्य अर्धजागृत मन करतं. 

मनाची शक्ती खरतर अपार आहे, ज्यातील फारच थोडी आपण वापरतो. मन, मनाची इच्छाशक्ती यांचा योग्य असा संगम साधला तर अशक्य कार्यसुद्धा घडून येतात. आपण पुराणात वा इतिहासात,  बरेच वेळा वाचतो की, कित्येक वर्षे तप करून, प्रत्यक्ष भगवंताला प्रसन्न करून घेण्याची किमया, कित्येक मानव व असुर यांनी केली आहे.  

या निग्रहात वा निर्धारात देहाला योग्य ती कार्यशक्ती मन वा मनातील प्रबळ इच्छेतील ऊर्जा पुरवते. ज्यावर देहाची शक्ती कार्य करते. आपण अशीही उदाहरणं पाहिलीत, जिथे आपल्यापेक्षा सामर्थ्यवान व्यक्ती, संघ वा सैन्य, यावर फक्त मनोनिग्रह, मनातील ऊर्जा, चेतना आणि दृढ विश्वास या जोरावर इतिहासात दुबळ्या वा कमी शक्तीवान वाटणाऱ्यांनी मात केली आहे, निदान अनपेक्षित झुंज दिली आहे.

यातील अजून काही विचार बघूया पुढील भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...