Skip to main content

भोग आणि ईश्वर ५३

भोग आणि ईश्वर  ५३
   
नाम हा केवळ उपचार नसून तो सर्वोपचार आहे. याचा विस्तृत अर्थ  पाहूया. 

उपचार या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ उपचार म्हणजे तोंडदेखलं, वरवरचं ज्याला आपण दाखवण्या पूरतं म्हणतो तसं. दुसऱ्या अर्थाने उपचार म्हणजे इलाज, उपाय.  आता या दोन्हीवर विस्तृत विचार करूया.

एक तोंडदेखलं किंवा वरवरचं म्हणून नाम घेतलं तरीही नाम आपलं काम करतं. कारण नाम हे शुद्ध, सात्विक आणि सकारात्मक परिणाम घडवणारं ईश्वराचं स्वरूप आहे. ते उपचार अर्थात वरवरचं किंवा तोंडदेखलं घेतलं तरी त्याचा सकारात्मक परिणाम होईल. परंतु त्याचा इच्छित परिणाम साधण्यासाठी नाम मनापासून घेतलं तर ते उपचार म्हणजे तोंडदेखलं न राहता उपचार अर्थात उपाय होईल.

आता उपाय म्हणजे काय. तर उपाय म्हणजे नाम उपयुक्त ऊर्जा निर्माण करून त्याचा सात्विक परिणाम मन, विचार, आचार, उच्चार व त्याद्वारे कृतीवर होऊन पुढील कर्म सुधारत जातं. निदान कर्मफलाचा होणारा उलट परिणाम थांबायला सुरवात होते. नामाचा उचित परिणाम म्हणजे ते घेणाऱ्या बरोबर ते ऐकणाऱ्यालासुद्धा तारतं. 

नाम अश्या तऱ्हेने एक उपचार म्हणून केले किंवा एक उपाय म्हणून केले तरी सर्वात प्रथम ते मनाला आत्म्याशी आणि आत्म्याला अनंताशी जोडण्याचा मार्ग सुकर करते. परंतु तो उपचार म्हणून केल्यास त्याचा परिणाम क्षीण असतो आणि उपचारात सातत्याचा अभाव असल्यामुळे योग्य तो प्रभाव दिसत नाही. परंतु नाम हे उपाय म्हणून केल्यास त्याच्या सातत्याने दीर्घकालीन वा सर्वकालीन परिणाम व प्रभाव दिसतो. 

नाम हे स्वयंसिद्ध आहे म्हणजे त्याला वेगळं सिद्ध करावं लागत नाही. घेणाऱ्याने ते घ्यायला सुरुवात केली की त्याचा गुण व परिणाम दिसायला लागतोच लागतो. परंतु त्या नामाशी प्रामाणिक राहून, दृढपणे आणि निष्ठेने घेणं महत्वाचं आहे. नामाचा उपाय हा एखाद्या खडकावर पडणाऱ्या संततधारेसमान असतो.  त्या धारेप्रमाणे धारणेचे आणि ध्यानाचे कार्य नाम साधते, पण ते पुढे विस्ताराने पाहू. 

आता नाम सर्वोपचार कसं ते पाहूया. मनाची एकाग्रता, भोग,  चिंता व व्यथा यातून सुटका, आत्मसुखाचा मार्ग, ईश्वराची प्राप्ती या व अश्या अनेक प्राप्तीसाठी, नाम हे एकमेव साधन आहे, साध्य साधून घेण्यासाठी. मन हे अनेक कारणांसाठी चिंतीत असतं, अनेक काळज्या, व्यथा, भूतकाळातील कर्मांची भीती आणि भविष्यातील घडणाऱ्या गोष्टींची चिंता, या आणि अश्या अनेक गोष्टी मनाला त्रास देत असतात आणि मनाचा तोल सांभाळणं अत्यंत कठीण होऊन बसतं. 

त्यातच दिवसेंदिवस जगण्यातला अशाश्वतपणा, मनाला अजूनच कमजोर करत असतो. अश्या या सर्व परिस्थितीत मनाला शांत ठेवून, पुन्हा चुका न करण्याच्या मार्गावर चालण्यासाठी, नाम हा खूप मोठा आधार आहे. नामाच्या उच्चारणाने निर्माण होणाऱ्या तरंगलहरी आजूबाजूचं वातावरण सकारात्मक करतातच, 

पण ज्या नामचं उच्चारण करून, त्या नामकर्त्याला आपण स्मरत आहोत, त्यांच्यापर्यंत त्या लहरी पोचण्याचं कार्य नामामागे असलेली दृढ निष्ठा, इच्छाशक्ती आणि सातत्य या त्रयीतून साध्य होतं. याकार्यात तुमची गुरूंवरील श्रद्धा आणि तुमचा विश्वास कार्यास येतो. 

म्हणून निष्ठापूर्वक, श्रद्धायुक्त होऊन अंतःकरणापासून नाम घ्या. ते जागृतावस्थेत जेंव्हा जेंव्हा भान असेल, तेंव्हा तेंव्हा तुम्ही घ्या, सुप्तावस्थेत आणि भान नसताना ते करवून घेण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून आपली जिथपर्यंत पोच आहे, तिथपर्यंत, आपण आणि जिथे आपलं जागृत मन पोचत नाही किंवा जिथे या देहाच्या मर्यादा संपतात, तिथे सद्गुरूंवर भार सोडून नाम घ्या, पण घ्या.

आता सर्वोपचार म्हणजे नक्की काय साध्य करतं नाम ते पाहूया पुढील भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...