Skip to main content

भोग आणि ईश्वर ४४

भोग आणि ईश्वर  ४४
  
समस्त सजीव देहात जी चेतना कार्य करते, ज्यामुळे सर्व सजीव हे निर्जीव वस्तूंपासून भिन्न गणले जातात, ती प्राणशक्ती म्हणजेच आत्मशक्ती. तिलाच चैतन्यशक्ती म्हणतात. ह्या शक्तीचा प्रत्यय वा प्रचिती देह ज्यावेळी निष्प्राण होतो आणि त्याला निर्जीव देह ही उपाधी प्राप्त होते, त्यावेळी तिथे उपस्थित प्रत्येकाला येतो. मुळात ती व्यक्ती जीवित असताना होणारी प्रत्येक हालचाल, आपल्याला न जाणवलेली वा जाणवणारी, ही त्या चैतन्यशक्तीच्या अस्तित्वाची पावती असते आणि हे, देह निपचित झाल्यावर कळतं. 

आपण धारण केलेला देह हा आत्म्याच्या प्रवासातील एक टप्पा असतो. म्हणजेच आपला देह हा जसा पंचतत्वातून जन्माला आला त्याच प्रकारे तो नष्ट होतो आणि आत्मा पुन्हा एकदा नवीन प्रवासाला निघतो. जुन्या देहातून नवीन देहात प्रवेश हा पूर्वसंचित व प्रारब्ध यावर अवलंबून असतो. लक्ष लक्ष देह धारण करून त्यातून फिरून, भोग भोगून मानवी देहात मिळालेला हा प्रवेश आणि त्यातील जेमतेम साठ, सत्तर ऐंशी इत्यादी वर्षांचा जन्म. 

एक जन्म झाल्यावर त्यातील जमवलेल्या पुण्य वा पाप कर्म फलांवर पुढचा प्रवास निश्चित होतो. तो कधी कुठे असेल याची कोणतीही सूत्रबद्ध पद्धती माहीत नाही. पण ती आहे हे निश्चित. म्हणजेच आजच्या आधीचा आपला जन्म हा कदाचित काही शे वर्ष आधीचा असू शकतो व नंतरचा सुद्धा त्याचप्रमाणे असू शकेल. आता यापूर्वीच्या जन्मात त्या युगात त्या काळात त्या देहात काही गोष्टी शिकलेला आत्मा पुढील जन्मात पुढील काळात कित्येक शे वर्षानंतर त्या काळातील ज्ञान, विज्ञान, प्रगती, शिक्षण आत्मसात करतो. 

यात जे करतो तो त्यावेळी तो देह करतो, त्या देहातील क्षमतांनुसार. पण आत्मा ते ज्ञान पुढे घेऊन जातो, नवीन देहात. कारण जसा आत्मा अविनाशी आहे, तसंच त्याने मिळवलेलं ज्ञानसुद्धा अविनाशी आहे. म्हणूनच एखादी व्यक्ती एखाद्या विषयात प्रचंड हुशार असते आणि त्या विषयाचं आकलन त्या व्यक्तीला फार चटकन होतं. अर्थातच या विरुद्धसुद्धा तितकंच खरं आहे. खूप वेळा अशीही उदाहरणं आढळतात की एखादा विषय हा फक्त ऐकूनसुद्धा समजतो, लक्षात राहतो आणि त्यावरील प्रश्न हे लवकर सोडवून होतात. एखादी व्यक्ती ही एकपाठी असते. 

याचा संबंध जितका शारीरिक क्षमता अर्थात मेंदू, त्यातील पेशी, त्यावरील सुरकुत्या इत्यादीवर अवलंबून आहे, तितकंच ते मागे, म्हणजेच मागील अनेक जन्मात मिळवलेल्या ज्ञानावर अवलंबून असतं. हे उदाहरण सद्यस्थितीत वा आताच्या काळातील शाळा कॉलेज नोकरी व्यवसाय इत्यादी ला धरून दिलं आहे. परंतु त्या त्या काळात, त्यावेळच्या सामाजिक व राजकीय व्यवस्थांनुसार तशी उदाहरणं तुम्हाला समजून येतील. एखादा चित्रकार, नट कलाकार अश्या अनेक प्रकारच्या दैवी देणग्या घेऊनच जन्माला येतात ते त्यांनी अनेक जन्मात प्राप्त केलेल्या ज्ञानावर, जे अविनाशी आहे. 

याप्रमाणे अनेक गोष्टी घेऊन, शिकत ज्ञानी होत होत आत्मा परिवर्तन करत अनंतापासून अर्थात जगनियंत्यापासून सुरू झालेला प्रवास, पुन्हा त्याच पूर्णांशात पूर्ण करतो. हा प्रवास चढता वा उतरता कसाही असू शकतो. चढता म्हणजे ज्ञान अर्जित करत व कर्मफल वजा करत करत पुढे जाणं. उतरता म्हणजे ज्ञानाची घसरण कर्मफलाची चढ वा अधोगती. 

हा विषय अजून खोलात जाऊन बघूया पुढील भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१३/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...