भोग आणि ईश्वर ५१
काल जे ज्ञानी माणसाबद्दल आपण बघितलं त्याच विषयाचा थोडा विस्तार करूया. आजचं विज्ञान हे त्याच ज्ञानाचा भाग आहे. कारण विज्ञानाचा अंतिम उद्देश हा हे जग, जगाची उत्पत्ती, कारणं, त्यामागील पूर्ण सत्य शोधून त्या सर्वांची कारणासह मीमांसा करून त्या सर्वांमागील सूत्र शोधून ती मांडणं हाच आहे. आज विज्ञानाला ज्ञात नाही की या सर्वाचा अंतिम मार्ग हा ईश्वराकडे नेणाराच आहे.
म्हणजे जे ज्ञान वेद शास्त्र यांमध्ये मांडण्यात आलं आहे आणि त्यामध्ये सृष्टीकर्त्याची सृष्टीच्या रचनेची, या जगाच्या व्यापात ईश्वराला पाहून त्याच्या निर्मितीचं कौतुक करण्याची आणि त्यायोगे त्याला प्राप्त करण्याच्या पद्धती यांची केलेली मांडणी, आपल्याला अंती ईश्वराच्या चरणांशीच नेते. विज्ञान सरतेशेवटी त्याच टप्प्यावर येणार याची एक झलक नुकत्याच करण्यात आलेल्या एका प्रयोगात देवकण या शोधापर्यंत पोचून विज्ञानाला विधात्याने थक्क केले आहे असं माझं अनुमान आहे.
म्हणजेच जे ज्ञान या सृष्टीच्या निर्मात्याच्या चरणी लीन आहे तेच अंतिम ज्ञान आहे आणि असणार. बाकी सर्व नकळतपणे त्याच पायरीला पोचणार, हे आज विज्ञानाला ज्ञात नाही. पण करोडो वर्षांपूर्वी वेद शास्त्र, पुराणं यातून सनातन धर्म मार्तंडांनी मांडलंय हे विसरून चालणार नाही. सध्याच्या काळात असलेल्या अशाश्वत जगण्याच्या पद्धतीमध्ये खूपदा हेच ईश्वरी ज्ञान हा मनाचा व आत्म्याचा आधार आहे हे विसरून चालणार नाही. अन्य सर्व गोष्टींना पर्याय आहेत, पण ईश्वर चिंतानाला पर्याय नाही. हाच या अशाश्वत जगताचा मूलमंत्र सिद्ध होऊ लागला आहे, असं माझं प्रांजळ मत आहे.
आता ईश्वराला समजण्यासाठी, स्वतः ईश्वराने काय काय केलं ते जरा समजून घेऊ. कारण तेच ज्ञान पुढच्या पायरीवर नेणार आहे. मानवी देह ही ईश्वराची अंतिम निर्मिती ही त्याचसाठी आहे, याचे अनेक पुरावे या देहात ईश्वराने निर्माण केले आहेत. मुळात बुद्धी, मन आत्मा यांचा उपयुक्त संगम या देहात घडवून आणला. ज्या मनाच्या आधारावर वा सहाय्याने देहाला ईश्वर चिंतनात गुंतवून माणूस आत्मउद्धार साधू शकेल , ही व्यवस्था त्यानेच निर्माण केली.
स्वनिर्मिती हा मार्ग फक्त प्रजोत्पादन करण्यासाठी समजून, त्या उद्देशानंतर, काममार्गातून निवृत्त होऊन, त्या ओज व तेजाचा उपयोग योग्य मार्गाने उन्नती साधून सर्व मोहातून योग्य वयात बाहेर पडून पुढील जन्माच्या वा पुढील मार्गाच्या शोधार्थ कर्मरत राहणे हेच अंतिम ध्येय प्रत्येक जन्मात असावे. हे जाणताना प्रत्येक जन्मी आपल्याला याच उद्देशाच्या पूर्ततेसाठी पुनः जन्म मिळाला हे मानून पुढे पुढे जाणं हे खरे ज्ञान.
हे करण्यासाठी सुरवात कुठून करावी हा प्रश्न अनेकदा पडतो. म्हणून असा विचार करावा की, भोग आणि उपभोग या दोन्ही स्थितीत मनाचा समतोल सांभाळणं याला मनाची निश्चलता म्हणता येईल. अश्या निश्चल मनाला दोन्ही परिस्थितीत योग्य प्रकारे प्रतिक्रिया देणं सहजसाध्य होतं. म्हणजे आनंदात फार वाहावत न जाता व दुःखात योग्य वेळी सावरून, हे दोन्ही, टप्पे वा स्थानकं आहेत हे लक्षात ठेवावं. येणारी माणसं, काही काळ एकत्र राहणारी, सख्य जमलेली सर्वजणं ही काही कर्मयोग व कर्मफल घेऊन आलेली असतात हे ध्यानात ठेवावं.
हे आगगाडीच्या प्रवासासारखं आहे. भेटणारा प्रत्येकजण, कधीतरी, त्याचं स्थानक आल्यावर, उतरून जाणार, हे मनात ठसलं पाहिजे. त्याच्या स्थानकापर्यंतच तो आपल्या साथीला असणार होता, त्याला तिथे म्हणजेच त्या स्थानकावर उतरणं त्याच्या प्रारंब्ध व संचितानुसार क्रमप्राप्त होतं. त्याचं प्रारब्ध वा संचित हे त्यांचंच तिकीट होतं, त्यामुळे तो त्या स्थानका पर्यंतचाच सहप्रवासी होता. त्याला कोणाचाही इलाज नाही. त्यालाच ज्ञानी लोकांनी नियती ही संज्ञा दिली आहे. ही नियती या देहात आल्यानंतर प्रत्यक्ष सृष्टीकर्त्यालासुद्धा चुकली नाही.
यावर अजून विचार करूया उद्याच्या भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment