Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २४

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २४

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
 
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | 
वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||

आधीच्या दोन भागात या एका श्लोकाचं विस्तृत विवेचन पाहिलं. आता थोडा इतर काही मुद्द्यांचा अभ्यास करूया. रामदासांच्या या एका स्तोत्रात अनेक गणितं व गुह्य ज्ञान अर्थात विज्ञान दडलं आहे असा माझा कयास आहे. कदाचित आपण फक्त अध्यात्मिक विवेचनात समर्थांचा मूळ उद्देश गेल्या चार शतकात मागे ठेवलाय असा माझा दावा आहे. 

जरी अध्यात्म असेल तरी ते योग, कुंडलीनी जागृती, खगोलीय ज्ञान अश्या शास्त्रशुद्ध गोष्टी मांडण्यासाठी समर्थांनी या स्तोत्राचा संकल्प केला असावा. मुळात समग्र समर्थ आणि त्यांचं लिखाण व कार्य डोळ्यासमोर आणले तर दासबोध, मनोबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक हे सर्व वाङ्मय साधारण मानवाला मनाच्या माध्यमातून प्रगत , सुसंस्कृत, सुसंस्कारित करण्यासाठी लिहिलेले समर्थ, मारुतीस्तोत्र फक्त अध्यात्मिक पातळीवर लिहितील हे पटत नाही.

मनाला, आत्म्याला संस्कार करता करता तेच समर्थ शक्ती, युक्ती, बुद्धी, चैतन्य, निरागसता, दास्यत्वाची अत्युत्तम प्रचिती देणारा, प्रत्येक संकटाकडे एक आव्हान म्हणून पाहणारा, अशी कित्येक आव्हानं सहजी पेलून फक्त शक्ती नाही तर युक्तीने मार्ग काढणारा, शत्रूला शत्रूच मानून कोणताही उदात्त वा अविवेकी सद्गुण न दाखवता त्याला त्याची योग्य जागा म्हणजेच यमसदन दाखवणारा, भावनेत न गुंतता प्रश्न सोडवणारा, एकाचरणी, एकस्थानी स्थिरबुद्धी ठेवून श्रद्धा भक्ती या न विभागता स्थिरचित्त ठेवणारा असा हनुमंत, याचं महत्व फक्त अध्यात्मिक पातळीवर वा दृष्टीने बघतील हे असंभव आहे.

स्वतः समर्थ आयुष्यभर एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होते ते म्हणजे तन, मन व अंतरात्मा याने पूर्ण शुद्ध असलेला सशक्त समाज घडावा म्हणून. त्यांना फक्त अध्यात्मिक उंची अपेक्षित असती तर स्वतः रोज 1200 सूर्यनमस्कार घालून आदर्श प्रस्थापित करत बसले नसते. एका गुहेत बसून ज्ञान प्राप्त करून नाम घेत त्यांनी अध्यात्म प्रसार केला असता. परंतु ते जाणत होते की तात्कालीन व तदनंतरच्या समाजाला अध्यात्मिक ज्ञानापेक्षा शास्त्रीय बैठक असलेले आणि सशक्त शरीर व मन असलेले सत्पुरुषच पुढे नेऊ शकतील आणि सनातन धर्माचं अस्तित्व शिल्लक राहिलं. 

याव्यतिरिक्त पुढील काळात योग आणि शास्त्र अर्थात विज्ञान हेच विश्वाचे तारणहार असतील हे समर्थ जाणून होते म्हणूनच याच सद्विचाराने भारून त्यांनी संपूर्ण आयुष्य, असा समाज व अशी व्यवस्था घडवण्यासाठी खर्च केलं. रामरायाकडे त्यांनी फक्त अध्यात्मिक दृष्टीने पाहिलं असेल हे संभवत नाही. समर्थ उक्ती आणि कृती यात ताळमेळ व तारतम्य ठेवणारे होते. त्यामुळे सशक्त समाज घडवण्याच्या कार्यात रामाचा फक्त अध्यात्मिक सहभाग अपेक्षित ठेवून समर्थ रामभक्तीची प्रेरणा देत असतील असेही संभवत नाही. आध्यात्मिकता हा एकमेव निकष लावून समर्थांचं कार्य गौरवणं खरतर त्यांच्या वैज्ञानिक व शास्त्रीय बाजूंवर अन्याय करण्यासारखं आहे.

जे व्यक्तित्व, समाजाच्या, मनाच्या, माणसांच्या इतक्या व्यथा मांडून त्यांची लक्षणं आणि उपाय सांगतं. माणसांचे इतके प्रकार व्यक्त करतं, त्यासाठी दासबोध, मनाचे श्लोक नावाचे परिपूर्ण ग्रंथ लिहितं, ते व्यक्तित्व वैज्ञानिक दृष्टी असलेले महान शास्त्रज्ञच असले पाहिजेत. परंतु तात्कालीन समाजाला इतका मोठा शास्त्रीय विचार पटण्याइतकी वैचारिक प्रगल्भता आलेली नाही हे जाणून अध्यात्मिक वेष्टनात सामाजिक, शास्त्रीय, वैज्ञानिक ज्ञान समर्थानी समाजाला दिलं. हेतू हा होता की, कधीतरी कोणीतरी यावर तात्विक विचार करून यातलं खरं सार व गर्भित ज्ञान समाजाला पुन्हा देऊन समर्थांचं इप्सित साध्य करेल. नव्हे तसा  असा विश्वास समर्थांना होता.

याच विचाराने त्यांनी जाणीवपूर्वक हनुमंत, मारुती या उपास्य दैवताची निवड केली. कदाचित तेराकोटी जपानन्तर रामदर्शनात प्रत्यक्ष प्रभूंनी हाच आदेश समर्थांना दिला असेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. अगदी पाश्चात्य जगतात सुद्धा शास्त्रज्ञाना सुरवातीला वैज्ञानिक दृष्टिकोन व सिद्धांत मांडल्यानन्तर त्रास दिला गेला होताच. मग भारतासारख्या अध्यात्मिक विचारांचा पगडा अणूरेणुत रुजलेल्या समाजाला हा विचार क्षणात पटणं शक्य नाही, हे संपूर्ण भारतभ्रमण केलेल्या समर्थांना, नक्की जाणवलं असेल. 

परंतु आज ते सर्व वाचताना , अर्थ लावताना, विश्लेषित करून विवेचित करताना मला स्वतःला एक वैज्ञानिक शास्त्रज्ञ समर्थ रामदास जाणवले. कदाचित मारुतीस्तोत्राचा इतका अभ्यास मी देखील आधी केला नव्हता. पण आज या टप्प्यावर हे जाणवलं ते मांडलं. अर्थात त्यामुळे अध्यात्मिक महत्व कुठेही कमी करण्याचा प्रयत्न नाही हे विशेष नमूद करावंसं वाटतं. 

म्हणून १३ व्या श्लोकात गवसलेला अर्थ पुढील भागात पुन्हा पाहूया, परंतु आज मांडलेला दृष्टिकोन लक्षात ठेवून वा गृहीत धरून. 

क्रमशः भाग २४..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२५/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...