मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ९
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
रामावतार समाप्तीच्या वेळी श्रीरामांनी, हनुमंताला कार्य सुपूर्द केलं आणि आज्ञा केली की कलियुगाच्या अंतापर्यंत तू या जगात राहशील आणि ज्या ज्यावेळी धर्मध्वजा उतरताना दिसेल, श्रद्धा भक्ती क्षीण होईल आणि लोकांचा देवावरील विश्वास ढळताना दिसेल, त्यावेळी तू येऊन या सर्वांची घडी नीट बसवशील. मारुतीने अर्थातच, प्रभूआज्ञा शिरसावंद्य मानून, जगतात रामनामाच्या प्रसाराचा भार आपल्या शिरावर अत्यानंदाने घेतला आणि प्रत्येक काळात विविध रुपात ह्या कार्याची धुरा अनेक मार्गाने यथोचित सांभाळली आणि पुढेही सांभाळेल.
द्वापारयुगामध्ये स्वतः प्रभू पुनः श्रीकृष्ण रुपात अवतरल्या मुळे हनुमंताचं कार्य खऱ्या अर्थी कलियुगात जास्त गरजेचं आहे, हे जाणूनच प्रभूंनी कलियुगाच्या अंतापर्यंत हनुमंताला चिरंजीवित्व दिले आहे. मुळात धर्मरक्षण हे सर्वोच्च ब्रीद प्रभूंचं. मग हनुमंताला हे कार्य देण्याचं कारण काय, हा प्रश्न उपस्थित होतोच.
याचं उत्तर हनुमंताची स्वतंत्र तल्लख बुद्धी, जाण, निष्ठा, अपूर्व श्रद्धा, संपूर्ण शरणागती, आज्ञाशिरासावंद्यत्व, दास्यत्व ज्याबळावर त्याने भगवंत आणि भक्त, स्वामी आणि दास यातील सीमारेषा धूसर केल्या. श्रीराम आणि हनुमान हे एकरूप झाले. त्यामुळे जे श्रीराम हृदयी उमटते त्याचा ध्वनी हनुमान हृदयी प्रकट होतो.
म्हणजेच जे कार्य प्रभू स्वतः इच्छा असूनही करू शकत नाहीत ते जगतकल्याणाचं कार्य हनुमंत त्याच निष्ठेने करेल हा विश्वास प्रभूंना होता. याच ब्रीदातील एक ब्रीद म्हणजे प्रभू हे दीन दु:खीतांचे नाथ आहेत. अर्थात जिथे जिथे सामान्य भक्तजनांची अवस्था दीन असेल तिथे तिथे साक्षात प्रभूंचा प्रतिनिधी या रुपात हनुमंत प्रकट होऊन अश्या सज्जन सुशील जनांना योग्य ते सहाय्य करण्याचं कार्य हनुमंत नित्य करत आहे आणि म्हणून तो दीन अनाथांचा नाथ आहे. म्हणूनच जिथे जिथे हनुमंताची अर्चना, प्रार्थना आणि आर्जव आहे तिथे तिथे करुणाघन हनुमंत कृपावंत आहे, असच समर्थांना सुचवून हनुमंताची ग्वाही द्यायची आहे.
वरच्या विवेचनात म्हटल्याप्रमाणे हनुमंताच्या ठाई प्रत्यक्ष श्रीराम हृदयी नित्य वास करत आहेत. हे हनुमंताने सप्रमाण सिद्ध केले आहे. म्हणूनच हरी अर्थात श्रीराम आणि हनुमंत एकरूप आहेत. स्वतः हनुमंत आपली भक्ती, निष्ठा दास्यत्व या गुणांनी हरीच्या स्वरूपाशी एकरूप झाला आहे. भक्त आणि भगवंत असा भेद तिथे करता येणार नाही. म्हणूनच हरिरूपा अशी सार्थ साद समर्थ हनुमंताला उद्देशून घालतात. हरीमय होऊन हरीच्या अंतरंगाशी एकरूप होऊन हरिहृदयी नित्य विराजित आहे. म्हणून हरिरूपा. कारण रूप म्हणजे स्वरूप याअर्थाने ह्रिस्वरूपा.
सुंदरा. वास्तविक प्रथमदर्शनी या शब्दावरून समर्थ हनुमंताला उद्देशून हे विशेषण वापरत आहेत असच भासतं. किंवा हनुमंताच्या एकूण कार्यावरून त्याला समर्थ सुंदरा हे विशेषण वापरतात की काय असा एक समज होऊ शकतो. परंतु तसं नसून त्यामागे वाल्मिकी रामायणातील कथा अथवा कांड असून त्या अर्थाने ते हनुमंताला सुंदरा असे संबोधत आहेत.
त्याबद्दल विस्ताराने उद्याच्या भागात पाहू.
क्रमशः भाग ९ .....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१०/११/२०२०
Comments
Post a Comment