Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २१

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २१

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
 
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | 
तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||

अकराव्या श्लोकात खूप ज्ञानभांडार आहे, असं मला स्वतःला वाटतं. मुळात अणू ही संकल्पनाच ज्यावेळी युरोपात अस्तित्वात नव्हती आणि एकोणिसाव्या शतकात ही कल्पना प्रथम मांडली गेली आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ही संकल्पना मांडली गेली की, अणूचा विस्फोट घडवून त्यातून ऊर्जा व वीजनिर्मिती होऊ शकते. अणूचं महत्व लक्षात आल्यानन्तर मानवाचा अनेक क्षेत्रात विस्तार झाला. अर्थात चुकीच्या वापराने होणारा विध्वंससुद्धा पाहायला मिळाला. 

या व्यतिरिक्त अजून एक संकल्पना ज्यावर शास्त्रज्ञ अजूनही काम करत आहेत. ती कल्पना म्हणजे अणूच्या वा एखाद्या कणाच्या विस्फोटातून समस्त ब्रह्मांड निर्मिती झाली आहे. त्या कणाला त्यांनी देवकण अशी संज्ञा देखील दिली. अश्या संकल्पनेला मानणाऱ्या काही काही गोष्टी पुराणात, प्राचीन ते अर्वाचीन इतिहासात सापडतात. यात मुख्यतः ऋषीमुनी, वेद यातील दाखले उदाहरणार्थ कृष्णविवरे, ब्रह्मांड या फक्त संज्ञा नव्हत्या तर याबाबत बरीच माहिती वेदात दडलेली आहे. खरतर त्याचा अभ्यास व्हायला हवा किंवा आपल्याला त्याची कळकळ जास्त हवी. परंतु ती पाश्चात्यांना अधिक आहे असं चित्र दिसतं.

असा हा हनुमंत जो क्षणात अणूपासून ब्रह्मांडाएवढा होत जातसे. मुळात अणू ही सुक्ष्मतेचा मापदंड आहे हे समर्थांना माहीत होतं, जे नन्तरच्या काळात सुमारे १८०० मध्ये व त्यानंतर संशोधनातून सिद्ध होत गेलं. या अणूच्या अंतर्गत रचनेत प्रोटॉन आणि नुट्रॉन केंद्रकाभोवती असतात आणि त्यांच्या बाजूला इलेक्ट्रॉनचं जाळ  असतं. म्हणजे तीन गोष्टींनी प्रत्येक अणू बनला आहे. अर्थात त्रिमितीच्या जगाच्या आणि परमात्म्याच्या नियमानुसार हे जग तीन प्रकारच्या मितीनी बनलं आहे. म्हणून प्रत्येक अणुत तीन गोष्टी आहेत. जसं त्रिगुण, त्रिदेव, त्रयमूर्ती इत्यादी.

यात अणूपासून अर्थात सुक्ष्मपासून झालेली जगनिर्मिती अर्थात ब्रह्मांडनिर्मिती हा सध्या तरी विज्ञानाच्या संशोधनाचा विषय आहे. यातच विज्ञान देवकणापर्यंत पोचलं आहेच. अशी एक विचारधारा आहे की, या संकल्पनेची कल्पना तर समर्थांना मांडायची नसेल ना. कारण हनुमंताचं विशालकाय रूप धारण करणं यासाठी दुसरी शब्दयोजना शब्दप्रभु समर्थ रामदासांना अशक्य नव्हती. कारण तेराव्या श्लोकात समर्थ शून्यमंडळ असा उल्लेख करतात. त्याबाबत त्या श्लोकाच्या विवेचनात चर्चा करूच. परंतु हनुमंताचं विराट रूप धारण करणं हे अश्या काही गुह्य भाषेत मांडायची गरज वा कारण नव्हतं. कारण 

सुक्ष्मापासोनी आकाशाएवढा होत जातसे 

असा सहज साधा उल्लेख करू शकले असते समर्थ. 

कारण भूमंडळ, ब्रह्मांड, अणू, शून्यमंडळ, सुर्यमंडळ या शब्दात बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत अथवा याचे अर्थ विस्ताराने पहाणे गरजेचे आहे. हे सर्व शब्द समर्थानी त्यांच्या विपुल लेखनात वापरले आहेत. याचा अभ्यास केला  तरच यातील गुह्यर्थ समजतील. सध्यातरी अणू आणि अणूचा विस्तार या संकल्पनेत काही वैज्ञानिक बाबी दडलेल्या आहेत हे नक्की. ज्या आता आता विज्ञानाला समजू लागल्या आहेत.

अश्या या क्षणात आपलं रूप सुक्ष्मापासून विशाल विस्तारून आपल्या दिव्य शक्तीची प्रचिती असुरांना देणाऱ्या हनुमंताशी कुठे तुलना आहे का असा प्रश्न न विचारता समर्थ तसं विश्वासाने आणि श्रद्धेने सांगतात. तर या विशालकाय हनुमंताची तुलना मेरू आणि मंदार या दोन भव्य आणि विशाल पर्वतांशीसुद्धा करता येणार नाही. अश्या विशालरूप धारण केलेल्या हनुमंतापुढे मेरू आणि मंदार हे पर्वत धाकुटे म्हणजे छोटे वाटतात. हा सोप्पा अर्थ आहे याचा.

पण तरीही अणूची संकल्पना, त्याचा ब्रह्मांडाशी संबंध या गोष्टी बरेच अर्थ अभिप्रेत करतात. कारण एखादा दैवी पुरुष विशालकाय रूप धारण करू लागला की, फारतर आपण आकाशापर्यंतची कल्पना करू शकतो. परंतु त्रिकाल ज्ञानी सत्पुरुष असलेले समर्थ ब्रह्मांडाचा आणि त्यापेक्षा विशालतेचा विचार करतात तो विचार त्यांनी सहजी केला आणि मांडला नसेल हे नक्की. समर्थांचेच समकालीन संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की, 

अणूरेणीया थोकडा तुका आकाशाएवढा. 

इथे तर तुकोबाराय अणूच नाही तर रेणूचा सुद्धा उल्लेख करतात. म्हणजेच भारतीय अध्यात्मिक ज्ञानात विज्ञानाच्याही पुढे जाऊन विश्व पाहण्याची क्षमता आहे, हें नक्कीच सिद्ध होतं.  या अभंगावर सुद्धा लिहिण्याची इच्छा आहे. बघू कसं जमतय.

क्रमशः भाग २१..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२२/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...