मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १०
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
सुंदरा. वास्तविक प्रथमदर्शनी या शब्दावरून समर्थ हनुमंताला उद्देशून हे विशेषण वापरत आहेत असच भासतं. किंवा हनुमंताच्या एकूण कार्यावरून त्याला समर्थ सुंदरा हे विशेषण वापरतात की काय असा एक समज होऊ शकतो, किंवा हनुमंत सुंदर आहे म्हणून तसे संबोधन समर्थांनी वापरले आहे का, असाही प्रश्न निर्माण होतो. काही ठिकाणी तश्या अर्थाने विवेचन केल्याचे मीदेखील वाचले आहे.
त्यात तथ्यांश नसेल असं मी म्हणणार नाही. परंतु माझ्या अनुमानानुसार दिसण्याबद्दल समर्थ असं विशेषण वापरतील असं सकृतदर्शनी मला वाटत नाही. कारण समर्थांसारखा संत सौन्दर्य वा सुंदरता यावर लिहितील असं मला तरी वाटत नाही. त्यामागे वाल्मिकी रामायणातील कथा अथवा कांड असून त्या अर्थाने ते हनुमंताला सुंदरा असे संबोधत आहेत असं माझं अनुमान आहे.
वास्तविक संपूर्ण रामायणात सर्व प्रकरणं किंवा भाग वाल्मीकींनी कांड या प्रकारात मांडले. जसं महाभारतात पर्व या प्रकारात त्यांना समाविष्ट करण्यात आलं तसच. रामायणात सर्व कांडांमध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांच्या कार्याचं आणि गुणांचं कौतुक ओसंडून वाहत आहे. परंतु एक कांड खास हनुमंताच्या गुणवर्णनासाठी लिहिलं आहे महर्षी वाल्मिकी यांनी. त्याचं नाव आहे, सुंदरकांड. हनुमंताचा पराक्रम व विजयाचं सविस्तर वर्णन यात मांडण्यात आलेलं आहे.
यामध्ये त्यांनी हनुमंताचं लंका उड्डाण, सीतामातेशी भेट, अशोकवनाचा विध्वंस, रावणपुत्र अक्षयकुमार याचा हनुमंताने केलेला वध, इंद्रजिताच्या नागपाशात बांधून घेणं, रावणासमोर सभेत धीटपणे उभं राहून स्वामीचं कर्तृत्व आणि प्रभाव कथन करणं, शेपटीला आग लावली गेल्यानंतर लंकादहन करणं, पुनः माता सीतेची भेट आणि लंकेतून पुनः परतून येणं, या सर्व घटनांचं विस्ताराने कथन या कांडात वाल्मिकी आणि रामचरीतमानसकार तुलसीदास यांनी मांडलं आहे.
तरीही शंका शिल्लक राहते याचं नाव सुंदरकांड का. याचं कारण याप्रमाणे, लंका मुळात त्रिकुटपर्वतावर स्थित होती. अर्थातच तिथे तीन पर्वत होते. त्या तीन पर्वतातील एकाचं नाव सुबैल पर्वत होतं. यावर असलेल्या विस्तृत मैदानावर राम रावण यांच्यात युद्ध झालं. त्या शेजारी असलेल्या नील पर्वतावर राक्षसांची निवासगृहे, महाल इत्यादी होतं आणि त्याशेजारी असलेल्या पर्वतावर असलेल्या अशोकवनात माता सीतेला रावणाने ठेवलं होतं आणि त्या तिसऱ्या पर्वताचं नाव सुंदर पर्वत होतं.
अर्थातच त्या पर्वतापर्यंत पोचताना वाटेत सुरसेच्या परीक्षेत सफलता मिळवून, लंकिनीचा पराभव करून, लंकेत प्रवेश मिळवून, सूक्ष्म रूप घेऊन मोठ्या पराक्रमपूर्वक हनुमंत या सुंदर पर्वतापर्यंत पोचून मातेची भेट घेऊन प्रभूंचा संदेश मातेपर्यंत पोचवण्याचं महान कार्य हनुमंताने केलं म्हणून या कांडाला महर्षी वाल्मीकींनी सुंदरकांड नाव दिलं. अर्थातच अश्या अविजीत लंका नगरीतील सर्वात अगम्य व गुह्य अश्या जागी पोहोचून सुंदर पर्वताचा शोध घेणाऱ्या महापराक्रमी हनुमानाच्या या कार्याची पावती म्हणूनच समर्थांनी हनुमंताला आणखी एक विशेषण वापरलं ते म्हणजे सुंदरा.
जगदंतरा. याचा अर्थ अनेक अंगांनी विषद करता येईल. हनुमंत हा समस्त जगताच्या अंतरंगाला व्यापून आहे. याचं मुख्य कारण म्हणजे प्रभू श्रीरामांचा त्यांना लाभलेला आशिष. ज्या ज्या ठिकाणी रामनामाचा जप चालू असेल, जिथे जिथे श्रीरामांचं गुणगान सुरू असेल, त्या त्या ठिकाणी हनुमंत कोणत्या ना कोणत्या रुपात अविरत असणारच. अशी ग्वाही प्रत्यक्ष प्रभूंनी दिली आहे. परंतु हे बाह्य अंगांनी जिथे श्रीराम नामाचा गजर, जाप, घोष असेल त्याबद्दल झालं. परंतु ज्या मनात हा जाप चालू असेल त्या मनातसुद्धा तो सदिच्छारुपात रामनामाच्या संकीर्तनाचा, जपाचा आनंद घेण्यास येतोच येतो.
म्हणूनच रामनामाच्या जपानंतर हनुमंताचं नाव घेऊन समाप्ती करणे. म्हणजे मनात कोणत्याही सूक्ष्म वा गुह्य रुपात अस्तित्वात असलेल्या हनुमंतापर्यंत हा जप व त्याचे नाम पोचेल. दुसऱ्या एका अर्थाने ज्याच्या अंतरंगात समस्त जगत सामावले आहे, तो हनुमंत. अजून एका अर्थाने हनुमंत श्वासोच्छ्वास स्वरूपात प्रत्येक प्राणिमात्रांच्या ठाई वास करून आहे, मरुत अर्थात वायूचा पुत्र असल्याकारणाने. या सर्व अर्थाने एक मात्र नक्की की मनुष्य ज्यावेळी सतत रामनाम घेत असतो, त्यावेळी हा श्वासोच्छ्वास स्वरूपातील वा जगत अंतरंगातील हनुमंत त्या जपाचा आनंद घेऊन, असा जाप करणाऱ्यास शुभाशीर्वाद देतो. अर्थातच नाम घेण्याचे इप्सित या अर्थाने साध्य होत जाते. म्हणून जगदंतरा.
क्रमशः भाग १० .....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
११/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९७०७६२१७९
Comments
Post a Comment