Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ११

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ११

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ||४||

 पातलादेवताहंता. इंद्रजित वधानंतर, रावण आता रामलक्षण यांना कशाप्रकारे परास्त करता येईल यावर विचार करत असताना, रावणाला अहिरावण आणि महिरावण या मित्रांची आठवण झाली. त्यांना त्वरित उपस्थित होण्याची आज्ञा होते. त्यांच्या सहाय्याने रावण, श्रीरामलक्ष्मण यांचं रात्रीत अपहरण करून, त्यांना पाताळात नेऊन, त्यांना कामाक्षी देवीला भल्या पहाटे बळी देण्याची योजना अहिरावण महिरावण यांनी केली आहे. 

अश्या परिस्थितीत विभीषणाच्या सल्ल्यानुसार आणि त्याने सांगितलेल्या मार्गाने पाताळात जाण्यास सिद्ध झाला. सप्त लोकांमधील सर्वात खालचा तळ म्हणजे पाताळ. त्या पाताळाचे भगवान अर्थात त्या लोकाचे स्वामी अहिरावण आणि महिरावण होते. त्या दोघांना मिळालेल्या वरदानाचा मान ठेवून त्या शर्तीत राहून भगवंताचं रक्षण करत, अहिरावण महिरावण यांचा वध करून त्यांचा बळी कामाक्षी देवीला अर्पण करून,  श्रीरामलक्ष्मण यांना सुखरूप युद्धक्षेत्री अर्थात लंकेत घेऊन आला. ते कार्य करतांना पाताळ लोकीचें दैवतासम असलेल्या दोन्ही रावण बंधूंचा नायनाट केला म्हणून पातालदेवताहंता. पातालदेवतांचं हनन करणारा.

भव्य सिंदूरलेपना. सिंदूर म्हणजे ज्याला आपण शेंदूर म्हणतो त्याबद्दलची एक कथा प्रचलित आहे. श्रीराम लक्ष्मण व सीता 
वनवास संपवून अयोध्येला ज्यावेळी परत आले, त्यावेळी एक दिवस हनुमंत माता सीतेच्या दर्शनार्थ मातेच्या महालात गेला. त्यावेळी माता आपल्या भांगात सिंदूर भरत होती. अर्थातच हनुमंताने उत्सुकतेने विचारलं की आपण हे का करत आहात. मातेने उत्तर दिलं असं केल्याने श्रीरामांचा अधिक  स्नेह मला मिळेल आणि त्यांचं आयुष्य वृद्धिंगत होईल. 

हे ऐकून हनुमंत काही विचार करून महालाबाहेर आला आणि आपल्या संपूर्ण अंगावर सिंदूर लेपुन, प्रभूंच्या समोर आला. प्रभूंनी महद आश्चर्याने कारण विचारलं. हनुमंत भोळ्या भक्तीभावात म्हणाला की चिमूटभर सिंदूराने आपला स्नेह मातेला मिळत असेल आणि आपलं आयुष्य वृद्धिंगत होत असेल, तर संपूर्ण देहावर सिंदूराने लेपन केल्यावर आपला स्नेह मला अविरत आणि संपूर्ण आयुष्यभर मिळेल आणि आपण अमर होऊन जाल. म्हणून मी हे केलं.

हे ऐकलं मात्र प्रभूंच्या लोचनांतून अश्रुधारा सुरू झाल्या, हनुमंताचा भोळा भाव बघून. प्रभूंनी पुढे होऊन मारुतीरायाला आलिंगन दिली. या हृदयीचा भाव त्या हृदयी पोहोचला आणि त्या हृदयीचा स्नेह अश्रूरूपात या हृदयी पोहोचला.  भक्त आणि भगवंत दोघांच्या नेत्रातून अखंड अश्रुधारा सुरू झाल्या. मातेसह भ्राता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्यासह संपूर्ण परिवार, अश्रूयुक्त नेत्रांनी, या स्नेहमय सोहळ्याचा साक्षी झाला. हनुमंताचा भव्य देह सिंदूरलेपनाने पुनीत झाला. म्हणून भव्य सिंदूरलेपना. 

लोकनाथा. आपल्या भक्ती शक्ती बुद्धी युक्ती यांच्या आधारे आपला धाक तिन्ही लोकांत प्रस्थापित करणारा हनुमंत तिन्ही लोकांत साधू सज्जन सामान्य जन यांचा नाथ अर्थात त्यांच्या कष्ट दुःख दैन्य ताप यांचं हरण करणारा आहे.  तीन लोक म्हणजे स्वर्ग अर्थात सप्तस्वर्ग, भूलोक आणि सप्तपाताल. तिन्ही लोकांमध्ये अजेय असा हा हनुमंत आहे. जगन्नाथा. वास्तविक हे विशेषण प्रत्यक्ष भगवान विष्णूंना उद्देशून संबोधलं जातं. अर्थात त्यांचं एक नामाभिधान आहे. परंतु आपल्या भक्ती आणि कार्यकर्तृत्वाने प्रत्यक्ष श्रीरामांच्या हृदयात कायमचं स्थान प्राप्त केलेला असा हा अंजनेय हनुमंत मारुती प्रत्यक्ष रामरूप होऊन जगन्नाथच आहे. समस्त ब्रह्मांडाचा नाथ अर्थात स्वामीचं आहे. लोकनाथ जगन्नाथा. 

क्रमशः भाग ११ ..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१२/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९७०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...