Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २९ व अंतिम

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २९ व अंतिम 

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
 
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | 
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||

पंधरा श्लोकात मांडलेलं मारुतीस्तोत्र. म्हणजे तेरा श्लोकात स्तोत्र आणि दोन श्लोकात फलश्रुती सांगून समर्थ सोळाव्या श्लोकात त्याचं पठण कसं करावं हे संख्या चंद्रकळा गुणे यात पद्धत सांगून समाप्तीच्या श्लोकात हनुमंताचं कौतुक करणारे तीन सुंदर अलंकारिक शब्द वापरतात. 

रामदासी अग्रगण्यू. अर्थात रामाच्या दासांमध्ये म्हणजेच रामाच्या भक्तगण, साधक, रामाला श्रद्धेने पुजणाऱ्या भजणाऱ्या जनांमध्ये अग्रणी अर्थात अग्रेसर असणारा. म्हणजेच रामभक्तां मध्ये श्रेष्ठ असणारा. ही उपाधी समर्थ नक्कीच हनुमंताचं संपूर्ण जीवनकार्य पाहून आणि अभ्यासून जाणीवपूर्वक देतात. हनुमंत हा श्रीरामांचा दास, भक्त, सखा, भरतासम, हृदयस्थ, सर्वात जवळचा जणू आत्माच आहे. इतकं विलक्षण एकरूप हनुमंताने स्वतःला श्रीरामामध्ये सामावून घेतलंय.  इतकी श्रेष्ठ भक्ती रोमारोमात रामनाम भिनवून सिद्ध केली आहे. म्हणून रामदासी अग्रगण्यू.

कपिकुळासि मंडणू. हनुमंत हा कपी कुळातील आहे. कपी म्हणजे पारंपारीक अर्थाने वानर. खरतर त्रेतायुगात नरांहून श्रेष्ठ, बलवान, बुद्धिवान, श्रद्धावान आणि प्रसंगी वालीसारखा वानरराज रावणासारख्या असुरराजालासुद्धा काही काळ आपल्या बगलेत दाबून ठेवू शकतो, यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज येऊ शकेल. त्याच कपी अर्थात वानर कुळात जन्म घेतलेला हनुमंत आपल्या शक्ती, बुद्धी, युक्ती, नीती, भक्तिभाव याद्वारे समस्त वानरकुळाचं भूषण अर्थात अलंकार ठरला. मंडण म्हणजे सजावट वा अलंकार आणि मंडणू म्हणजे अलंकारासम ठरलेला. हे श्रेष्ठत्व पूर्ण स्वकर्तृत्वावर सिद्ध केलेला कपिवीर हनुमंत आहे हेच समर्थांना सांगायचं आहे.

रामरूपी अंतरात्मा. ज्यांच्या रोमारोमात, बुद्धीत, मनात आणि आत्म्याच्या ठाई राम आणि रामच सामावलेला आहे. अर्थात ज्याच्या हृदयी विराजित असलेल्या अंतरात्म्याचा प्रकाश, तेज, ओज फक्त आणि फक्त श्रीरामच आहे. ज्याने समस्त जगतात फक्त श्रीराम पाहिले, ज्याला श्रीराममय जग सोडून अन्य काही दिसत नाही आणि ज्याने श्वासाश्वासात फक्त श्रीरामनाम जपलं आहे. असा हा रामाच्या अंतरंगात आपला अंतरंग हरवून अभिन्न झालेला हनुमंत आहे. 

दर्शने दोष नासती. अश्या या श्रीरामभक्तांमध्ये अग्रेसर श्रेष्ठ, कपी अर्थात वानरकुळामध्ये भूषण आणि ज्याचा अंतरात्मा रामरूप आहे, ज्याच्यात आणि श्रीरामांच्यामध्ये भिन्नत्व करता येणार नाही, अश्या रामरूपी हनुमंताच्या नित्य दर्शनाने, व विधिवत सांगितल्याप्रमाणे केलेल्या मारुतीस्तोत्राच्या पठणाने समस्त मारुतीभक्तांचे सर्व दोष नष्ट होतील असा आशिर्वाद समर्थ या स्तोत्राचं नित्य पठण करणाऱ्यांना देतात. सर्व दोष म्हणजे प्रारब्धात असलेले, संचितात आलेले आणि कर्माने याजन्मी प्राप्त केलेले. 

तरीही समर्थांना अभिप्रेत असलेली अथवा मला जाणवलेली पद्धत जी २८व्या भागात मांडली आहे, ती न साधल्यास एकवेळा नित्य पठण जरूर करावे.  

ह्या मारुतीस्तोत्राचा भावार्थ आपण गेल्या २८ व या एकोणतीसाव्या भागात पाहिला. मी माझ्या अल्पमती व अल्पज्ञानाने, परंतु माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पूर्णकृपेने, सादर करण्याचा प्रयत्न केला. तरीही काही न्यून असल्यास उदार मनाने वाचकांनी क्षमा करावी. कारण परमेश्वर स्वतः वाचकरुपात साधकांची नित्य परीक्षा घेत असतो असा माझा दृढ विश्वास आहे. म्हणून परमेश्वर, सद्गुरू आणि वाचक तिघांनाही वंदन करून हा भावार्थ इथेच समाप्त झाला हे नोंदवतो. 

याठिकाणी समर्थ रामदासस्वामी कृत मारुतीस्तोत्राच्या भावार्थ कथानाची लेखमाला समाप्त होत आहे. 

या प्रवासात अनेक गोष्टी खोलात शिरून पाहता आल्या. अनेक गहन व गूढ शब्दांचे अभिप्रेत असलेले अर्थ शोधण्याचा प्रयत्न आपण केला. अर्थात तो प्रयत्न किती यशस्वी झाला हे वाचक व समर्थ ठरवतील. पण मी मात्र प्रामाणिक प्रयत्न केले. इथपर वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया व सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्यामुळेच मला लिहिते ठेवले. 

इथे अजून एक गोष्ट सांगताना आनंद होत आहे की, रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र भावार्थ यांचं एक सामायिक पुस्तक वा पुस्तिका काढायचा प्रयत्न चालू आहे. लवकरच त्यासंबंधी घोषणा इथेच करीन. परंतु ज्यांना आगाऊ नोंदणी करायची वा नाव देऊन ठेवायचं असेल त्यांनी आज सांगितल्यास त्याप्रमाणे कमीतकमी प्रतीच्या छपाईचा विचार करता येईल. इथेच अथवा लेखाखाली दिलेल्या व्हाट्सऍप क्रमांकावर सांगू शकता. 

या पुढील विवेचनाचा विषय हा समर्थकृत करुणाष्टके घेत आहे.  ती लेखमाला लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असेल. 

भाग २९ व अंतिम 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
३०/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...