मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १३
सर्वांना दिपावलीच्या मंगलमय अर्थपूर्ण आणि हर्षदायी शुभेच्छा. ही दिपावली सर्वांचा आनंद द्विगुणित व अर्थ पंचगुणीत करणारी जावो, हीच रामरायाचरणी प्रार्थना.!!
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
पावन या शब्दाचा अर्थ पवित्र शुद्ध निर्मळ स्वच्छ स्फटिका सम. मुळात पावन हा शब्द दोन शब्दांची संधि आहे, पौ आणि अन म्हणजे पावन. पौ म्हणजे पहाटेचा संधीप्रकाश आणि अन म्हणजे श्वासप्रश्वास किंवा विना. म्हणजे या विच्छेदाप्रमाणे पावन म्हणजे ज्याचा श्वासप्रश्वास हा पहाटेच्या संधीप्रकाशाप्रमाणे शुद्धस्वरूप आहे, निर्मळ आहे, तो म्हणजे पावन. कारण पहाटेची संधीप्रकाशाची वेळ ही संपूर्ण दिवसातील सर्वात शुद्ध आणि निर्मळ वेळ मानली जाते.
त्यावेळी कोणत्याही प्रकारची अशुद्धता असत नाही. श्वासाला लाभलेली त्या हवेतील प्राणवायूची शुद्धता अंतरात्मा आनंदित करून जाते आणि सर्व दिवस तो आनंद टिकून राहतो. हा फक्त शास्त्रार्थ नाही तर आपला अनुभवसुद्धा आहे. म्हणून ज्यांचं अंतःकरण शंभर टक्के शुद्ध आहे, त्याच्या वृत्तीची तुलना पहाटेच्या या पवित्र वातावरणाशी करून पावन हा सुंदर शब्दप्रयोग करणारे भाषा व शब्दरचना कार नक्कीच वंदनीय आहेत.
अश्या निर्मळ पवित्र शुद्धतेचा संगम ज्याच्या नसानसात, रोमारोमात व श्वासाश्वासात आहे असा हा हनुमंत नक्कीच पावन आहे. खूप वेळा पावन या शब्दाचा संबंध पवन या शब्दाशी चुकीच्या पद्धतीने जोडण्यात येतो. पण वरील शब्दविच्छेद पाहिल्यावर पावन या शब्दाची निर्मलता जास्त अधोरेखित होते हे नक्की.
परितोष म्हणजे इच्छापूर्तीने येणारी प्रसन्नता वा मिळणारा आनंद. परितोष हा शब्द परी आणि तोष या शब्दांचा मिळून तयार होतो. परी म्हणजे आत्यंतिक, सर्वसमाविष्ट, आमूलाग्र इत्यादी आणि तोष म्हणजे संतोष तुष्टी तुष्टता. हा संतोष असा जो कोणत्याही भौतिक गोष्टींच्या पार आहे. तोषोनी मज द्यावे पसायदान हे. संत ज्ञानेश्वर पसायदानाच्या शेवटी सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्याकडे मागतात, तेंव्हा ते तोषणे म्हणजे असे समाधान जे आधिभौतिक गोष्टींपालिकडे आहे. अश्या समाधानानंतर वा संतोषाउपरांत येणारी प्रसन्नता माणसाला सर्व सिद्धींपर्यंत पोहोचवते.
अश्या प्रकारचे समाधान, संतोष, तृप्तता मिळवून देणारा जो तो परितोषक. हे पारमार्थिक, समाधान प्राप्त करून देणारा हनुमंत आहे. जे समाधान संतोष तृप्तता युगानुयुगे तप केल्यानंतर देखील प्राप्त होत नाही. परंतु तेच हनुमंताच्या भक्तीने हनुमंत सहजी मिळवून देतो. त्या संतोषाच्या प्राप्तीनंतर येणारी प्रसन्नता हा हनुमंताच्या भक्तीचा परिपाक आहे. अश्या हनुमंताला साद घालताना समर्थ आर्जवाने म्हणतात परितोषका. मला भक्तीची, जगताच्या पलीकडील अलौकिक संतोषानन्तरची प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या हनुमंता.
ध्वजांगे उचली, बाहो. खरतर ही विशेषणं महाभारत युद्धातील अर्जुनाच्या रथावर ध्वजाच्या रुपात वा ध्वजावर, हनुमंत, श्रीकृष्णाची आज्ञा म्हणून, स्थापित झाला आणि अठरा दिवसांच्या युद्धात त्याने रथाचे संरक्षण केले, अश्या अर्थाने आहे, असं बऱ्याच विवेचनात वाचलं. मी स्वतः या मताशी सहमत नाही. कारण संपूर्ण आयुष्य हनुमंताच्या श्रीरामांच्या संदर्भातील अथवा रामायणातील पराक्रमाचं गुणवर्णन करणारे समर्थ एकदम महाभारतातून संदर्भ घेतील असं मला वाटत नाही.
कोणत्याही युद्धात ध्वज महत्वाचा असतो व ध्वजरक्षक तुकडी तितकीच महत्वाची असते. विशेष करून ही ध्वजरक्षक सेना युद्धभूमीवर अग्रेसर असते. त्याचप्रमाणे तिच्या संरक्षणासाठी खास व्यक्तींची नेमणूक केली जाते. तदनुसार महाभारत युद्धात तशी व्यवस्था हनुमंताकडे नव्हती तर फक्त अर्जुनाच्या ध्वजावर स्थापित राहून त्याने ध्वजाचं पर्यायाने रथाचं संरक्षण करावं हा उद्देश श्रीकृष्णांचा होता.
परंतु पुढील दोन शब्दांनी हा संदर्भ महाभारताशी तितकासा जुळत नाही, हे लक्षात येईल. आवेशे लोटला पुढे. यामध्ये हनुमंताची हालचाल वा आक्रमक पावित्रा आणि हल्ला करण्याची वृत्ती आणि कृती सूचित होते. परंतु महाभारत युद्धात हनुमंताला फक्त रक्षण इतकंच कार्य होतं. स्वतःहून काहीही करण्याची मुभा व आज्ञा श्रीकृष्णांनी दिली नव्हती. म्हणून श्लोकातील हा भाग महाभारताशी जुळत नाही असं माझं मत आहे, कारण समर्थ संदर्भहीन दोन काळातील वा युद्धातील दोन गोष्टी एके ठिकाणी मांडतील हे संभवत नाही.
पण मग श्लोकाचा हा भाग, रामायणाशी कसा जुळतो ते पुढील भागात पाहू.
क्रमशः भाग १३.....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१४/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९७०७६२१७९
Comments
Post a Comment