मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १४
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
रामरावण युद्धात श्रीरामांच्या सैन्यातील ध्वजरक्षक तुकडीच्या संरक्षणासाठी सिद्ध झालेल्या हनुमंताने सदर सेनेसह ध्वजाचं रक्षण स्वशिरावर घेऊन आपल्या समर्थ वज्रबाहूंच्या साहाय्याने महाबलिष्ठ आणि महापराक्रमी राक्षस सेनेपासून त्या ध्वजाचे रक्षण तर केले. कारण कोणत्याही युद्धात ध्वज हा जणू त्या सेनेच्या नायकाच्या प्राणासमान महत्वाचा असतो. म्हणूनच त्याचं रक्षण करणाऱ्या अंगाचं अर्थात सैन्याच्या एका अंगाचं अथवा विभागाचं किंवा भागाचं रक्षण हनुमंताने प्राणपणाने केलंच.
परंतु हे करत असताना प्रत्यक्ष युद्धात महत्वपूर्ण सहभाग देखील घेतला. या ध्वजरक्षणासाठी प्रसंगी आवेशाने पुढे जात, त्या दिशेने येणाऱ्या असुरांना परास्त करण्याचं अथवा रोखण्याचं कार्यदेखील हनुमंताने केलं. समस्त सैन्याच्या रक्षणार्थ आणि उत्तेजनार्थ सुग्रीव, अंगद, नल, नील जांबुवंत यांसारखे बलाढ्य आणि पराक्रमी वीर उपस्थित होते. हनुमंत देखील सैन्याच्या चहू अंगांनी देखरेख ठेवून होता.
तरीही ध्वजाच्या अंगाची (ध्वजांगे) अर्थात बाजूची म्हणजेच भागाची विशेष जबाबदारी हनुमंत सांभाळून होता(उचली, उचलून धरणे म्हणजे सांभाळून घेणे. मराठीत आपण एखाद्याची बाजू घेणे याला तळी उचलणे म्हणतो त्या अर्थाने उचली). त्याबाजूसह संपूर्ण सैन्यात आपल्या विरश्रीयुक्त आवेशाने(आवेशे) जोश व जोर निर्माण करतानाच पुढे होऊन (लोटला पुढे), हल्ला करणाऱ्या बलशाली वाटणाऱ्या तसेच डोईजड असुरांना यमसदनी धडण्याचं सत्कार्य हनुमंत करत होता.
त्याच्या या अष्टपैलू कामगिरीबद्दलच गौरवपूर्ण शब्दात वरील वाक्य समर्थांनी वापरलं आहे, ध्वजांगे उचली, बाहो, आवेशे लोटला पुढे. बाहो शब्दाचा एक अर्थ बाहू अर्थात शरीराचा भाग आणि दुसऱ्या अर्थाने बाजू म्हणजे सैन्याची इतर बाजू. ध्वजधारी अंग म्हणजे भाग वा तुकडी आणि इतर बाजू हे सर्व अष्टपैलू विराप्रमाणे संभाळून, आवेशाने, त्वेशपूर्ण व जोशपूर्ण चढाया करून असुरमर्दनाचं कार्य करत असलेला हनुमंत.
काळाग्नी काळरुद्राग्नी. श्लोक ५ ते ८ हे माझ्या अनुमाना नुसार युद्धातील हनुमंताचा आवेश, युद्ध करतानाची त्याची चपळता, कर्तृत्व, रणनीती, कुशलता, शक्ती आणि युक्ती यांचा अचूक वापर या संदर्भातील असावीत. म्हणून यांचं विश्लेषण त्या अनुषंगाने करावं लागेल.
काळ व अग्नी ही विनाशाची प्रतिरूपं आहेत. दोघेही कठोरपणे नाश घडवून आणतात. अर्थातच विनाशाची यांची शक्ती अजोड आहे. असा नाश सर्वसामान्यपणे मृत्यूच्या वेळी व विनाशकाली प्रत्ययास येतो. असा विनाश सृष्टीच्या प्रगती व चांगल्याकरता कठोरपणे घडवावा लागतो. तिथे कोणतेही भाव ठेवून चालत नाहीत. म्हणूनच सृष्टीकर्त्याने त्यांना भावनारहित शक्ती प्रदान केली आहे.
या दोघांबरोबर रुद्र अर्थात शिवशंकर यांना देखील विनाशाची अफाट, अचाट व अमर्यादित शक्ती प्रदान करण्यात आली आहे. रुद्राची ही शक्ती मुख्यतः प्रलयकाली सृष्टीचा सर्वनाश करण्यासाठी वापरावी लागते वा वापरली जाते. तशी कठोरता रुद्राच्या ठिकाणी आहे, हे आपण जाणतो. परंतु प्रस्तुत रामरावण युद्धातील हनुमंताचा आवेश,जोश, त्वेष, ओज, तेज, ऊर्जा शक्ती, बल बघून व असुर विनाशाची कार्यशैली बघून प्रत्यक्ष काळ अग्नी जे सर्वसामान्य परिस्थितीत विनाश घडवतात व काळ रुद्र व अग्नी जे प्रलंयकाळी विनाश घडवतात, ते देखील भयभीत होऊन हनुमंताचं क्रौर्य, शौर्य पहात आहेत.
अर्थातच असुरांना यमसदनी घेऊन जाण्यास आलेले यमदूतसुद्धा हनुमंताच्या या रौद्र रुपाला भयभीत होऊन पहात आहेत. इतकी भीषणता त्या वीरश्रीयुक्त हनुमंत रुपात त्यावेळी पहावयास मिळत होती. अश्या हनुमंताला शरण जावे ज्याला काळ रुद्र व अग्निदेखील घाबरत आहेत. परंतु सज्जन रक्षणार्थ कटिबद्ध असलेल्या हनुमंताच्या या रुपाला भक्तांनी निरंतर नित्य भजावे. कारण भक्तांसाठी हे रूप पुण्यकारक आहे.
क्रमशः भाग १४.....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१५/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९७०७६२१७९
Comments
Post a Comment