श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग २०
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम् ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥
श्रीरामाला शरण जाऊन आत्मउद्धारासाठीची प्रार्थना श्रीबुधकौशिक ऋषी श्रीरामरक्षा समाप्तीच्या निमित्ताने मांडतात.
राजमणि म्हणजे राजांचे मुकुटमणी अर्थात सर्व राजांमध्ये प्रिय असलेले. असे हे प्रभुश्रीराम हे सदोदित विजयी होतात. त्यांचा कधीही पराभव झालेला नाही. सर्व प्रकारच्या वाईट, विघातक, नकारात्मक शक्तींवर त्यांनी विजय मिळवला आहे. असे या रमा अर्थात लक्ष्मीदेवींचे ईश असलेले श्रीराम यांना मी नित्य भजतो, त्यांचं नित्य स्मरण करतो.
अभिहता म्हणजे ताडन करणे, मारणे, मृत्यूला प्राप्त करून देणे. निशाचर चमू म्हणजे राक्षससेना. अश्या अनेक अगणित राक्षसगणांच्या सेनेला नष्ट करणाऱ्या अश्या श्रीरामांना मी नमन करतो. परायण म्हणजे शरण देणारा वा शरण घेता येणारे स्थान आणि परतरं म्हणजे याहून भिन्न वा श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. अर्थात हा शब्द गीतेतसुद्धा स्वतः श्रीकृष्णाने सातव्या अध्यायात सातव्या श्लोकात हा शब्द वापरला आहे.
" मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव॥"
अर्थात हे धनंजया माझ्याहून भिन्न अर्थात श्रेष्ठ या जगतात दुसरं काही नाही. हे सर्व जगत एका मणींच्या माळेप्रमाणे गुंफून एखाद्या सूत्राप्रमाणे माझ्यामध्ये बांधले वा गुंफले गेले आहे. या श्लोकाबद्दल माझं अस विश्लेषण आहे या श्लोकात आकाशगंगारूप हे ब्रह्मांड एखाद्या सूत्राप्रमाणे म्हणजे एखाद्या विशिष्ट नियमाने कसं बांधलं आहे ते भगवंत सांगत असतील. यात खगोलशास्त्राचं खूप मोठं रहस्य दडलं असावं असा माझा कयास आहे. माणिगणा म्हणजे आकाशगंगा गँँलँक्सि असा अर्थ मला अभिप्रेत आहे. असो, यावर पुन्हा कधीतरी सवडीने विवेचन करीन.
म्हणजे श्रीरामांच्या इतके श्रेष्ठ स्थान शरणागत होण्यासाठी अन्य दुसरे नाही. अश्या या श्रीरामांचा मी दास आहे. त्यांचं सर्वकाळासाठी आयुष्यभरासाठीचं दास्यत्व मी पत्करतो. अश्या श्रीरामांच्या ठायीच माझे चित्त सदैव राहो अशी दृढ भावना राहो, हे साध्य होवो, भवतू मे आणि अश्याप्रकारे मी शरण गेल्यानंतर श्रीराम माझा सर्वप्रकारे उद्धार करोत.
अर्थात सर्व राजांचे मणी श्रेष्ठ मान्यताप्राप्त असलेले श्रीराम जे सदैव विजयी आहेत अश्या रमा ईश असलेल्या श्रीरामांना मी नित्य भजेन. संपूर्ण राक्षस समूहाच्या सेनेचा विनाश करणाऱ्या श्रीरामांना माझा प्रणाम आहे. श्रीरामांच्या चरणाइतके शरण जाण्यायोग्य श्रेष्ठ स्थान दुसरे नाही. अश्या श्रीरामांचं दास्यत्व मी स्वीकारतो. माझ्या चित्तात सदैव त्यांचाच वास असुदे. अशी प्रार्थना करून मी श्रीरामांना नित्य स्मरतो आणि ते माझा उद्धार करोत असा आर्जव त्यांच्या चरणी मी करतो.
श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏
भाग २०.....
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
३०/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment