Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १७

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १७

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||

पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | 
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | 
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

किरीट म्हणजे मुकुट जो हनुमंताच्या मस्तकावर विराजित असल्याचं, आपण प्रतिमस्वरूपात नेहमी पाहतो. सुवर्णाचे मुकुट अर्थात किरीट त्याकाळी राजे राजवाडे, त्यांचे अधिकारी, प्रधान, सेनापती इत्यादीनी  घातलेले, अर्थातच प्रतिमेत, आपण पाहतो. त्याशिवाय अनेक ऐतिहासिक, पौराणिक दस्तऐवजातून वाचायला मिळतं. 

इथे समर्थ किरीट हा शब्द न वापरता किरीटी हा शब्द वापरतात. त्याचा मतितार्थ असा आहे की किरीटावर. याचा संदर्भ अर्थातच पुढच्या शब्दाला धरून आहे. किरीटावर कुंडले म्हणजे कानात पुरुषांनी घालायचा दागिना. ज्याची घडण रेखीव पण दमदार आणि त्या त्या पुरुषाची शरीरसंपदा, शौर्य, पराक्रम, समाजातील स्थान, वर्णव्यवस्था या सर्वांवर अवलंबून असायची. 

हनुमंताने मस्तकी किरीट आणि त्या किरीटावर बरी म्हणजे शोभून दिसणारी, शोभिवंत, सुशोभित अशी कुंडलं आपल्या कानात घातली आहेत. बरी या शब्दाचा अजून एक अर्थ आहे मोठी. अर्थातच वज्रबाहू आणि अत्यंत धष्टपुष्ट शरीरसंपदा असलेल्या हनुमंताच्या कानात त्याला शोभतील अशीच कुंडले असली पाहिजेत. म्हणूनच बरी या शब्दाच्या दोन्ही अर्थाने सुशोभित म्हणजे त्याच्या देहाला शोभून दिसतील अशी कुंडले किरीटावर हनुमंताने घातली आहेत.

कटीला अर्थातच कंबरेला सुवर्णवस्त्राच्या पट्ट्या लावलेली कांसोटी, कटीवस्त्र अर्थात अधोवस्त्र हनुमंताने परिधान केलं आहे. त्या वस्त्रावर अर्थातच कटीला जो कडदोरा आहे त्याला छोट्या छोट्या घंटीका लावलेल्या आहेत. त्या घंटीकांचा किणकिण असा सुमधुर, मंजुळ ध्वनी उमटतो आहे. जणू त्या नादात विश्वाचा आवाजच लपला व लोपला आहे असा भास होतो आहे. संपूर्ण नगराला व्यापून उरणारा तरीही मंजुळ असा त्याचा नाद उमटत आहे. नागरा असा शब्द आहे खूप जण नगारा असाही उच्चारतात. 

नागरा म्हणजे नागर अर्थात नगर आणि नागरा म्हणजे नगरात. जसं आपण म्हणतो नागरिक नगरातील जन असा त्याचा अर्थ किंवा विस्तार आहे. त्याचप्रमाणे नागरा म्हणजे नगरात, अर्थात आजूबाजूच्या प्रदेशात त्या कटीवर असलेल्या कडदोऱ्यावर असलेल्या घंटीकांचा  स्वर, नाद निनादत आहे.

ठक म्हणजे धीट, न भिणारा. त्यावरून जो चारचौघात उद्धटपणे वागतो बोलतो त्यालाही ठक म्हणायची पद्दत पडली आणि ठक हा शब्द धिटाई करणाऱ्या माणसाला वापरला जाऊ लागला. त्यावरूनच समर्थांनी ठकासी ठक उद्धटासी उद्धट हा श्लोक लिहिला. परंतु याचाच एक अर्थ जो धीट आहे जो कोणालाही ,विशेषतः दुर्जन दुष्ट, दुराचारी दुरात्म्यांना भीत नाही असा. अर्थात जो अश्या दुर्जन लोकांसमोर धीटपणे उभा ठाकतो तो हनुमंत. रामरावण युद्धात अनेक बलवान, महावीर, पराक्रमी, देवांनाही अजेय असलेल्या असुर, दानवांपुढे ढिटाईने, अभयपणे उभा ठाकला तो हनुमंत.

तो आपल्या विराट स्वरूपाने असा उभा ठाकला की जणू एखादा पर्वत मेघांच्या मार्गात उभा राहून त्यांना खाली उतरण्यास भाग पाडतो, तसाच हनुमंत त्या पर्वतासम विराट रूप घेऊन आणि त्याच शक्तीने, स्वरूपाने असुरांसमोर उभा ठाकला आहे. अश्या हनुमंताला समर्थ प्रणाम करतात ते याच कारणासाठी. 

क्रमशः भाग १७..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१८/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९७०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...