मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २५
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
खगोलीय ज्ञानाचा, विज्ञानाचा आणि आध्यत्मिक ज्ञानाचा असा सर्वप्रकारचा उत्तम स्वयंपाक समर्थांनी मारुतीस्तोत्र रुपात मांडलाय, हे तर आतापर्यंत आपल्याला लक्षात आलं असेलच. त्यापासून थोडं बाजूला होऊ.
मारुतीस्तोत्र म्हणजे काय तर, आपलं सर्वांचं आराध्य असलेला हनुमंत जन्मतः सूर्याला गिळंकृत करून आपल्या शक्तीची चुणूक दाखवून पुढील आयुष्य काय असेल याचाच प्रत्यय जगताला देता झाला, याची महती आहे.
अनेक दिव्य शक्ती प्राप्त हनुमंत शून्यमंडळ अर्थात गुरुत्वाचा परीघ भेदून उत्तरेच्या बाजूने पृथ्वीच्या परिघाबाहेर गेला, असा याश्लोकाचा सरळ अर्थ आहे. पण यात हे नक्कीच सिद्ध होतं की, समर्थांना, शून्यमंडळ माहीत असल्याने गुरुत्वाकर्षण नक्कीच माहीत होतं. अर्थात यात हनुमंताची महती अजून द्विगुणित होते. पृथ्वीकक्षेबाहेर जाऊन सुर्यापर्यंत झेपावत हनुमंताने ते लाल बिंब धरण्याचा यत्न केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून इंद्रदेवाने वज्रप्रहार केला.
सर्वसामान्यतः नरदेही माणूस वज्रप्रहाराने यमसदनी जायला हवा होता. त्यात इथे तर एक बालक. परंतु वज्रप्रहाराने हनुवटीवर वार लागून बालक सुर्यमंडळातून खाली येऊन पृथ्वीवर पडले. पवन अर्थात पिता रुष्ट झाल्यामुळे मिनतवाऱ्या करून वरदान व विशेष शक्ति प्राप्त करून हनुमंत यातून सुखरूप बाहेर पडले.
फक्त हनुवटीवर त्याचा परिणाम बाकी राहिला आणि हनुमंत वा हनुमान नावाने प्रसिद्ध झालेले हेच ते बालक मारुतीराया. महारुद्र, महाबलशाली, महावीर असा पवनपुत्र पुढे घडला त्याचं बीज या लहानपणीच्या पराक्रमात आहे. मुळात पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जाऊन पुनः येणं हे एका जन्मलेल्या मुलाला जमणं हाच खूप मोठा पराक्रम होता आणि आहे.
इथपर्यंत मारुतीची स्तुतीपर प्रार्थना करून झाल्यावर समर्थ, अर्थातच एक ऋषितुल्य व्यक्तित्व आणि अलौकिक सत्पुरुष असल्याकारणाने स्तोत्राचे नियम म्हणून नव्हे तर हनुमंताच्या भक्तीची प्रचिती म्हणून फलश्रुती स्वरूपात दोन श्लोक मांडतात. त्यातील श्लोक क्रमांक १४ मध्ये शारीरिक व भौतिक प्राप्तीबद्दल सांगून, श्लोक क्रमांक १५ मध्ये मानसिक प्राप्तीबद्दल फलादेश समर्थ सांगतात.
श्लोक १४ प्रमाणे धन धान्य अर्थात ऐहिक सुख आणि अन्नपण्याची ददाद राहणार नाही, पशुवृद्धी अशी फलप्राप्ती होईल हा मतितार्थ शब्दातून प्रकट होतो. परंतु ऐशआरामी जीवनाचा कधीही पुरस्कार न करणारे समर्थ अशी फलश्रुती कधी लिहितील हे संभवत नाही. त्यांनतर पुत्रपौत्र समग्रही असाही संदेश यातून देतात. परंतु या सर्वांचं उत्तर पुढच्याच ओळीमध्ये समर्थांनी दिलंय. सरळसरळ न सांगता वळवून सांगितलं. पावती रुपविद्यादी स्तोत्रपाठे करोनिया.
रूप या शब्दाचा अर्थ सुंदरता या अर्थी नाही हे नक्की. कारण समर्थांसारखा महापुरुष बाह्य सौन्दर्याला महत्व देईल असे संभवत नाही. रूप म्हणजे स्वरूप अर्थात अंतरंग. या स्तोत्राच्या नित्य पठणाने, त्यातील शब्दांचे, योग्य उच्चारांचे घण मनावर शरीरातील योग्य त्या बिंदूंवर, कुंडलिनीच्या सातही केंद्रांवर, उच्चारांवर, जिव्हेवर, नासिकेद्वारे मस्तिष्का अर्थात मेंदूवर, मेंदूतील पेशींकेंद्रांवर, श्रवणकेंद्रावर, शरीरातील इतर इंद्रियं व अवयवांवर पडून त्यांचं चलनवलन सुधारून शरीराची कार्यक्षमता नियंत्रित होईल. त्याद्वारे शरीरातील अंतर्गत व्यवस्था सुधारून कार्य सुनियंत्रीत होईल.
मेंदूची कार्यक्षमता सुधारून त्याचा परिणाम अभ्यास, शिक्षण, स्मरणशक्ती, बौद्धिक संपदा व क्षमता यांच्या कार्यात सकारात्मक बदल घडून, त्याचा फायदा शिक्षणात नक्की मिळेल. मारुती स्तोत्राच्या नित्य पठणाने सुयोग्य संस्कार घडून, समाजाकडे, स्रीवर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप व सशक्त होऊन मनाचं सौन्दर्य प्राप्त होईल. असा खूप मोठा गर्भित अर्थ पावती रुपविद्यादी या शब्दांमध्ये आहे.
क्रमशः भाग २५.....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२६/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment