Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १६

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १६

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||

 ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | 
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||

पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | 
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||

आपल्या विस्फारलेल्या डोळ्यात ब्रह्मांडे मावतात हे दाखवून असुरांना भयकंपित करून सोडणाऱ्या हनुमंताचा युद्धातील पवित्रा सांगताना समर्थ पुढील वर्णन करतात. आवळे दंतपंगती. शत्रूवर विशेषतः माता सीतेल्या अपहृत करून श्रीरामांना त्रस्त करून सोडणाऱ्या राक्षस, असुर व दानावांवर तुटून पडणाऱ्या हनुमंताच्या मनातील हा सर्व राग, हनुमंत  आपल्या कृतीतून व्यक्त करताना, निसर्गतः दात ओठ खाऊन आवेशात पुढे जाऊन तुटून पडतोय हेच समर्थांना सुचवायचं आहे. 

प्रत्यक्ष हल्ल्याला प्रतिहल्ल्याने उत्तर देतांना, सात्विक संताप व तामसी क्रोध यात फरक आहे हे जाणून असणारे समर्थ हनुमंताच्या रौद्र रुपाचं मात्र अचूक वर्णन करतात. ध्वजासह सैन्याच्या इतर बाजूना सांभाळत समोरून येणाऱ्या असुरांवर आवेशाने तुटून पडत, प्रत्यक्ष यमदूतांना भय वाटेल अश्या पद्धतीने प्रतिहल्ला करणाऱ्या हनुमंताच्या नेत्रात, प्रत्यक्ष अनेक ब्रह्मांडे सामावली आहेत असा आभास निर्माण होत आहे. असुरांवर तुटून पडणाऱ्या हनुमंत दात ओठ खात आवेशात पुढे निघाला आहे. 

असुर सैन्यावर दात ओठ खाऊन तुटून पडलेल्या हनुमंताच्या नेत्रात अक्षरशः ज्वाळा अर्थात अग्नी बाहेर पडत आहे, असंच दिसत आहे. हे दृश्य परम भयावह आहे, अर्थातच असुरां साठी. हनुमंताच्या युद्धस्वरूप चर्येचं वर्णन करताना समर्थ पूर्णस्वरूप सांगतात की, त्याच्या भुवया अर्थात भृकुटी ताठरल्या आहेत अर्थात सहसा वक्राकार वा धनुष्याकार असलेल्या भुवया, ज्यावेळी डोळे विस्फारले जातात, त्यावेळी ताठ अर्थात सरळ होतात.  भुवया अश्याप्रकारे, राग आश्चर्य इत्यादी भाव प्रकट करताना होतात. अर्थातच युद्धातील हनुमंत असुरमर्दनात दंग असल्याने त्याच्या भुवया रागाने सरळ अर्थात ताठ झाल्या आहेत. 

हनुमंताच्या या वीररसयुक्त युद्धातील आवेशाचे अचूक वर्णन केल्यानन्तर, हनुमंताच्या सामान्य रुपाचं वा स्वरूपाचं वर्णन समर्थ करतात. त्याचं पुच्छ अर्थात शेपूट माथ्याच्या दिशेने म्हणजेच शरीराच्या वरील बाजूकडे उभं राहिलं आहे. अर्थातच हा हनुमंताचा सहज स्वभाव आहे. मुळात जे जीव या भुवर आहेत आणि त्यात  ज्यांना पुच्छ अर्थात शेपूट असतं, त्यातील फार थोडे प्राणी आहेत, जे आपलं शेपूट नेहमी वरच्या बाजूने उचलून धरतात. त्यातील जे प्राणी आक्रमक पण हिम्मतवान आहेत त्यांची शेपटी कधीही जमिनीकडे झुकत नाही. यात त्यांचा आक्रमक स्वभावधर्म वा सहजप्रवृत्ती दिसून येते.

हनुमंत हा अर्थातच आक्रमक, पराक्रमी, शूर, हिम्मतवान, बलवान व निडर या प्रवृत्तीचं प्रतीक आहेत. वानर अर्थात पुच्छ असलेल्या प्राणीमात्रांमध्ये त्यांची गणना होत असे. एकूणच वानरगण शूरवीर आणि पराक्रमी होतेच. परंतु त्या सर्वांमध्ये हनुमंत विशेष ताकदवान, शूर, निडर असल्या कारणाने त्यांचे पुच्छ हे सिंहाप्रमाणे नेहमी माथ्याच्या अर्थात वरील बाजूकडे उभे राहिलेले असते, असेच समर्थांना सुचवायचे आहे. त्यायोगे हनुमंताच्या वीरवृत्तीचा अजून एक दाखला समर्थ देत आहेत. 

क्रमशः भाग १६..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१७/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९७०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...