मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम उय जयराम ||
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
हे मारुतीस्तोत्र लिहिताना समर्थांनी किती आडाखे बांधून कोणत्या उद्देशाने हे स्तोत्र लिहिलं असेल त्या सर्वांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. कदाचित यात समर्थांची आणि मारुतीरायाची वेगळी ओळखसुद्धा होऊ शकेल. मुळात हे स्तोत्र हनुमंताला आवाहन करत, त्याची स्तुती करत या स्तोत्रात प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य ते मिळावं यासाठी या स्तोत्राचं नित्य पठण का करावं हे देखील त्यांनी यात फलश्रुती रुपात मांडून ठेवलंय. एखाद्या स्तोत्रासाठी असणारे नियम इथेही लागू होतात.
इथे ऋषी स्वतः मारुती अवतार समर्थ रामदासस्वामी आहेत. याचं किलक अर्थात चावी, पिन वा कोड स्वतः श्रीरामचंद्र आहेत. हे किलक अलिखित आहे. याचा संदर्भ श्रीरामरक्षेतून आपण जुळवू शकतो. तिथे रामरक्षा सिद्ध करण्यासाठी हनुमंताचा किलक म्हणून उल्लेख आहे, त्याचप्रमाणे हनुमंताचं कोणतही स्तोत्र मंत्र हे सिद्ध करण्याची जबाबदारी अर्थातच त्याचे आणि जगताचे स्वामी प्रभू श्रीरामचंद्र यांची आहे.
इथे फक्त एक प्रश्न पडतो की, स्वतः मारुतीचे अवतार असलेले समर्थ, मारुतीचं स्तोत्र लिहिताना मारुतीचं गुणवर्णन करतात तर ती आत्मस्तुती ठरत नाही का आणि तशी आत्मस्तुती ही गैर आहे व अप्रस्तुतसुद्धा. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ज्यासाठी आपण रामायणात डोकावून पाहू. रामावतार समाप्ती प्रसंगी प्रभूंनी मूळ पुरुषोत्तम रुपात हनुमंताला आज्ञा केली आहे की, ज्यावेळी धर्माचा प्रभाव क्षीण होतो आहे असं वाटेल आणि भक्ती , श्रद्धा या तकलादू होत जातील त्यावेळी पुनः त्यांच्या सुस्थापनेचं कार्य हनुमंताने करावं आणि ही आज्ञा त्रेतायुग समाप्ती पासून कलियुग समाप्तीपर्यंत आहे.
प्रभू आज्ञा शिरसावंद्य म्हटल्यावर कालानुरूप व काळाप्रमाणे जे योग्य, ते करणं हा त्या आज्ञेचा भाग होतो. म्हणून इथे आत्मस्तुतीचा दोष लागत नाही. देहधारी मारुतीचा आत्मा समर्थ जन्मांतसुद्धा आपल्या प्रभूंच्या आज्ञेला बद्ध आहे आणि त्याच अनुषंगाने या स्तोत्राकडे पाहूया. म्हणजे समर्थांनी आत्मस्तुतीचा धोका पत्करून आणि रामभक्त, रामदास असतानासुद्धा संपूर्ण आयुष्य मारुतीच्या बलसंवर्धनाचं महत्व प्रसारित करून जनसामान्यांना राष्ट्रभक्ती, धर्मप्रेम यासाठी प्रवृत्त केलं.
त्या बलसंवर्धनाचाच भाग किंवा त्याच्यासाठीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कणखर मनाची गरज आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवून सशक्त शरीर आणि त्यापाठी सशक्त मन घडवणं हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन, आता आपण या स्तोत्राचे विवेचन अध्यात्मिक, सामाजिक, व्यक्तिगत मानसिक संदर्भात सुरू करूया.
सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या हे स्तोत्र समर्थानी हनुमंताला साद घालत, हनुमंताची स्तुती करत समाजातील व्यक्तींना व सामूहिक अर्थाने समाजाला, हनुमंताने त्याच्या शक्ती, भक्ती, युक्ती, दास्यत्व यांची प्रचिती देऊन धर्माची ध्वजा पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलंय. याची साक्ष आपल्याला सुरवातीच्या श्लोकातील दोन ओळीत मिळते.
क्रमशः भाग २ .....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०३/११/२०२०
Comments
Post a Comment