मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २२
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
हनुमंताची महती, शक्ती याबद्दल कथन करताना उदाहरण देऊन समर्थ सांगतात की हनुमंत त्याचे पुच्छ अर्थात शेपूट जे वज्रासम ते इतकं मोठं करू शकत असे की, त्याच्या वेटोळ्याने तो संपूर्ण ब्रह्मांडाभोवती त्या शेपटाने वेढा घालू शकतो. हनुमंताचं पुच्छसुद्धा कसं आहे की, वज्राची ताकद त्यामध्ये सामावली आहे. याचा प्रत्यय सीताशोधनासाठी लंकेत गेला असताना आपल्या पुछाच्या ताकदीची प्रचिती हनुमंताने रावणासह समस्त असुरांना दिली.
यात अजून एक गोष्ट मला आढळते ती म्हणजे माणसाची कुंडलिनी शक्ती माकडहाडाच्या खालीच वेटोळे करून दडलेली असते आणि ती ज्यावेळी जागृत होते त्यावेळी त्यातून जे दडलेलं ज्ञान सदर व्यक्तीस प्राप्त होतं ते समस्त ब्रह्मांडास व्यापून उरतं. हाच कुंडलिनीच्या शेपटीचा ब्रम्हाडाला गवसणी घालणारा विळखा समर्थांना अभिप्रेत नसेल ना. बाकी शारीरिक पुच्छ हे प्रतिकात्मक असू शकेल. असं माझं मत आहे. त्रिकालज्ञानी समर्थ गुह्य ज्ञान वेगळ्या शब्दात मांडू शकतात.
अश्या या फक्त पुच्छाच्या सहाय्याने वा ताकदीने ब्रह्मांडा भोवती वेढा घालू शकणाऱ्या हनुमंताची तुलना या ब्रह्मांडात कोणाशीही होऊच शकत नाही. असा आत्मविश्वासपूर्ण दावा समर्थांनी इथे केला आहे. ब्रह्मांड जेंव्हा म्हटलं जातं त्यावेळी त्यात तिन्ही लोक, अर्थात स्वर्ग, पृथ्वी व पाताळ यांचा समावेश होतो. म्हणजेच देव दानव व मानव या तिन्ही लोकांत कोणीही हनुमंताच्या तुलनेचा सापडणार नाही.
हनुमंताने जन्मतः केलेल्या भीमपराक्रमाची मांडणी करताना समर्थ सांगतात की हे हनुमंता तू जन्माला आलास त्यावेळी सूर्योदय व्हायचा होता. जन्मानन्तर अल्प काळातच माता अंजनीने तुला वृक्षातळी ठेवून ती जवळच काही आणायला गेली आणि जन्मतः भुकेने व्याकुळ झालेल्या तुला डोळ्यासमोर नुकतेच उगवतीस आलेले लालबुंद सूर्यबिंब दिसले. अद्भुत शक्तीचा स्रोत जन्मतः प्राप्त झालेल्या तुला ते फळासम दिसलेले बिंब प्राप्त करण्याची इच्छा झाली आणि इच्छा कृती यश यांचा जन्मतः संयोग असलेल्या हनुमंता तू ते फलप्राप्तीसाठी आकाशातून अवकाशात झेप घेतलीस.
इथे समर्थ सूर्यमंडळ हा शब्द अवकाश पृथ्वीच्या कक्षेबाहेरील विश्व अर्थात पृथ्वी ते सूर्य या अंतरात येणारे सर्व अगणित ग्रह, तारे, धूमकेतू, आपली कक्षा सोडून भ्रमित झालेले ग्रह इत्यादी सर्व यांना उद्देशून म्हणत आहेत. म्हणजेच समर्थांना या सर्वांची कल्पनाच नव्हती तर ज्ञानदेखील होतं. की पृथ्वीच्या कक्षेबाहेर अगणित विश्व आहे, जे सूर्याच्या भोवती फिरत असते, ज्याचा केंद्रबिंदू सूर्य आहे, आणि या समस्त ग्रहमालेचा आधार एकमेव सूर्य आहे.
त्याच सूर्याला ग्रासण्यासाठी हनुमंत जन्मतः झेपावला आणि क्षणार्धात सूर्याला त्याने ग्रासले. इथे काही वैज्ञानिक गोष्टी बघूया. या पृथ्वीच्या बाहेर पडण्यासाठी प्रचंड शक्ती असलेले क्रायोजिनिक इंजिन बसवलेले क्षेपणास्त्र बनवून त्यावर उपग्रह वा यान बसवून सोडावे लागते. काही महिन्यांची मेहनत त्यात असते.
ती मेहनत पहिल्या प्रयत्नात यशस्वी होईल याची शक्यता किती हे बनवणारे शास्त्रज्ञसुद्धा आजही सांगू शकत नाहीत. आपणही बघतो ज्यावेळी एखादं यान चंद्र, मंगळ यावर उतरत असेल त्यावेळी सर्व शास्त्रज्ञ प्रार्थना करताना, काही पुटपुटत असताना दिसतात. म्हणजेच कुठेतरी एक कण का होईना देवावर अवलंबून आहे हे नक्की. असो मुद्द्यावर येऊया.
तर अश्या प्रकारची तयारी करून एखादं क्षेपणास्त्र झेपावतं त्यांनतर त्याचं उड्डाण , प्रयाण, प्रवास आणि पोहोचणे या क्रिया घडतात. ज्या हनुमंताच्या बाबत क्षणात म्हणजे जन्मतः काही मिनिटात घडल्या आणि हनुमंत सूर्याच्या दिशेने झेपावला. कसलं अंतरळवीराचं प्रशिक्षण नाही, तसला पोशाख नाही, यानाची, क्षेपणास्त्राची गरज नाही, स्वयंसिद्ध हनुमंत सूर्याचं फळ खाण्याच्या उद्देशाने झेपावले.
या १३व्या श्लोकावर अजून बरच विवेचन करायचं आहे. म्हणून आज इथेच थांबतो. उर्वरित विवेचन उद्या पाहू.
क्रमशः भाग २२.....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२३/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment