Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १९

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १९

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | 
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | 
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||

सडपातळू कसा तर त्याच अंग चपळ आहे.या सडपातळ शब्दाचा वापर समर्थानी तुलना करण्यासाठी वापरला आहे. सहसा सडपातळ व्यक्ती ही स्थूल व्यक्तीपेक्षा चपळ असते म्हणजेच हनुमंताचं वर्णन जे समर्थांनी केलं आहे त्याचा मतितार्थ नेटका आणि अंगापिंडाने भलामोठा असूनही चपळता इतकी की त्या चपळतेपुढे विद्युल्लतेची चपळता देखील कमीच भासेल. 

या वर्णनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आपण समजतो तसा सडपातळ हनुमंत नसून, नेटका अंगाने विशाल असूनही एखाद्या सडपातळ व्यक्तिप्रमाणे चपळ आहे. बर ही चपळता इतकी की त्यापुढे गगनात क्षणभरात लाखो योजने अंतर पार करून जाणाऱ्या निमिषात आपलं तेज व शक्ती प्रकट करणाऱ्या विजेप्रमाणे चपळ असा हा हनुमंत आहे. म्हणून त्याच्यासमोर मोठे मोठे असुर दानव राक्षस इत्यादी क्षणभर सुद्धा टिकू शकत नाहीत. 

प्राणदाता शब्द पाहताना द्रोणागिरी पर्वत उचलून लीलया उड्डाण करणाऱ्या हनुमंतांबद्दल आपण वाचलं होतं. त्यानुसार संजीवनी वनस्पती आणण्यासाठी लंकेतील सुबैल पर्वत ज्यावर श्रीराम वस्ती करून होते, तिथून सुशेण वैद्याने सांगितल्याप्रमाणे हिमालयात जाऊन पुन्हा सुर्योदयापर्यंत परत यायचं हे खरतर अशक्यप्राय असं कार्य. परंतु श्रीरामांचा आशिष मिळताच अशक्य असं काही रहात नाही हे जाणणाऱ्या हनुमंताने हे अपौरुषेय कार्य सहजी साध्य करून न भूतो न भविष्यती असा अतुलनीय पराक्रम करून त्रिखंडात आपलं व नाव सिद्ध करून दाखवलं. 

यासाठी एखादा माणूस सामान्यपणे लांब लांब पावलं टाकत कमी वेळात जास्त अंतर पार करण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे हनुमंत कोटच्या कोट उड्डाण करून पार करून उत्तरेच्या दिशेने गेला. यात कोटीच्या कोटी म्हणजे संख्येच्या दृष्टीने विचार केला तर कोटीच्या कोटी मैल उड्डाण करून असा अर्थ निघू शकतो.  यात हनुमंताच्या अफाट शक्तीचा व अचाट साहसाचा प्रत्यय येतो. दुसरा एक अर्थ याचा असाही निघतो की कोट म्हणजे किल्ला त्यावरून पूर्वी नगराची व राज्याची कल्पना यायची आणि माहिती व्हायची.त्याचप्रमाणे वाटसरूंना आपण कोणत्या राज्यात आहोत याचा अंदाज हा या किल्ल्यांवरून येत असे. 

हे कोट म्हणजे किल्लेच समर्थांना अभिप्रेत असतील याचं अजून एक कारण म्हणजे, ज्यांनी विमानप्रवास केला आहे त्यांना माहीत असेल की वरून पाहताना, भूप्रदेशावरील सर्वात उंच जो परिसर असेल तोच सर्वात नीट आणि प्रथमतः दिसणार. म्हणजेच विमानांप्रमाणे आकाशमार्गे जाणाऱ्या हनुमंताला पृथ्वीकडे पाहतांना त्यातल्या त्यात स्पष्ट पर्वत वा कोटच आधी दिसणार आणि त्यावरून आपण कुठे जातो आहोत व कोणत्या दिशेने जायचं आहे हे निश्चित करता येत असेल. म्हणून कोटीच्या कोटी म्हणजे कोटच्या कोट, पर्वतच्या पर्वत डोंगरच्या डोंगर पार करत त्यावरून उड्डाण करत हनुमंत उत्तर दिशेने झेपावला आहे. 

बर उत्तरेला जाऊन काय भीमपराक्रम हनुमंताने केला तर, ज्या संजीवनी वनस्पतीचा शोध घ्यायची  जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती, ती ओळखू न आल्यामुळे आपल्या बळाचा पूर्ण वापर करत त्याने मंदाद्री अर्थात मंदार पर्वतासम भासणारा व दिसणारा द्रोण नावाचा पर्वत  क्रोधाने उपटून अर्थात उचकटून काढला. क्रोध म्हणजे सात्विक संताप कारण वेळ कमी आणि कार्य मोठं होतं त्यामुळे आपल्याला ती औषधी वनस्पती ओळखू न आल्याबद्दलचा राग, इंद्रजिताने मारलेल्या  शक्तीचा राग, भ्राता लक्ष्मण मूर्च्छित आणि जगतपालक प्रभू हतबल या सर्वाचा एकत्रित क्रोध. परंतु हा क्रोधसुद्धा तामसी नसून सात्विक संताप होता. अविवेकी नाही तर विवेकी संताप होता. 

क्रमशः भाग १९..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२०/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...