Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ६

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ६

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम उय जयराम ||

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दु:खहारी, धूर्त वैष्णवगायका ||२||

मारुतीची संपूर्ण कसोटी पाहणारा हा सर्वात कठीण प्रसंग. पार्श्वभूमी बघा.  प्रभू शोकाकुल अवस्थेत सर्व भान हरपून फक्त अश्रूमय अवस्थेत बसलेत. राजा सुग्रीव, बिभीषण यांना काही सुचत आणि सुधरत नाहीये. वैद्य सुशेणाबद्दल बिभीषण बोलले. हनुमंताने त्वरित उड्डाण करून सुशेण यांना घरासह प्रकट केलं. सुशेणाने नाडीपरिक्षेनंतर उपाय सांगितलाय. फक्त एकच औषधी वनस्पती जी हिमालयात मिळते, त्याने लक्ष्मणाचे प्राण वाचू शकतात. तीदेखील सूर्य उगवायच्या आत आणून पहिल्या किरणाआधी देता आली तरच. 

प्रभूंची स्थिती अवर्णनीय आहे. भ्राता प्राण संकटात आहे, मातेचे शब्द कानी घणाचे घाव घालत आहेत. इथे या ठिकाणी फक्त माताच नव्हे तर देवी सीता देखील विचारणार आपण असताना कसं झालं हे. कार्य इतकं जोखमीचं, जणू अशक्यप्राय भासणारं.  वायूवेगाने जाऊन वनस्पती घेऊन वायूवेगाने परत येणं. अंतर लंका ते हिमालय आणि पुन्हा लंका. सुग्रीव आणि जांबुवंत सल्ला देतात हनुमंत हे कार्य करू शकेल. 

प्रभू हनुमंताकडे पाहून हात जोडून विनंती करण्यासाठी शब्द बोलणार, इतक्यात  हनुमंत गहिवरून प्रभूंच्या पायी मस्तक ठेवतो.  त्यांचे दोन्ही हात धरून मस्तकी लावतो आणि काकुळतीला येऊन म्हणतो  

"प्रभू ज्या वाणीने आज्ञा करायची, त्या वाणीने विनंती करता.  प्रभू, या दासाला पापाचा भागीदार करत आहात. ज्या चरणांच्या सेवेसाठी जन्म घेतला, त्या चरणाईतके पवित्र आणि सात्विक या जगात काही नाही. त्यांच्यासाठी प्राणदेखील तुच्छ आहेत प्रभू. आपल्या लोचनांतील प्रत्येक अश्रू माझं असणं शून्यवत भासवतोय. आपण मात्र आज्ञा द्या. आपल्या आज्ञेची शक्ती माझ्या पाठीशी असताना या त्रिलोकात अशक्यप्राय काहीही उरत नाही प्रभू." 

 स्वामी आणि दास अश्रूयुक्त नयनांनी पाहतात. स्वामींच्या चरणांची रज अर्थात पवित्र मृत्तिका आपल्या मस्तकी लावत हनुमंत दोन्ही हात जोडून शीश लवून प्रणाम करतो. हनुमंताच्या विनंतीनुसार प्रभू आज्ञा देतात. त्यामागे कार्यसिद्धीचा आशीर्वाद देतात. प्रभूंच्या आशीर्वादाने सहस्त्र रश्मी तेज ओज आणि समस्त ब्रह्मांडाची शक्ती हनुमंताच्या अंगी संचारली आणि जय श्रीराम हा घोष करत हनुमंत झेपावे उत्तरेकडे करत निघाला. 

मंदाद्री म्हणजे ज्या पर्वताची रवी करून समुद्रमंथन करण्यात आलं, त्या मंदार पर्वतासम असलेल्या द्रोणागिरी पर्वतावर जाऊन संजीवनी वनस्पतीचं ज्ञान न झाल्यामुळे आणि त्याहीपेक्षा कमी अवधी असल्यामुळे अचाट आणि अतुलनीय शक्ती असलेल्या हनुमंताने त्याला साजेसं सर्वात सोप्प कार्य केलं, पर्वत उचलून पुनः दक्षिणेकडे झेपावत लंकेत दाखल झाला. संजीवनी आणली आणि आपल्या प्राणासम असलेल्या स्वामींचे प्राण अर्थात लक्ष्मण याचे प्राण वाचवले. म्हणून प्राणदाता. हनुमंताच्या बारा प्रसिद्ध नावांमधील एक नाव आहे लक्ष्मण प्राणदाताचं. प्राणदाताचा अजून एक अर्थ म्हणजे विश्वातील प्राणवायू संचालित करायची अफाट ताकद असलेला आणि त्यामुळे त्या अर्थाने विश्वाचादेखील प्राणदाता. 

सकळा उठवी बळे. इथपर्यंत अजूनही समर्थ मारुतीच्या शक्तीच्या  प्रेमात आहेत. अर्थात मारुतीच्या शक्तीचं स्वरूप सांगताना समर्थ सांगतात जो आपल्या बळाच्या जोरावर सकळ विश्वातील असुर दानवी शक्तींना आयुष्यातून उठवण्यास समर्थ आहे असा आहे मारुती. सकळ या एका शब्दात समर्थ त्रिलोकात मारुतीच्या शक्तीची प्रचिती देत आहेत. 

क्रमशः भाग ६ ..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०७/११/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...