मारुतीस्तोत्र आणि भावार्थ २७
|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
अश्या या भीमरूपी वज्र हनुमंताच्या स्तोत्रात त्याचं गुण व कार्यवर्णन करून समर्थांनी हनुमंताच्या चरणी लीन होऊन प्रार्थना करायला सांगितली. या स्तोत्राच्या पठणाची फलश्रुती १४ व १५ या श्लोकात सांगून, १६व्या श्लोकात एक गणित समर्थ मांडतात असा माझा अंदाज वा माझं अनुमान आहे. बघूया.
हे पंधरा श्लोकी मारुतीस्तोत्र म्हणण्याचा संकल्प मनात धरा. हे धरा म्हणजे हे जनहो ह्या पंधरा श्लोकी मारुतीस्तोत्राच्या पठणाचा संकल्प मनात धरा, योजा आणि कृतीत आणा. असा अर्थ या पहिल्या भागाचा आहे. हे धरा पंधरा श्लोकी.
आता पुढचा भाग बघूया. लाभली शोभली बरी. बरी म्हणजे उत्तम, अत्युत्तम, चांगलं. पूर्वीच्या काळी स्तुती ही बेतानेच केली जायची. उद्देश हा की फार स्तुतीने सदर व्यक्ती उगीचच वर चढून जाऊ नये आणि त्या व्यक्तीचे पाय जमिनीवर रहावेत आणि त्याला पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळावी.
उद्देश उत्तम असायचा. म्हणून बरे दिसताय आज, असं पूर्वी म्हटलं जायचं. त्याच अर्थाने समर्थ हा शब्द वापरतात असं मला वाटतं. लाभली म्हणजे काय. तर या स्तोत्राच्या नित्य पठणाने अनेक प्रकारचे उत्तमोत्तम लाभ होतील. हनुमंताचा आदर्श डोळ्यासमोर राहून हनुमंतासम निरोगी, सुदृढ शरीर, हनुमंतासम निर्विकल्प, शुद्ध, सात्विक मन आणि प्रफुल्लित शरणागत एकनिष्ठ आत्मा अशी धारणा डोळ्यासमोर राहून त्या सकारात्मक ऊर्जेचा लाभ पठण करणाऱ्याला प्रेरणादायी ठरेल.
शोभली म्हणजे काय. तर या अश्या सकारात्मक लाभामुळे प्राप्त झालेली विद्या व त्याद्वारे प्राप्त वैभव, धनधान्य इतर सधनता त्या उत्तम निरोगी शरीर प्राप्त व्यक्तीला, साधकाला भक्ताला शोभून दिसेल. अन्यथा पैसा, धन सर्व आहे आणि उपभोग घेण्याची शक्ती व उपयोगिता शरीरात नाही, शरीर जर्जर आहे, अनेक व्याधींनी ग्रस्त आहे. अश्या व्यक्तीला सदरची धनसंपदा साधनं यांचा काय उपयोग, ती त्याला शोभून दिसणार नाहीत. म्हणून मारुतीच्या या स्तोत्ररूप उपासनेचा लाभ झालेल्या व्यक्तींना ती साधना व त्यामुळे प्राप्त झालेलं सुदृढ शरीर, मन यामुळे घडलेले लाभ हे खूपच शोभून दिसतील.
म्हणून पुढच्याच ओळीत समर्थ सांगतात की, दृढदेहो निःसंदेहो. म्हणजे हे लाभ होतील ते त्या व्यक्तीस शोभून दिसतील याबद्दल माझ्या (समर्थांच्या) मनात कोणताही संदेह नाही आणि दृढ पणे अर्थात ठामपणे मी हे सांगत आहे. ही त्यांच्या मनाची दृढता आणि निःसंदेही मनाचा संकल्प, आपणही योजून कोणताही संदेह वा शंका वा किंतु मनात न बाळगता, आपल्या संकल्पाला दृढपणे धरून, देह व मन संदेहरहित करून, शून्य करून या स्तोत्राच्या पठणास सुरवात करावी. अश्या संकल्पाने मनातील सर्व विकल्प, द्वैतभाव, षड्रिपु, शंकाकुशंका यांचा नाश होईल. त्यामुळे प्राप्त मनाचं सौन्दर्य व्यक्तीला इच्छापूर्तीप्रत जाण्याचा कर्ममार्ग प्राप्त करुन देतील. हा विश्वास, श्रद्धा पठणकर्त्याने ध्यानात ठेवावा.
आता इथे संख्या चंद्रकळा गुणे अस का लिहिलय याचं तात्विक विवेचन पुढच्या भागात आपण बघू.
क्रमशः भाग २७.....
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२८/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment