(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ४५
नारद तिथेच वाट पहात उभे राहिले. कृष्ण, देवी सत्यभामेच्या महालात प्रवेश करता झाला आणि नारदांची चलबिचल सुरू झाली. काय होईल, देवी आपलं काम करतील की नाही. काहीही अनुमान करता येत नाहीये. ही स्थिती मोठी विचित्र आहे. यावेळेचा सदुपयोग करून घेऊ. असा विचार करून देवर्षी नारद देवी रुक्मिणी यांच्या महालाकडे वळले. आत देवी तयार आहेत याचा कानोसा घेऊन, नारदांनी महालात प्रवेश केला. देवींची सेविका बाहेर जात होती. तिलाच नारदांनी पृच्छा केली.
" देवी तयार आहेत ना, मी आत प्रवेश करू शकतो ना."
"हो अवश्य आपण आत जाऊ शकता."
नारदाना प्रणिपात करून तिने उत्तर दिल. मोठ्या प्रफुल्लित मुद्रेने नारद आत गेले.
"नारायण नारायण . माता आपल्या या पुत्राचा प्रणाम स्वीकार करावा. मी आज मातेच्या दर्शनार्थ आलो आहे. आज शुभकार्य आहे आणि मातेचं मन आज प्रसन्न असेल हे निश्चित जाणून मी आगंतुक प्रवेश करता झालो , त्यास्तव क्षमा माते. "
"देवर्षी काही हरकत नाही. यावं. आपण पुत्रसमान आहात. आपल्याला कीं अर्थम् बंधनम्. तसेही आपण चराचरात भ्रमण करण्यास अधिकारी आहात आणि वृत्तीने संन्यस्त. म्हणून आपणास स्थल काल मर्यादा नाही. तरीही संभ्रम हा आहे की आज इकडे कसे काय वाट चुकलात."
"नारायण नारायण. आपल्या दर्शनार्थ आलोय याचक म्हणून आणि आपण माझ्या सारख्या सदवर्तनी, सद्गृहस्थाची चेष्टा व थट्टा करीत आहात. काही चुकले असल्यास रागे भरावे. आपला माता म्हणून अधिकार आहे तो."
" देवर्षी इतकं चिंतातुर होऊ नका. आम्ही काही तुमच्या यदुवीरांसम सत्त्वपरीक्षा वगैरे घेत नाही कधी. आम्ही आपली साधी, सरळ, भाबडी माणस. चुका करतोही आणि चुका स्वीकारतोही. तेंव्हा व्यर्थ चिंता चित्ती धरू नये. कोणतीही विपदा वा आपदा येणार नाही."
" हा आशिष समजावा की सदिच्छा"
"का अस का विचारत आहात. नक्कीच काही इकडच तिकडे करून आला आहात ना? असेल तर वेळीच सांगा., अन्यथा दरवेळेस करता तसं कराल. गळ्याशी तात आला की याल धावत धावत, नारायण नारायण करत."
" आज मातेचा मनोदय माझी येथेच्छ थट्टामस्करी करण्याचा दिसतोय. तरीही आपण म्हणताय त्यात सध्यातरी तथ्यांश आहे, असा आमचा कयास आहे (चेहऱ्यावर अपराधी भाव आणत नारद वदले).
" घ्या म्हणजे आम्ही हे सहज म्हणालो ते व्यर्थ नव्हतं. आपला स्वभाव हा जात्याच चिकित्सक असल्यामुळे, ह्या अश्या गोष्टी घडणारच. आता काय केलंत ते समय व्यर्थ वाया न दवडता सांगा, कारण आज खूप कार्य आहेत राजप्रासादात आणि नगरात देखील. या व्यस्ततेत आपल्यास वेळ देता येणार नाही आणि आपण प्रतीक्षा करत उभे असलेले दिसाल कुठेतरी."
" माते आपण जाणता की नाही, ते आम्हास माहीत नाही
परंतु द्वारकेस प्रस्थानावेळी, गिरीधर गोपाळ स्वये वृंदावनी कोणास तरी भेटण्यास गेले होते, असे ऐकिवात आले. परंतु सदर भेट न झाल्याकारणे, ते थोडे नाराज व निराश भासले. अर्थात तेही अंतरात. वर त्यांनी तसे भासवले नाही, तरी मी ते ताडले. "
" आणि यदुवीरांना पृच्छा केली, कारणाची. सत्य ना?"
" हो. परंतु आपण हे कसे ताडलेत. आपणास काही म्हणाले का, नाथ आपले."
"आपला स्वभाव. त्यावरून ताडले. तसही आपण काही गहन समस्या आल्याखेरीज आमच्याकडे येत नाही. बाकी यदुवीर आम्हाला अजून भेटले नाहीत कार्यव्यस्ततेमुळे."
" हो का ? पण ते आताच देवी सत्यभामा यांच्या महालात प्रवेशते झालेले या चक्षुनी पाहिले.( तेवढ्यात जिव्हा चावतात), क्षमस्व अनावधानाने निघाले, मुखातून."
" असुदे. पण आता आमच्याकडे काय अपेक्षा आहे आपली."
" माते आपण क्रुद्ध न व्हावे, हीच प्रार्थना आहे. तर इतके विचारताच भगवंत रुष्ट झाले आम्हांवर आणि पुन्हा समोर येऊ नका, अशी आज्ञा सुद्धा केली."
देवी रुक्मिणी हसू आवरत म्हणाल्या
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment