(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - २१
नारद वदले
" भगवान पुरुषोत्तम, मी आपली ही अवस्था पाहू शकत नाही आणि पाहू इच्छितही नाही. हा मी आता जातो आणि राधेला आपली ही अवस्था सांगून आपल्याला वाचनातून मुक्त करण्यास सांगतो. आपण फक्त आज्ञा द्यावी भगवन"
यावर कृष्ण म्हणाला
"नाही नारदा नको. या मानवी देहातील घडणाऱ्या गोष्टी आणि मनाच्या या भावावस्था आम्हाला अनुभवू देत. कारण आमचा जन्म त्याचसाठी आहे. ही अगतिकता , ही अनिश्चितता, ही घालमेल, मैत्रितील ही त्यागाची उच्चावस्था, आपल्या सख्यासाठी किंवा सखीसाठी करावी लागणारी धडपड, मैत्रितील देण्याचा आनंद आणि त्या बदल्यात काहीही अपेक्षा न ठेवता आपल्या प्रिय व्यक्तीला फक्त आनंद वाटणं, लुटून उधळण हे किती मनोवेधक आहे हे फक्त या देही आल्यावरच समजू शकल. किंबहुना या देही येण्याच्या अनेक कारणांपैकी हे सुद्धा एक कारण आहे, नारदा. "
" प्रभू तुमचीच माया आणि तुम्हीच त्यात बद्ध हे बघवत नाही, म्हणून न राहवून आलो. त्याबद्दल क्षमस्व देवा."
" माया ही बद्ध करणारी आहे हे खरं आहेच. पण काही काही वेळा ही बद्धता हवीहवीशी वाटते. ती बद्धता, मुक्ती अथवा मोक्ष या पेक्षाही मनास भावणारी असते. यातून बाहेर यावस वाटत नाही, नारदा. कदाचित ही अवस्था मुमुक्षु आणि ज्ञानी यांना समजणार देखील नाही . पण आम्हाला ती समजली आहे, भावली आहे आणि ही चिंता मनाला एक हळुवार आनंद देते आहे. म्हणून यात काही काळ राहून आनंद घेऊ देत"
"पण मग हा खेळ संपेल की असाच चालणार"
" ते फक्त त्या जगनियंत्याला माहित आणि काळालाच" कृष्ण हसून म्हणाला
" नारायण नारायण आता फक्त बघत राहणं हा एकच पर्याय दिसतो. येतो यदुवीर , रुक्मिणीनाथ "
अस म्हणून नारद अंतर्धान पावले.
अर्थात हे घडलेलं कोणालाही समजलं नाही. कारण देहात असून आत्मतत्वाचा आत्मतत्वाशी संवाद हा पंचमहा तत्वातीत असल्यामुळे, जडदेहाला कळणं दुरापास्त आहे. म्हणूनच तो फक्त दिव्य चक्षुनीच दिसू शकतो अथवा तपसामर्थ्याने .
ब्रम्हर्षी अंतर्धान पावले. पण कृष्णाला पुन्हा मूळ प्रश्न सतावू लागला. मंडळी प्रवासाच्या टप्प्यात द्वारकेजवळ येऊन पोहोचली होती. पण दिवस उतरणीला लागला असल्यामुळे आता प्रवासात एक मुक्काम करणं गरजेचं होतं. म्हणून दादांनी कृष्णाशी चर्चा करून सर्वांना पुन्हा एका गावाचा आडोसा घेऊन थांबण्याची आज्ञा दिली. सर्व लवाजमा थांबला.
भोजनोत्तर सर्व मंडळी , सर्व प्राणीमात्र निद्रेच्या आधीन झाले. नेहमीप्रमाणे दादाने आस्थेने कृष्ण निजलेला पाहिलं आणि मग आपण निद्राधीन झाले. आजूबाजूचं समस्त विश्व शांत झालेलं असताना मधुसूदन मात्र अस्वस्थ आणि चिंतेत होता, शरीराने जरी या जागी असला तरीही मनाने तो राधेची भेट आणि आपली मुरली याच चिंतेत ग्रस्त होता.
अर्थातच आकाशस्थ ब्रम्हर्षी नारद नारायणाच्या चिंतेत चिंताग्रस्त होते आणि अगतिक प्रभू आज्ञा नसल्यामुळे काहीही करू शकत नव्हते.
नारायण नारायण नारायण
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment