(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - १८
त्याची आच फक्त दोघेच जाणत होते. कृष्ण आणि राधा, राधा आणि कृष्ण, कृष्ण राधा , राधा कृष्ण , म्हणजेच फक्त कृष्ण राधामय आणि राधा कृष्णमय.
समस्त विश्वाला भारून टाकणाऱ्या त्या मुरली वादनाचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर कृष्णाने डोळे उघडून पाहिलं तर समस्त चराचर कृष्णमय होऊन विश्वनियंत्याला स्वानंदात रममाण झालेलं पाहून भान हरपून पाहात होत. प्रत्यक्ष नारायण तो. आजूबाजूचं सार विश्व ज्यावेळी त्याला निरखत होत, सुरांची जादू बाहात होतं, त्यावेळी स्वतः चक्रपाणी, स्वर , सूर आणि लय यांच्यावर स्वार होऊन , वृंदावनी हिंडून आपल्या अविचल, अपार, प्रेममयी राधेला कल्पनेतून पहाता पहाता वृंदावनी पोहोचला देखील होता.
आणि सखी राधा नृत्यात भान हरपून कृष्णाला वृंदावनी निरखत होती, पाहून समाधानी होत होती आणि तरीही लोचनांची आस अतृप्तच होती. जितकं कृष्णरुप जास्त न्याहाळत होती, तितकीच हृदयी गीत, संगीत, यांच्या लहरींवर स्वार होऊन म्हणत होती. आणि कृष्ण तिच्या या कोमल स्वरातील तक्रारवजा बोलाना ऐकून हलकेच होकार भरत होता, राधेला भेटता आलं नाही या अपराधी भावाने आणि राधेच्या अपार प्रेमाने भारावला असल्याने, फक्त हो असच होईल इतकेच बोल बोलत होता, आणि राधा सांगत होती.
अधीर झाले भेटीसाठी व्याकुळता कैसी
तू हृदयी हे जाणुनी आहे तरी ओढ कैसी
किती स्वरूपे दावसी नेत्रा अचल रूप हृदयी
भाव जसा हा असे अनामिक भाववेडी प्रीती
उगा जीवाला ओढ नसे ही निष्कलंक राधा
प्रीती ही तू , राधा ही तू, ही देहातीत बाधा
तूच दिधले कृष्णा मजला नयनी प्रेम तुझेची
तरीही श्यामला या राधेला ना दिसे रूप हेची
माया अवघी व्यापुनी उरसी ऐसी प्रतिमा तू
या राधेला तव मुरलीचे मग तीन सूर दे तू
येसी भेटी पुनरपी गोकुळीं घेऊन जा सत्वर
त्या कारणे मज भेटीस्तव तरच येसी तू सत्वर
अचानक भानावर आलेल्या कृष्णाला सावरत दादाने विचारलं
" काय रे काय झालं अचानक. दचकलास का असा काही आठवलं का. काही विसरलास , काही राहिलंय. असुदे ते नंतर द्वारकेला गेल्यावर बघू. नको चिंता करुस. मी नाही रागावणार. काळजी नको करुस. इतकी भीती वाटते तर मग भान हरपून प्रत्येक गोष्ट का करतोस. सांग बर. कुठेतरी हरवून हरखून असतोस सदोदित."
दादाच कथन ऐकून थोडासा सावरलेला तरीही अंतरी निश्चित बावरलेला कृष्ण बळे बळेच वदला
" नाही दादा , तुमची भीती वाटते हे खरं आहे.पण तरीही तुम्ही हृदयी नवनीत आहात, आणि अंतरी दुधावरील सायी प्रमाणे आहात. हे जाणतो मी. आजपर्यंत माझे कित्येक अपराध, खोड्या, चुका आणि प्रमादसुद्धा आपण पोटात घेतलेत. माझ्यावरील आपल्या ममत्वाला पारावार नाही."
" हो ना मग असा एकदम दचकलास का"
काही हरवलंय किंवा राहिलंय अथवा विसरलोय पण काय ते आठवत नाहीये. तरीही महत्वाच आहे, अस वाटतय आतून."
बलरामदादाने पाठ थोपटून कृष्णाला आश्वस्त केलं आणि म्हणाले
" बर असुदे. कितीही महत्वाच असुदे , तुझ्या चिंतेहून महत्वाच नाही माझ्यासाठी. हवं तर मी त्वरेने मागे जाऊन घेऊन येतो एक रथ घेऊन जाईन. तू सर्वांना घेऊन पुढे जा.
कृष्ण म्हणाला
" नको दादा तुम्ही नका जाऊ परत. असुदे. तुम्ही आधी म्हणालात तस नन्तर बघूया . आता नको. "
कृष्णाने , दादाच्या लेखी अजूनही कान्हा असलेल्या कृष्णाने हे शेवटचं कथन पूर्ण आत्मविश्वासपूर्वक म्हटलं नाही हे दादाला समजलं . पण तरीही विषय बदलण्यासाठी म्हणाला
" तुझ्या मुरलीने शुद्ध हरपते बघ, मती गुंग होते, अगदी मोहिनी घालतोस स्वरांनी. हे देखील लक्षात आलं नाही की , भुकेची वेळ होऊन गेली. तेंव्हा सर्वजण इथेच या विस्तीर्ण प्रदेशात अनेक वृक्षलता असलेल्या भूप्रदेशात भोजन उरकून घेऊ आणि मग प्रस्थान करू. त्याला कृष्णाने मानेनेच होकार दिला आणि उजव्या हाताने सर्व गाडी घोडे आणि जनसामान्य याना थांबण्यास सांगितले .
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment