(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ४३
" पण प्रेम भक्ती म्हणजे नक्की काय जरा विस्तारपूर्वक सांगू शकाल का देवर्षी."
"अवश्य देवी. विश्वनियंत्याने मानवनिर्मिती केल्यानन्तर प्रथम त्याच्यात आत्मा स्थापित करतानाच देह आणि आत्मा यांना सांधणारा दुवा म्हणून मन निर्माण केलं. त्यात निर्लेप प्रेम आणि भावपूर्ण भक्ती या दोन भावना सर्वप्रथम प्रस्थापित केल्या. त्यामागचा मूळ उद्देश हाच होता की त्याद्वारे, यांचा आधार घेऊन, मानवदेहातील आत्मा पंचमहाभूतरुप अश्या या देहाचा उपयोग करून, उपयुक्त योग साधून, परमात्म भेटीचा अपूर्व योग साध्य करू जाणलं. याचसाठी या प्रेमरूप भक्तीचा सदुपयोग करण्याची मनीषा मानवाने धरावी.
ही प्रक्रिया इतकी उपजत असते की ती शिकवावी लागत नाही. जस मातेला आपल्या अपत्यावर प्रेम करणं शिकवावं लागत नाही. तद्वत मनुष्यरुप आत्म्याला हे शिकवावं लागत नाही की भक्ती कशी करावी. भक्ती आणि प्रेम हे प्राकृतिकपणे आत्म्यास अवगत असते. मन यात त्याची साथ देते त्यावेळेस तो देहसुद्धा सात्विक संवेदनांची अनुभूती घेतो. भक्ती ही एका विशिष्ट परिभाषेत मांडण कठीण आहे.
पण जेव्हा एखाद्या आत्म्याला परम तत्वाची आवड निर्माण होऊन त्याप्रति निर्व्याज प्रेम जाणवत आणि मन त्यात आकंठ बुडून जातं , जेणेकरून ज्या परम तत्वाला तो साध्य करण्याची इच्छा धरून असतो , त्या परम तत्वाला देखील त्यात रममाण होणं भाग पडत. किंबहुना भक्ती ही भगवंताला भक्ताप्रत खेचून नेते. भक्ती ही परमेश्वराप्रति आत्म्याची उपजत ओढ आहे. ही जाणता घडेल वा अजाणता सुद्धा घडून येईल. हा एक योग आहे, ज्यावर मी नन्तर भाष्य करीन. ही ओढ जन्मतः सर्वच प्राणीमात्रात असतेच असते. ही स्वभावतः आत्म्यास असलेली ओढ जडदेही विरळ होते. ती मुद्दाम जोपासून दृढ करावी लागते. ते फक्त मनुष्यदेहातच शक्य आहे. कारण मनुष्य देह वगळता इतर सर्व देह हे फक्त भोग भोगण्यासाठी आहेत.
परंतु जेव्हा जडदेही प्राणी देहव्यापात व ततपश्चात काम क्रोधादी रिपूंच्या हवाली स्वतःला करतो, इच्छेने वा अनिच्छेने, जाणतेपणी वा अजाणता, तेंव्हा त्या आत्म्यावर विकाराचे संस्काररूपी आवरण चढत जाते. मुळात सर्व व्यवस्था विधात्याने कर्म तत्वात बद्ध केली असल्यामुळे आणि कर्मफल भोगूनच प्राणी मोक्ष पदास प्राप्त होत असल्यामुळे, ही शृंखला प्राणीमात्राला अनेक जन्म मृत्यूच्या अशक्यप्राय शृंखलेत जखडून टाकते."
देवी रेवती विचारतात
"पण भक्त पल्हादासारख्या भक्तांना हे तत्व लागू होत नाही काय ? वा असे जीव जडदेहाच्या नियमा पलीकडे कसे काय असतात ? हे जरा विस्ताराने सांगावे देवर्षी."
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment