(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - २९
सर्व जण जय घोष करू लागले.
श्रीबलराम श्रीकृष्ण यांचा विजय असो !!!!!!
श्रीबलराम श्रीकृष्ण यांचा विजय असो !!!!!!
श्रीबलराम श्रीकृष्ण यांचा विजय असो !!!!!!
हा स्वागतपर उत्सव अनुमाने अर्धा प्रहर चालू होता. त्यानंतर या नगरीत आधीपासून राहात असलेल्या नगर जनांनी नवीन आलेल्या लोकांना सर्व परिसर आणि रम्य द्वारकानगरी दाखवण्यासाठी आत नेण्यास सुरवात केली. कृष्ण बलराम यांच्या कठोर देखरेकीखाली चोख संरक्षण व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व कारभार शिस्तीत आणि ठरलेल्या वेळेनुसार पार पाडण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ सोबत आणलेल्या मथुरा व गोकुळवासीयांमधून आधीच तयार करण्यात आल होते.
त्यानुसार प्रत्येकाने आपापली ठरवून दिलेली जागा त्वरित घेण्यास सुरुवात केली आणि बघता बघता संरक्षण व व्यवस्थापनाची एक साखळीच तयार झाली. ठरलेल्या योजनेनुसार व क्रमानुसार, आलेल्या सर्व प्रजाजनांना एक एक करून आत सोडण्यास सुरवात करण्यात आली. प्रत्येकाला त्याच सर्व सामान पोहोचवण्यात येईल हे आश्वासन आधी देण्यात आलं असल्यामुळे कोणत्याही गोंधळाचा प्रश्न उद्भवणार नव्हता. अर्थातच हे सर्व दादांच्या अनुमतीनेच घडलं आणि कृष्णाच्या योजनेचा भाग म्हणून , सूत्रबद्ध व्यवस्थेसाठी. द्वारकेच्या प्रवेशद्वारावरूनच आतल्या नगरीची कल्पना येत असली, तरीही प्रत्येकाला संपूर्ण नगर , गृहरचना , व्यवस्था, मार्ग, मार्गिका आणि आपापली जागा पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती.
मंडळींनी आत ठरवून दिलेल्या क्रमाने आणि मार्गाने जाण्यास सुरवात केली. प्रत्येकाचे समाजव्यवस्थेतील स्थान , मथुरा आणि गोकुळ येथील त्यांचे महत्व, राज्यकारभारातील त्यांचे स्थान, उपजीविजेचे साधन, कर्मानुसार ठरलेला क्रम या सर्वांच्या आधारे प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे स्थान, घर , घराचा क्रम , घरासोबत जागा, शेती करीत असलेल्याना शेतीसाठी त्यांच्या मथुरा, गोकुळ येथील जागे इतकीच जागा हे सर्वच्या सर्व पूर्ण आधीपासून नियोजनबद्ध रित्या आखून, पूर्ण करण्यात आलेल असल्यामुळे कोणताही घोळ, गोंधळ अथवा अनियमितता होण्याचा प्रश्न आला नाही वा कोणत्याही स्वरूपाचा वाद विवाद उपस्थित झाला नाही.
त्याही पुढील आश्चर्य म्हणजे नगराची रचना , मोठे, मध्यम व लहान आकाराचे, मार्ग, छोट्या छोट्या मार्गिका यांचं बांधकाम, प्रत्येक घराची रचना, प्रत्येक घरापुढे व घरामागे विस्तीर्ण जागा, प्रत्येक घराबाहेर उद्याने , आधीपासून सुशोभित करण्यात आलेल्या वास्तू, वास्तुशास्त्रानुसार, आखण्यात आल होत. संपूर्ण द्वारकानगरी हा स्थापत्य कला, वास्तुकला, नगर निर्माण रचना यांचा एक अत्युत्तम नमुना होती. घरांची रचना, दिशेचा आणि दिशाशास्त्राचा, वास्तुशास्त्राचा उत्तम अभ्यास असलेल्या शास्त्रकारांकडून योजना घेऊनच करण्यात आली होती.
प्रशस्त गृहरचना, हवेशीर व मोकळ्या खोल्या, घरातील अंतर्गत सजावट, प्रत्येक घरातील खांबांची रचना, नक्षीकाम व कलाकुसर हे प्रत्यक्ष विश्वकर्म्याने केलेले असल्याप्रमाणे अत्युत्तम होतेच, पण पाहताक्षणीच अचंबित करणारे होते. प्रत्येक घराचे रंगकाम, आतल्यारचने पेक्षाही उत्तम घराबाहेरील संरचना , चित्ताकर्षक होत. प्रत्येक घर त्याबाहेरील फुललेली उद्याने, वृक्षलता, कारंज्यांची व्यवस्था ही मनोवेधक होती.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment