(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ३४
सर्व राजप्रासाद हे आतून अनेक सोयी सुविधा यांनी युक्त होते. महालाच्या चारही भिंतींमधून २४ तास पाणी खेळत असे. जेणेकरून बाहेरील उष्णतेचा वा तापमानातील, हवेतील बदलाचा काहीही परिणाम आत होणार नाही. सर्व दालनं ही हवेशीर , भरपूर उजेड येईल, पूर्वेच्या सूर्याची किरणं येतील अशा प्रकारे बांधण्यात आली होती. आतील प्रत्येक भिंतीवर कलाकुसर, वेलबुट्टीदार नक्षीकाम, आकर्षक रंगसंगती, जी मन कायम प्रसन्न ठेवेल व उत्साह वाढेल अशीच होती. अंतर्गत सजावटीत या सर्वांचा अंतर्भाव होता. महालातील प्रत्येक खांबांवर देवी देवतांची चित्रे व शिल्पे कोरलेली होती.
महालातील शयनगृहे खास सजावट,खास आकर्षक रंगकाम यांनी युक्त होती. प्रत्येक प्रसादात स्वतंत्र कक्ष वा दालने खास अतिथी अगत्या करता होती. अश्या सर्व सुखसोयींनी युक्त असे राजप्रासाद तसेच अधिकारी, मंत्रीगण, सैन्य , इत्यादींच्या गृहांची रचना त्या त्या श्रेणीला साजेशी अशी खास होती, जेणेकरून कोणालाही इतक्या दूरवर मातृभूमीचा त्याग करून आल्याचा कोणताही पस्तावा होणार नाही याची पूर्णतया काळजी घेण्यात आली होती. अशी ही रम्य द्वारका नगरी पाहिल्या नन्तर नगरजनांचा आपल्या राजावर असलेला विश्वास सार्थ व अधिक दृढ झाला.
या पुढील कार्य हे गृहप्रवेश व वास्तुपूजा हे होते. त्यासाठी कृष्णाने खास व्यवस्था केली होती. त्यासाठीचे कार्य ज्या मंत्र्याला सोपवण्यात आले होते, त्यांना कृष्णाने पाचारण केले आणि विचारले
" मंत्री महोदय आम्ही आपल्याला सोपावलेल्या कार्याची प्रगती काय आहे ?"
" महाराज आपण सांगितल्याप्रमाणे आपले गुरुवर्य ऋषि सांदिपनी यांच्या आश्रमातून खास पुरोहितवर्ग काही दिवस आधीच येऊन दाखल झाला आहे. त्यांना त्यांच्या कार्याची सर्व कल्पना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सूचनेनुसार सर्व सामग्री आणून ती त्यांच्या सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांची आपल्या अतिथीगृहात उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या स्नानसंध्यादि कार्याची सुद्धा उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. आता आपल्या पुढील आदेशाची प्रतीक्षा आहे. "
" सर्व पुरोहिताना नगरातील त्यांच्या त्यांच्या विभागात पोहोचते करा. सर्व प्रजेला कल्पना द्या की, प्रत्येक गृहाची वास्तुपुजा, गृहप्रवेश पूजा आणि सर्व प्रकारच्या शांतीपूजा यांची चोख व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे सर्वांच्या घरी यथायोग्य क्रमानुसार पुरोहितवर्ग येऊन सर्व विधी यथायोग्य पार पाडतील. कोणीही विवंचना करण्याचे कारण नाही. फक्त आपली आपली तयारी करून ठेवावी, जेणेकरुन पुरोहितांचे कार्य अधिक सुलभ होईल."
" जशी आपली आज्ञा महाराज"
अस म्हणून मंत्री नेमून दिलेलं कार्य पार पाडण्यासाठी प्रस्थान करतात.
संपूर्ण द्वारका नगरी आपापल्या सुशोभित, नूतन वास्तूत प्रवेशाच्या तयारीत धामधुमीत गर्क होऊन जाते.
अंतरीक्षातून नारद हे सर्व बघत आहेत.
"नारायण नारायण "
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment