Skip to main content

मुरली  - २४

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - २४

 
"मी तुझ्या विनंतीचा स्वीकार करतो. मी तुला तुझ्या अत्यन्त प्राणप्रिय व्यक्तीची भेट घडवून देण्याचं वचन देतो. तो कोण आहे आणि कोठे असतो त्याला ओळखण्याची खूण काय ते मला सविस्तर सांग."

राधा यावर महाराजाना सांगते. 

" नारायणदास महाराज त्याच वर्णन करायला शब्द कमी पडतात. त्याच चित्र रेखाटायला रंग आणि कुंचला नाहीये. तो सर्व चराचराच्या पार आणि तरीही सर्वांच्या हृदयाच्या अत्यंत निकट आहे. त्याच यथार्थ वर्णन करताना कदाचित माझी मती कुंठित होते. कदाचित माझी शत शत जन्मांची पुण्याई जरी एका पारड्यात टाकून मागितलं तरीही देवी शारदा आणि बुद्धिदाता गजानन मला त्याच वर्णन करण्यासाठी अल्पमती सुद्धा देऊ शकणार नाहीत. अर्थात हा माझा दोष असेल. 

पण तरीही काही अंधुकस चित्र मी आपल्या अल्प मती व अल्प पुण्याई यांच्या बळावर आपल्या डोळ्यासमोर मांडण्याचा यत्न करते. त्याच्या लोचनात अवघ ब्रह्मांड मला दिसत, त्याच्या चेहऱ्यावर सहस्त्र सूर्याचं तेज, ओज आणि प्रभा आहे, ज्याच्या नेत्रातून येणाऱ्या प्रकाशाने समस्त प्राणीमात्र, जणू हे सारं विश्व मोहून टाकण्याचं सामर्थ्य आहे, ज्याला पाहताक्षणी आता या जड देहाने आणि या मर्त्य लोकात काहीही करायचं शिल्लक राहीलं नाही हे जाणवतं, जो अविजेय आहे, ज्याच्या भव्यतेपुढे उभं राहण्याची विश्वात कोणामध्येही शक्ती नाही, जो विश्वाचा आदी आणि अंत सुद्धा आहे, ज्याच्या मुगुटावर मोरपीस सुशोभित आहे, ज्याच्या फक्त अस्तित्वाने जगताचं अस्तित्व शून्य भासतं. 

जो एका करांगुलीवर गोवर्धन उचलण्याची किमया करू धजावतो, ज्याला या विश्वात काहीही करायचं शिल्लक नसून सुद्धा जो विश्वाचालनासाठी पुनः पुनः या मर्त्यलोकी जन्म घेतो आणि निज कर्तव्याची महती सांगतो आणि कर्म करून दाखवतो, जो एका सादाला प्रतिसाद देऊन त्वरेने धावून येतो, ज्याला महाराज, स्वये तिन्ही देव कदाचित वंदन करत असतील, ज्याच्या फक्त नामाने समस्त पापांचे सागर, प्रमादांचे पर्वत आणि महाचुकांचे अवघड पाट भस्मसात होतात, ज्याला पाहताच, ज्याला मिळवताच  पुढे काहीही मिळवायचं बाकी राहात नाही.  ज्याच्या फक्त एका दर्शनासाठी ही राधा अगणित जन्म उधळू शकते. अश्या कृष्णाचं वर्णन मी बावरी राधा काय करणार.

जो मनोभावे फक्त प्रेम आणि भक्ती यांचीच अपेक्षा करतो. जो विश्वात संचरित असून सुद्धा फक्त भक्तांच्या हृदयात सापडतो. जो इतका दयाळू आहे की, भक्ताला काटा लागला तर वेदना  याच्या हृदयी जाणवते. अश्या योगीराज, योगेश्वर, मनमोहन, गिरीधारी, कृष्ण, कान्हा याच वर्णन मी काय करणार. मी सर्वभावे, यथाशक्ती आणि यथामती फक्त प्रेम आणि भक्ती अर्पण केली. पण त्याबदल्यात त्याने मुरलीचा प्रत्येक सूर , स्वर आणि चरणांशी स्थान दिलं.  याचे ऋण कदाचित कल्पांतीही मी फेडू शकेन अस वाटत नाही. किंबहुना त्याचे हे ऋण जन्मोजन्मी फेडण्यासाठी सहस्त्र जन्म घ्यावे लागले तरीही ते कमीच आहेत. 

नारायणदास महाराज मी कस वर्णन करू त्याच. माझं शब्दसामर्थ्य अत्यन्त अल्प आहे आणि मती फक्त त्याच्या चरणांशी अर्पित, हृदय त्याचच नाम घेतं, ज्याच्यासाठीच मी जगते, अश्या माधवाच वर्णन मी कसं काय करू महाराज"

अस म्हणून राधा प्रेमविव्हळ आणि विरहीघायाळ, अश्रूंसहित 
हात जोडून नारायणदास महाराजांच्या चरणांवर लोळण  घेते.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...