(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ३६
"बर मग " देवी सत्यभामा यांनी विचारलं
नारद म्हणाले
"त्यावर भगवान उद्गारले की, तसच काही नाही , पण आठवण तर येईलच. मग त्यांना सहज पृच्छा केली की , मग तस पुनर्भेटीच वचन आपण दिलंच असेल त्यांना सर्वांना वा कोणालातरी. "
" मग काय म्हणाले यावर मुरलीमनोहर "
" याच गोष्टीवर अचानक रुष्ट झाले आणि म्हणाले की, तस काही वचन कोणाला दिल नाही मी आणि दिल असेलच तरी सध्यातरी त्यावर अंमलबजावणी करता येणं दुरापास्त आहे, नारदा. तद्ववत आपण या बाबत व्यर्थ चिंता करू नये. आपण यावे आता. अस म्हणून जवळ जवळ मला हाकलून दिलं. तरीही मला त्याच विशेष काही वाटत नाही. ते श्रेष्ठ आहेत, काही चिंता, विवंचना असू शकतात जेणेकरून त्यांनी एखाद्या विवषतेचा राग माझ्यावर काढलाही असेल. मला त्याच विशेष नाही. परंतु देवी मला चिंता ही आहे की, देव अश्या कोणत्या काळजीत वा विवंचनेत आहेत, ज्यामुळे त्यांच चित्त थाऱ्यावर नसावं. म्हणून म्हटलं तुमच्याजवळ बोलावं. आपल्याला यदुनाथाची काळजी आणि प्रीती जास्त आहे, असा माझा कयास आहे. तेंव्हा आपण ह्याचा छडा लावाल वा त्याच्या खोलात शिरून ते युक्ती प्रयुक्तीने जाणून घेण्याचा यत्न कराल याबद्दल शाश्वती वाटली म्हणून आलो, इतकंच."
देवर्षी नारदाच्या वक्तव्याने चिंताग्रस्त झालेला देवी सत्यभामा यांचा चेहरा , नारदांच्या विश्वासपूर्ण बोलण्याने सुखावला खरा पण नारदांनी सांगितलेलं श्रीकृष्णांच्या चिंतेचा सकारण खुलासा झाल्याशिवाय मन स्वस्थ बसणार नाही हेही त्यांनी जाणलं. त्या देवर्षीना म्हणाल्या
" देवर्षी आपण ही बाब मजपर्यंत पोहोचवून आपली चिंता व्यक्त केलीत , हे खूप बर केलंत. अन्यथा आम्हाला कळलं सुद्धा नसतं की यदुवीर काही चिंतेत वा काळजीत आहेत."
"ते सर्व ठीक आहे देवी, फक्त एक उपयुक्त सल्ला म्हणून बोलू का "
" हो हो अवश्य बोलावं देवर्षी "
" ही सवंगडयाना दिलेल्या वचनाची शक्यता हा आमचा कयास आहे. पण आपण सर्वांगाने विचार करावा आणि तदपश्चात पृच्छा करावी, तीसुद्धा युक्तिपूर्ण पद्धतीने, हे देवींना सांगणे न लगे. तसच आमचा कुठेही उल्लेख झाला तर महाअनर्थ हाऊ शकेल. कदाचित भगवंत अजूनच रुष्ट होऊन आमचं येणं पण बंद करतील. ( नम्रपणे हात जोडून) त्यामुळे जरा बेतानच ."
" नाही युक्तीनेच करीन हे सर्व आणि आपला नामोल्लेख तर सोडाच पण साधा संशयसुद्धा येणार नाही यादवराजाना, याची पूर्ण काळजी घेऊ आम्ही, निश्चिन्त असा आपण. उलट आम्हीच आपले ऋणी आहोत हे सांगितल्याबद्दल. आपण हे सर्व आमच्यापर्यंत पोहोचवून आम्हास उपकृत केलं आहेत. त्यामुळे आपल्या पर्यंत यदुवीर जाणार सुदधा नाहीत याची खात्री बाळगावी आपण."
" मग हरकत नाही. नृपाधिपतींच्या काळजीपोटी वाटतं, म्हणून आलो आपल्या पर्यंत. काळजी घ्या स्वामींची आणि स्वतःची सुद्धा. येतो आम्ही , आज्ञा असावी, देवी या दासाला."
" यावं आपण, काही गरज लागली तर मी आपली आठवण काढीनचं"
" हो हो. अवश्य अवश्य. आम्हीही दृष्टी ठेवून आहोतच , भगवंतावर , काळजीमुळे. नारायण नारायण "
इतकं बोलून नारद अंतर्धान पावतात. पण तरीही त्यांना खात्री नाही की, देवी हे कार्य लीलया व युक्तिपूर्ण पद्धतीने करू शकतील याची. विवंचना कायमच आहे त्यांच्या मनात. बघूया काही इतर उपाय सुद्धा योजता येतात का. याचं विचारचक्र त्यांच्या डोक्यात फिरत आहे अजूनही. त्याच चिंतेत ते अंतरीक्षातून यावर नजर ठेवण्यासाठी लुप्त होतात.
"नारायण , नारायण.
यदुनाथा व्यर्थ टाकले चिंतेत मजला
तरी हरीविण दुजा कोणी न मजला "
वचन दिले त्वा राधेला हरी
चिंता राहिली तुमच्या हृदयी
राधा विरही जळे एकटी
पाहू शके ना तीज एकाकी
म्हणुनी सांगण्या आलो तुम्हाला
यदुनाथा व्यर्थ ............
देवा सोडवी दोघांनाही
राधे विरही, मज चिंतेतूनी
आस धरली तव भक्तांनी
आपुल्या सोडवी वाचनातुनी
बघ राधा व्याकुळ हरिबाधेला
यदुनाथा व्यर्थ .......
राधा या परमपावन, निर्व्याजी प्रेमाचं सात्विक स्वरूप असलेल्या हरिभक्तासाठी देवर्षीनचा आत्मा तीळ तीळ तुटत होता. अर्थात हरी आणि राधेची अंतर्मनामध्ये काय अवस्था होती हे ही जाणून घेऊया .
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment