(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ४२
" बरोबर आहे आपला कयास"
" त्याच काय"
" त्यांनतर थोडे अस्वस्थ वाटतात श्रीकृष्ण. असा माझा अंदाज आहे. तेंव्हा आपण याचा छडा लावू शकलात तर मी उपकृत होईन. आपला वहिनी म्हणून खूप आदर करतात यदुवीर आणि शब्द पण मानतात आपला."
" बर मी यत्न करून पाहीन पण त्याने काय साध्य होईल असं आपल्याला वाटतं , देवर्षी."
" माझा असा अंदाज आहे की, भगवान राधेला भेटू शकले नसावेत आणि म्हणून आतून खूप कष्टी आहेत. हे माझं सकृतदर्शनी मत आहे. त्याला आपल्या पडताळणीने दुजोराच मिळेल. मग यावर उपाय शोधता येईल."
" श्रीकृष्णाच्या मनात काय आहे याचा थांग कोणालाही लागत नाही. तसा ते लागू देत नाहीत. दीर आहेत म्हणून मी त्यांना जास्त जवळून ओळखते. तरीदेखील आपल्याला त्यांच्या मनात काय गुंता आहे हे कस काय जाणवलं हेही एक आश्चर्य आहे."
" तो तर देवी युगानुयुगे त्यांच्याच भक्तीत तल्लीन असल्यामुळे मला थोडं फार उमगू लागलंय. अन्यथा जगदीश्वर कोणालाही कसलाही थांग लागू देत नाहीत, अगदी आपल्या राण्यांना सुद्धा त्यांचं हृदय कळत नाही. आणि ते कळू देत नाहीत. कृष्णनीती हा एक खूप मोठा पाठ घालून दिलाय आपल्या कृत्यातून माधवानी."
" पण त्यांच्या मनाचा थांग लागतो कसा आणि कुणाला.? याच काही कोष्टक असेल ना. ते तरी कळू द्या आम्हाला."
" देवी हेच एक मोठं गुह्य आहे. वस्तुतः जगाची निर्मिती केली चिदानंदात मन रमेना म्हणून. त्यासाठी सारी सृष्टी ,माया, ब्रम्ह, त्रिकाल यांची निर्मिती केली. स्वतः त्यात अंशारूपाने वावरत असून सुद्धा, त्यात हस्तक्षेप न करता, तटस्थ राहून फक्त खेळ बघत राहिले. माया ब्रम्हाकार केली , तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी सर्वात शेवटी मानवाची निर्मिती करून, त्या ठायी पंचमहाभूताचा देह, त्यात त्रिदोष, शट्रिपु , निर्माण केलं, भास आणि आभास यांचं प्रतिरूप माया मानवाला पुरून उरलेली पाहिली, मग त्यावर उपाय , अष्टसिद्धी, अष्टयोग, वेद पुराण, शास्त्र, यांचा आधार निर्माण केला. तरीही मन रमेना, कारण परम ईश्वरा पासून दूर गेलेला आत्मा पुनःश्च परम ईश्वराप्रत पोहोचणं हे अंतिम ध्येय गाठायचं होत त्या जीवाला. ते मात्र मानवी देहातच शक्य होणार होत, तशीच निर्मिती केली होती. देह आणि आत्मा यांना जोडणारा दुवा म्हणून मन निर्माण केलं. आणि इथेच खरा गुंता सुरू झाला.
मन मायेच्या प्रभावात वाहावत जातं. ते स्थिर असेल, स्थित असेल तर अनेक जन्मीच कार्य, एका जन्मी साध्य होऊ शकतं, कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही कार्यात. त्याला अडवळणाला नेते माया आणि वासनारूप शत्रू. माया मनाला इतकी बेमालूम गुंतवून टाकते की, जीवाला कळत देखील नाही, आपलं इप्सित काय होत आणि आता आपण काय करत आहोत. बर हे सर्व कर्मगतीबद्ध केलं आहे त्यामुळे जे होतय ते प्राणीमात्र स्वतःच्या हाताने ओढवून घेतो, सुख वा दुःख, पाप वा पुण्य, मोक्ष वा जन्म.
"मग भगवंत यात कुठे आणि कसे आले."
" सांगतो. खरा खेळ सुरू झाला मन निर्मिती नन्तर. कारण मनात सर्व विकारांबरोबर, भाव पण आले. ज्यामध्ये प्रेम, भक्ती, मोह, लोभ, आनंद यां मध्ये प्राणीमात्र गुरफटून गेला. पण प्रेम आणि भक्ती ही निष्कलंक आणि निर्व्याज असेल तर तिथे भगवंताला यावेच लागते. तीच भगवंताला भक्तांप्रत घेऊन येणारी एक अलौकिक गोष्ट आहे, हेच चिरंतन सत्य आहे, हेच गुह्य आहे. ज्याला साध्य झाले तो यातून तरला. कारण प्रत्यक्ष परम ईश्वरालासुद्धा , जिथे भक्त आणि भक्ती आहे तिथे यावं लागत."
" पण प्रेम भक्ती म्हणजे नक्की काय जरा विस्तारपूर्वक सांगू शकाल का देवर्षी."
अवश्य देवी."
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment