(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ३१
अतिथीगृहांची वसाहत आणि त्याच्या चहू बाजुंना घनदाट जंगल होतं. त्यामुळे अतिथीगृहातील कोणत्याही घरात उन्हाचा तडाखा जाणवणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. किंबहुना त्या दृष्टीनेच याच बांधकाम मध्यभागी करण्यात आलेल होतं. त्याव्यतिरिक्त अतिथीग्रामात सर्व सुखसुविधा यांची रेलचेल होती. अतिथी हा भगवंताचा अंश असं मानण्याचा तो काळ असल्यामुळे या सर्वांचा विचार करूनच ग्रामाची रचना करण्यात आली होती.
अतिथीग्राम व त्यानंतरच जंगल संपल्यावर विस्तीर्ण भूप्रदेश होता आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणांच जाळ होत. त्यानंतर राज्याचे मंत्रीगण यांची चढत्या क्रमाने बांधलेली व त्यांनंतर सेनापती व सैन्यातील उच्च अधिकारी यांची प्रशस्त घरे, त्याभोवताली उत्तम बागबगीचे त्याच आवारात त्यांच्या सेवक वर्गाची वसाहत अस उत्तम नियोजनबद्ध बांधकाम आणि गृहरचना होती. यात स्थापत्य कला, वास्तुशास्त्र यांचा उत्तम नमुना व संगम होता.
या सर्वांनंतर चारही बाजूनी उत्तम सुरक्षा असलेली उंच, जाड आणि मजबूत अशी भिंत होती. जी भेदण हे अत्यंत दुरापास्त होतं. या गोलाकार भिंतीपालिकडे एका विस्तीर्ण भूप्रदेशावर राजप्रासादाचा परिसर होता. त्याची रचना ही अश्या पद्धतीने केली होती की शत्रूला या प्रसादाचा , आतील संरचनाचा वा अन्य कोणत्याही गोष्टीचा मागमूस देखील लागता कामा नये.
या गोलाकार व मजबूत अश्या भिंतीपालिकडे तेवढाच विशाल व गोलाकार खंदक खणण्यात आला होता. त्यात खास बंधारा बांधून आणलेलं समुद्राचं पाणी सोडण्यात आल होतं. ज्यात अनेक विशालकाय मगरी, सुसरी व इतर जलचर सोडण्यात आले होते. ज्या अत्यंत भीतीदायक व नरभक्षक होत्या. यदाकदाचित इथपर्यंत शत्रुसैन्य पोहोचलेच तर आलेल्या सैन्याला या पुढे येता येणार नाही ही काळजी घेण्यात आली होती. या खंदकावर काही काही ठिकाणी सरकते पूल बांधण्यात आले होते. जे इतर वेळी वर ओढून बंद करण्यात आले होते. फक्त कामाच्या वेळी ते उतरवून पलीकडे जाण्यासाठी रस्ता करण्यात येई.
तद्नंतर राजप्रासाद परिसराच्या काही योजन आधी आणि परिसराच्या चारही बाजूनी उत्तम उत्तम योद्धे असलेल्या सैन्याचा गराडा होता, राजप्रासाद परिसराच्या संपूर्ण सुरक्षेसाठी. यामध्ये सर्वात प्रथम व सर्वात शेवटी अश्वदल होतं. म्हणजेच सुरक्षेच्या प्रथम व शेवटच्या क्रमात यांना स्थान होते. त्याचे कारण जर हल्ला झालाच तर हे सर्वात चपळ गतीने तो परतवण्याच कार्य हे दल चोख पार पाडेल. त्यासाठी यामध्ये उत्तम प्रशिक्षित आणि धाडसी सैनिक होते. त्यांच्या अनेक तुकड्या व गट करण्यात आले होते. त्या त्या गटाचे प्रमुख त्या त्या तुकडीचे नेतृत्व करत होते व त्या गटाबाबत ते जबाबदार असत.
या दोन्ही अश्वदलाच्या मध्ये असलेल्या सैन्यात, मुष्टियुद्ध, गदायुद्ध, द्वंद्वयुद्ध यात प्रवीण असलेले व कसलेले योद्धे होते. ज्यांची निवड व प्रशिक्षण प्रत्यक्ष बलरामदादा यांच्या देखरेखीत केलं जात असे. त्यानंतर उत्तम पायदळ ज्यात अचूक नेमबाज धनुर्धारी व धनुर्विद्येत निष्णात असे योद्धे तैनात होते. अर्थातच यांची निवड स्वये वासुदेव करत असे.
.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment