Skip to main content

मुरली - २६

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - २६

या सर्व घटनाक्रमात राधेला याच गोष्टीचा आनंद आहे कि, देवर्षी नारदांच्या प्रयत्नाने का होईना, पण कान्हाची आणि आपली एकदा भेट होऊ शकेल. अर्थात कधी ते स्वये नारद आणि कृष्ण जाणतात.

नारद हात जोडून तिला नमस्कार करतात आणि म्हणतात

"येतो आम्ही. अवघ्या सृष्टीचा नायक, जो योगेश्वर, यांना शीघ्र भेटून सर्व कथन करून तुझी भेट घेण्याची विनंती मी करीन. कारण मधुसूदन देखील याच अवस्थेत आहेत.  निर्गुण निराकार परब्रम्ह सदेही साकार होत, तेंव्हा त्या तत्वाला सुद्धा मर्त्य लोकाचे नियम लागू होतात. म्हणून मी विनंती करीन की,  जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर, राधेची भेट घ्या. तुझ्या डोळ्यातील आस आणि अश्रू व्यर्थ जाऊ न देणे हेच माझं कर्तव्य असेल. भगवंताचा काय  निरोप आहे आणि आमचं काय बोलणं होतंय ते कथण्यास येईन मी. पण आता अनुमती दे. "

अस म्हणून नारद अंतर्धान पावतात.

राधा हे सर्व अचानक घडलेलं पाहून बसलेल्या धक्क्यातून स्वतःला  सावरून कृष्णाच्या भेटीची आतुरता मनात जागवून पुढील कार्याला लागते.

इकडे सर्व लवाजमा रात्रीच्या मुक्कामाला थांबलेला आहे. भोजन व्यवस्था झाल्यावर स्वतः कृष्ण आणि बलरामदादा आपल्या पत्नीसमवेत भोजनाचा आस्वाद घेत हास्यविनोद करत आहेत. भोजन उरकल्यावर कृष्ण आणि दादा एका डेरेदार वृक्षाचा आसरा घेऊन पुढील व्यवस्था राज्याची पुनर्स्थापना आणि त्याची सुसूत्रता यावर विचार विनिमय करत बसलेत. नारद दुरून सर्व पहात मनमोहनाला एकांतात भेटण्याच्या तयारीत आहेत.

कृष्णाला समजलं आहे की नारदाना आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे. म्हणून तो मुद्दाम दादांना सांगतो की, बहुतेक  रेवती वहिनींना काही बोलायचं आहे आपल्याशी,अस दिसतंय. आपण बघून यावं, तोपर्यंत मी पण जरा इतर व्यवस्था बघतो. अस म्हणून कृष्ण तिथून दूर एका वृक्षाखाली जाऊन उभा रहातो. ते पाहून नारदमुनी तिथे प्रकट होतात.

" नारायण नारायण. देवा आपल्याला बरोबर समजलं की, मला काही बोलायचं आहे आपल्याशी. म्हणूनच आपण दादांना देवींकडे धाडलत. महान आहात आपण."

" काय म्हणताय नारायणदास महाराज.  मी हेच नाही, तर सगळंच जाणतो. हे ध्यानात असुद्याव."

" क्षमस्व परमेश्वरा. काही प्रमाद घडला असेल हातून तर चरणस्पर्श करून क्षमा मागतो आपली. पण काय घडलं ते ही सांगितलंत तर आभारी असेन"

" नारदा आम्ही तुला राधेला काही गोष्टी सांगण्याची अनुमती दिली नव्हती. तरीही तू तिला भेटण्यास गेलासच. का."

" नारायण नारायण. देवा मी वचनभंग केला नाहीये. आपण त्रिकालज्ञानी आहात. आपण, जी महत्वाची गोष्ट आपल्या मुरली आणि स्वरांविषयीची ती सांगण्याची अनुमती दिली नव्हतीत,  ती मी कथिली नाहीये, भगवंता. आपण अनाठायी रुष्ट होऊ नये, आपल्या या दासावर. "

" पण तरीही नारदा तू जे केलंस ते करायला नको होतंस. कारण आता राज्याची घडी पूर्ण बसे पर्यंत मी गोकुळात जाऊन राधेच्या भेटीचा साधा विचार सुद्धा करू शकत नाही आणि आपण तिला वचन देऊन बसलात, की मी श्रीकृष्णाशी भेट घडवून आणीन म्हणून. "

" यात प्रमाद काय पुरुषोत्तम. एका भक्ताला भगवंतापर्यंत पोहोचत करण्याची व्यवस्था करू पाहणं आणि त्याप्रीत्यर्थ तस आश्वासन देणं इतकंच घडलं आमच्या हातून. यात उद्देश एकच की राधेला आपली भेट हवी आहे. ती त्यात व्याकुळ आहे आणि मुरलीचे तीन स्वरसुद्धा गेलेत आणि राधेची भेट नाही म्हणून इकडे आपण व्यथित आहात. हे बघवल नाही आणि देवा म्हणून हे सर्व घडवण्याचा यत्न केला."

"पण यातून काय होईल जाणतोस का. "

"नाही भगवंता"

" राधेला माझ्या भेटीची आस अंधुक होती आणि दूर व दुरापास्त होती. त्यामुळे कदाचित कालौघात ती ते सहज विसरली असती. निदान मनात ती आस खोल गेली असती आणि मनाला त्यातून उभारी मिळाली असती. पण नारदा तू तिची भेट घेऊन तिला वचन देऊन ती आस, ती मनीषा जागी ठेवलीत. आता जोपर्यंत मी भेटत नाही, तो पर्यंत ती त्या विरहाग्नीत जळत राहील. म्हणजेच ती आशा जिवंत राहील सतत आणि त्या चिंतेत मीही इथे धगधगत राहीन. काय केलंत हे नारद.

" क्षमस्व देवा , क्षमस्व. पण अंतिम उद्देश हा भलाच होता भगवंता. "

"नारदा नुसता उद्देश आणि हेतू उदात्त असून उपयोगाचं नसत, प्रत्येक वेळी. तर वेळेचा आणि काळाचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं. प्रत्येक वेळी साध्य हे साधलं जाईल अस शक्य नसतं. म्हणून कधी कधी जे घडतंय त्यानुसार स्वतःच्या मनाला बदलायला शिकलं पाहिजे, ते जमलं पाहिजे.  ते राधेला आणि मला जमवाव लागलं असतच आणि लागेलचं. पण आता दोघेही जळत राहू. ती भेटीसाठी आपण लावलेल्या आशेमुळे आणि मी तिच्या चिंतेत. योग्य नाही केलंस नारदा. आता अजून चिंता वाढवू नका आमची. या आपण."

नारद नमस्कार करून म्हणतात

" नारायण नारायण. जशी आपली आज्ञा."

नारद चिंताग्रस्त आहेत., राधेला दिलेलं वचन आणि भगवंताचा राग या चिंतेत.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...