(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ४४
देवी रेवती विचारतात
"पण भक्त पल्हादासारख्या भक्तांना हे तत्व लागू होत नाही काय ? वा असे जीव जडदेहाच्या नियमा पलीकडे कसे काय असतात ? हे जरा विस्ताराने सांगावे देवर्षी."
" ऐकावे देवी. सांगतो. मुळात मर्त्यलोकीचे सर्व जीव हे कर्मफल शृंखलेत बद्ध आहेत. जो इथे जन्मला, त्याचा देह कधी ना कधी नष्ट होणार. नश्वर आहे इथलं सारं. जीवनाचं हे सार आधी ध्यानात ठेवा. त्यामुळे आत्मा एक देह त्यागून दुसऱ्या देहात प्रवेशण्याचं सूत्र हे त्या आत्म्याच्या कर्मगती नुसार सिद्ध झालेलं असतं. म्हणून या जन्मातील भोगून न झालेलं फल भोगण्यासाठी आत्मा पुनः पुनः याच लोकी येऊन आपले भोग भोगून मगच मोक्षपदी पोहोचतो.
यामध्ये अनेक जन्मांचा समावेश असू शकेल. अस कर्मफल कमी करण्याच महत्वाचं साधन अयोग्य कर्माचा त्याग करून योग्य कर्माच आचरण. हे कैसे व्हावे. यास्तव
ओढ जीवाची लाव शिवाप्रति
तत्व येथे सदा ठेव मनी
कर्मगती तू योग्य कर वा
रत हो सदा तू भक्तिमार्गी
आत्मा भेटो परमात्म्याला
हाच शेवटी असो निश्चय
उद्देश्याप्रत जाण्यासत्व तू
कर्म सुधारी करी भक्तीसंचय
जसे जसे तप भक्तीचे मग
वाढू लागे आत्मा हो उन्नत
एके जन्मी मग त्या कर्माचे
सुटे ग्रहण, जा परामात्म्याप्रत
देवी या सिद्धांता नुसार भक्त प्रल्हाद वा तत्सम भक्त हे एका जन्मी कर्मफल शृंखलेतून मुक्त होतात. म्हणून ज्या जन्मी हे साध्य होतं त्या जन्मी नियतीचे वा प्रकृतीचे नियम त्यांना बद्ध करत नाहीत. नव्हे त्या नियमात ते बद्ध होत नाहीत. कारण तो पर्यंत त्यांच्या भक्तीची तीव्रता वा आंच ही परमेश्वराप्रत पोहोचलेली असते.
असो. देवी या सर्व कथनात मूळ मुद्दा बाजूस राहिलाय. आपण श्रीकृष्णांना ते अंतरी व्यथित असण्याचं कारण विचारण्याचा यत्न कराल हे सांगून मला आश्वस्त केलेत त्याबद्दल आपला कृपाभिलाशी. आता मला आज्ञा द्यावी, इथून प्रस्थानाची."
" यावं आपण. आम्ही देखील आता लगबगीने बाहेर जाऊन तेथील वस्तुस्थिती पाहून तयारीचा अंदाज घेतो. "
नारद विचारात गढून गेलेले आणि या निष्कर्षाप्रत येऊ शकत नाहीत की, दोन्ही राण्या, देवी रेवती व देवी सत्यभामा, आपल्या कामात यशस्वी होऊ शकतील. म्हणून ते अजून एखादी योजना कार्यात आणण्याचा विचार करत आहेत., पण हे करत असतानाच समोरून स्वये मधुसूदन, श्रीकृष्ण येताना दिसतात . देवर्षी स्वतःला सावरतात आणि समोरून येणाऱ्या भगवंतांकडे आश्वासक नजरेनं पाहतात. श्रीकृष्ण स्वतःच्या विचारात मग्न , अर्थातच आयोजित वास्तुशांती व गृहप्रवेश पूजनाच्या तयारी आणि यथोचित संपन्नतेच्या चिंतेत.
नारदानी सर्व धैर्य एकवटून श्रीकृष्णाला नमन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण भयापोटी पुढे न जाता ते जागीच उभे राहिले . श्रीकृष्ण आपल्या महालातून बाहेर पडल्यानंतर देवी सत्यभामेच्या महालात प्रवेश करते झाले आणि नारदांचा चेहरा प्रफुल्लित झाला. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या कारण की, देवी आपलं काम करण्यात यशस्वी होतील. त्याकारणे ते तिथेच वाट पहात उभे आहेत.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment