(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ३८
कृष्णाच्या मनाच्या एका कोपऱ्यात तो सुद्धा राधेच्या भेटीची आस धरून आहे, असणार नक्की. देवर्षी अत्यंत व्यथित अवस्थेत अंतरीक्षातून राधेची भावावस्था पहात असताना कळत नकळत तिच्या भावबंधाशी बांधले जातात. त्यांनाही जगात फक्त विरह आहे असच वाटायला लागतं, इतकं ते राधेच्या विरहाग्नीत ओढले जातात, होरपळून निघतात.
त्या अग्नीचा दाह पार अंतरिक्षात देवर्षीना जाणवलाच नाही तर त्यांना त्याची धग असह्य झाली. यावर काय उपाय करावा या विचारातच ते गोकुळातून द्वारकेला जायला निघतात. वाटेत त्यांची नजर वृंदावनावर जाते. रात्रीच्या चांदण्यात वृंदावनाची शोभा नयनरम्य दिसत होती. नारदमुनी खाली उतरले. त्या अद्भुत अलौकिक वृंदावनीय परिसरात राधा कृष्ण यांच्या मुरली आणि नृत्याचा आविष्कार त्यांना जाणवत होता.
देवर्षी नारद त्या अजरामर दृश्यात जडदेहापालिकडे अंतरात्म्याची अनुभूती पहात होते. कृष्ण हा चिदस्वरूप , चिदानंद, चैतन्यात्मक परामात्मा आणि त्या अविजेय स्वरूपाचं जडदेही असल्यामुळे आत्मा आणि देह यांना जोडणार , यांचा दुवा सांधणार निर्मोही, निष्कलंक नादमय तरीही स्थिर, एकाग्र असलेलं मन म्हणजेच राधा. या अपरापार दृश्यात, त्याच्या अद्भुत परमानंदात परमशांतीची अनुभूती घेत किती प्रहर लोटले देवर्षीना समजलं नाही. हा प्रहर, हा काळ, ही वेळ, ह्या घटिका, त्यातील पळे का संपत आहेत. ह्या अनुभूतीच्या मध्यावर याच क्षणी काळ थांबावा, अनंतापर्यंत. हे दृश्य, हा अनुभव चिरंतन राहावा, सत् चित् स्वरूपात, या मोहमयी, मायावी नश्वर जगताच्या पार याचा अनुभव जिवात्म्याला व्हावा.
जो अनुभव, जी अनुभूती, जे चैतन्य आणि त्याच्या सदेही असण्याची सुंदर अनुभूती, त्याच्या चैतन्यात्मक गाभाऱ्यात त्याच्याच मनाने घेतलेलं राधेच स्वरूप हा निर्मळ, निखळ, अभिनिवेश, भक्तीरसाची ही परमावधी, पंचमहाभूत स्वरूप देहात असलेल्या जिवात्म्यानाच अनुभवता येईल. हे नारदांनी जाणलं आणि जे मुक्त झालेत, मोक्ष स्वरूपाला प्राप्त झालेत ते, हे अलौकिक दृश्य, ही अनुभूती कधीच घेऊ शकणार नाहीत याची त्यांना जाणीव झाली. त्यांचं मन खिन्न झालं. पण या जगतात जिवंत असलेल्या आणि यापुढे येणाऱ्या असंख्य जडदेही मानवानासुद्धा हा असाच अलौकिक अनुभव, अनुभूती, परम आनंद. राधा आणि श्रीकृष्णाच चैतन्यमय स्वरूप, निर्व्याज प्रेमाचं निर्मळ प्रतीक, स्वरूप दिसेल का जाणवेल का? या चिंतेने त्यांना नैराश्य आलं.
जे दृश्य आज मी पाहिलंय ते, मला सुद्धा असंच पुन्हा पुन्हा जेंव्हा केंव्हा मी इथे येईन तेंव्हा तेंव्हा मला सुद्धा अनुभवण्यास मिळेल का ?. मिळायला हवं. त्याचं अलौकिक अनुभवात लुप्त , मग्न झालेले, हरवून गेलेले देवर्षी नारद ते दृश्य लोचनात आणि हृदयात साठवून ठेवत होते. परत परत लोचनातून येणाऱ्या आनंदाश्रूना वाट मोकळी करून देत होते. त्यातच रममाण झाले होते. तिथेच स्तब्ध उभे होते. काळही त्यांना पाहून मुग्ध झाला होता. स्वये हरवला होता.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment