(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ४०
संपूर्ण राज्य एका महा उत्सवाच्या आनंदात आहे. राज प्रासादातील प्रत्येक महालात, प्रत्येक दालनात सजावट करण्यात आली आहे. हरेक सेवक सेविका आपापल्या कार्यात मग्न आहेत. सर्वत्र धावपळ, धांदल, गडबड, लगबग चालू आहे. अनेक जण अनेक प्रकारची काम करत आहेत, तरीही एक काम संपल्यावर दुसरं काम वाट बघत उभच आहे.
या सर्व धावपळीत नारदांची नजर महालाबाहेर पडणाऱ्या सेविकांचा अंदाज घेत आहे आणि त्यांच्या चर्ये व चर्चे वरून नारदांनी ताडलंय की, देवी सत्यभामा यांची तयारी झाली असून, त्या महालातून केंव्हाही बाहेर पडतील. हे जाणल्यानंतर नारद लगबगीने आत जातात आणि देवी सत्यभामा यांच्या जवळ कोणी नाही हे पाहून देवर्षी त्यांच्या समोर प्रकट होतात.
" नारायण नारायण . देवी आजचा दिवस आणि आजच कार्य यासाठी राजप्रासादासह संपूर्ण द्वारका सजून इंद्रपुरीसम भासत आहे. यदुवीरांनी जर एकदा ठरवलं, तर ते काय करू शकतात याच उत्तम उदाहरण यादवराजांनी घालून दिलंय. त्याबद्दल त्यांचे जितके उपकार गोकुळ मथुरा आणि सर्व नगरवासीयांवर आहेत की, ते फेडण्यासाठी शत जन्म घ्यावे लागतील सर्व प्रजाजनाला. हे आपलं माझं मत आहे."
" देवर्षी आपण योग्य तेच कथन करता नेहमी. आपलं बोलणं कधीही अचूक असतं. याचा अनुभव आहे आम्हाला."
" नारायण नारायण. देवी गुणांची पारख करणं हे कोणीही यादवकुळातील, ( देवींचा प्रश्नार्थक चेहरा पाहून पटकन बोलण्याची दिशा बदलून) अर्थातच सर्वात श्रेष्ठ स्नुषा म्हणजेच देवी आपल्याकडून शिकावं. आपण आहात म्हणून दादा , यादवनरेश यांच्यानंतर फक्त आणि फक्त आपल्याकडून माझ्यासारख्या सज्जन आणि सद्गृहस्थाची कदर केली जाते. अन्यथा मला फिरस्त्याला कोण विचारणार. असो. तर आपण काही पृच्छा केलीत का द्वारकाधीश श्रीकृष्णांकडे."
अपेक्षित भाव चेहऱ्यावर दाखवत देवर्षीनी देवींना विचारलं.
"खर सांगायचं तर या कार्याच्या धामधुमीत यादवराज आमच्या वाट्याला कुठले यायला. आधी दादा मग रेवतीदेवी, रुक्मिणीदेवी नन्तर समय असलाच तर आम्ही. तेंव्हा आमच्या वाट्याला आता हा उत्सव संपला की येतील, त्यावेळी नक्की विचारीन. तसा एकदा यत्न करून पाहिला पण एखादी बाब अथवा गोष्ट सांगायची नसेल तर ती शिताफीने टाळणं हे कोणाकडून शिकावं तर ते यदुनाथांकडून."
" नारायण नारायण . क्षमा असल्यास खर बोलू का ?"
"अवश्य बोला"
"यदुवीर एवढ्या सर्व व्यस्त जीवनात आपल्याला ठरवून सुद्धा समय काढू शकत नाहीत असं असावं. हा आमचा कयास आहे."
"माणसाने ठरवलं तर काहीही शक्य आहे. परंतु देवांना काय बोलणार"
"हो तेच तर म्हणत होतो. त्यांनी ठरवलं तर ते करू शकतात. कारण देवांना काय अशक्य आहे. असो. तर समय आणि संधी मिळताच आपण माझं काम कराल हा विश्वास आहे मला. आज्ञा द्या प्रस्थान करतो मी. इतर राण्यांना आणि दादा व श्रीकृष्णांना भेटून घेतो. सोहळा कसा काय होतोय तेही बघावं म्हणतो. नारायण नारायण"
नारद तिथून अंतर्धान पावतात आणि विचार करतात की, जर देवींना हे कार्य जमलंच नाही तर काही पर्यायी व्यवस्था करावी का. त्यासाठी आधी यदुवीर आणि नन्तर देवी रुक्मिणी यांच्या महाली जावं हे उत्तम. आणि विचारासरशी देवर्षी यादवनरेश यांच्या महालापर्यंत पोहोचतात.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment