पाणी
जीवन ज्याला म्हटलं जातं आणि जे खरच तुमचं आमचं समस्त सजीव प्राण्यांचं जीवन आहे ते म्हणजे पाणी, जल, नीर , तोय, उदक, वॉटर, H2O.
तापलेल्या उन्हात तुम्ही घरी आला आहात वा कोणाच्यातरी घरी गेला आहात अथवा एखाद्या क्षुधाशांतिगृहात शिरून बसला आहात आणि समोर पाणी येतं. त्यावेळी सर्वसामान्य पणे आपण ग्लास उचलून ओठाना लावताना नकळत डोळे बंद करतो. करा निरीक्षण. कारण तो जो पहिला थेंब जिभेवर आणि जिभेवरून अन्ननलिकेद्वारे आधी घशात, मग घशातून थेट पोटात जातो, त्या पहिल्या थेंबाचा स्पर्श , आनंद, नाद, जाणीव, फील स्वर्गीय आनंद देतो.
इतका निर्मळ आनंद असतो तो की, त्याची तुलना कोणाशीही वा कशाशीही करता येणार नाही. म्हणून त्याला जीवन म्हणतात. जगण्यात आणि ग्रहण करण्यात एक आनंददायी रस निर्माण करणारं म्हणून जीवन. जगणं का आनंददायी आहे आणि का आनंदात जगावं याची अनुभूती तो पहिला थेंब देतो. त्या क्षणी पाण्याचं मोल कळत देहाला , जाणवतं मनाला आणि अनुभूत होतं आत्म्याला, म्हणून जीवन.
एरव्ही जेंव्हा आपण सर्वसामान्य परिस्थितीत पाणी पितो तेंव्हा त्याचं तितकंसं महत्व जाणवत नाही, कळत आहे, समजत नाही आणि समजलं तरी मान्य होत नाही. म्हणूनही कदाचित जीवनात त्या उष्ण ऋतू सारखे कटू अनुभव व वाईट दिवस येत असतील. जेणेकरून त्यानंतर येणाऱ्या सुखाच्या पावसाळ्यातील पहिल्या थेंबाचा आनंद घेता यावा आणि तो घेताना आधीचा उन्हाळा विसरावा , पण त्याच्या अनुभवाने आलेलं शहाणपण लक्षात ठेवावं आणि पुढे जीवनातील प्रत्येक उन्हाळ्यात तो सुसह्य होईल अशी मानसिकता ठेवून, पुढील पहिल्या थेंबापर्यंत ती टिकवून ठेवावी. हाच धडा तो पहिला थेंब देतो, असा माझा अनुभव आहे, ज्यामुळे मी जगणं एक सुंदर पर्व आहे असं मानतो आणि प्रत्येक क्षण आनंद आणि आल्हाद.
© प्रसंन्नदायक आठवले
२३/०६/२०१८
०८:२७
Comments
Post a Comment