(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ३९
देवर्षी त्या अलौकिक आणि अद्भुत दृश्याने संमोहित झाले. किती काळ ते राधा आणि कृष्ण यांच्या भक्तिमय, नादमय, अवर्णनीय आनंदाचं अवलोकन करत स्तब्ध झाले. इतके भारावले की काही काळ राधेचा विरह आणि त्यात धगधगणारं त्यांचं मन ते विसरून गेले. त्या भौतिकाच्या पार भूतकाळा तील दृश्यात हरवलेले देवर्षी वर्तमानात आले आणि त्यांना जाणवत की ब्राह्ममुहूर्त केंव्हाच टळून गेलाय आणि त्यांच्या प्रातःस्मरणीय मानसपूजेची वेळ झाली आहे. ते जवळच असलेल्या एका महाकाय वृक्षाला बांधलेल्या गोलाकार चौथऱ्यावर, झोळीतून काढलेल्या आसनावर, विराजमान होतात. निमिषार्धात ते दोन्ही डोळे मिटून ध्यान धरून समाधिस्थ होतात, परम ईश्वर आणि त्यांचे आराध्य असलेल्या महाविष्णूच्या नामस्मरणात.
त्यांची ही भावसमाधी आणि मानसपूजा समाप्त झाली आणि त्यांना स्मरण झालं की, ते द्वारकेला निघाले होते आणि वृन्दावनातील या महोत्सवात कधी हरवले त्यांनाही कळलं नाही. त्यांना जाणवलं की, प्रभूच्या मायेत , प्रभू स्वतः जर बद्ध आहेत वा होऊ शकतात तर मग त्याचा काही प्रभाव आपल्यावर होणारच. पूजा आटोपल्यावर ते जगद्नारायणाला वंदन करून उभे राहतात आणि आसन उचलून त्याची व्यवस्थित घडी करून झोळीत पुन्हा ठेवतात. राधेच्या चिंतेत ते द्वाराकेसाठी प्रस्थान ठेवतात.
इकडे प्रातःसमयी सर्व नित्याची आन्हिके उरकून द्वारका आता पुन्हा दिवसभराच्या कार्यात मग्न होईल . तशी सुरवात झालेली आहे. एकदा व्यवहाराला सुरवात झाल्यावर श्रीकृष्णाचं दर्शन सुद्धा दुर्लभ होईल, बोलण्याची गोष्ट नन्तरची, हे जाणून ते लगोलग राजप्रसादाचा दिशेने मार्ग वळवतात. राजप्रासाद देखील आपल्या नित्य नियमानुसार कार्याला सुरवात करतोय. या सर्व दिनक्रमात देवर्षीना चिंता आहे ती कृष्णभेटीची आणि त्याही आधी देवी सत्यभामा यांना भेटण्याची आणि काही प्रगती झाली का हे जाणून घेण्याची.
नारद सावधपणे अदृश्य होऊन देवी सत्यभामेच्या महालाबाहेर स्थिती आणि देवींचा दिनक्रम सुरू झालाय का याचा अंदाज घेत उभे आहेत. इतक्यात एक सेविका बाहेर जाताना स्वतःशीच बोलत गेल्या. ते देवर्षीना ऐकलं आणि त्यांना अंदाज आलाय की देवी आभूषण घालून तयार आहेत. सर्व महालांमध्ये आज गृहप्रवेश , वास्तुशांती व वास्तुपुजा यांची तयारी आणि लगबग चालू आहे. प्रत्येक जण त्याच गडबडीत आहे. प्रत्येकालाच या नवीन राजप्रासादातील पहिल्याच समारंभाचं अप्रूप तर आहेच आणि कौतुक देखील आहे.
ज्याला त्याला त्या विधींची मनोभावे तयारी करून हा धार्मिक समारंभ महा-उत्सव स्वरूपात साजरा करण्याचा मानस आहे. एकूणच त्यानिमित्ताने प्रत्येकाला आनंद मिळवून आणि नवीन जागेत लवकर रुळण्याची घाई झाली आहे. ते खर देखील आहे . कारण हा धार्मिक सोहळा एकूणच सर्वांना या नवीन वास्तूला, नवीन प्रांताला आणि नवीन संस्कृतीला बांधून त्यांची नाळ येथे रुजवण्यास मदत करणार आहे. ते गरजेचं सुद्धा आहे. या सर्व धामधुमीत महालाबाहेर राज्यात सुद्धा, प्रत्येकाला नवीन जागा, त्यातील सुखसोयी , आणलेलं सामानसुमान, नवीन घ्यावं लागणार सामान, त्याची उपलब्धता , या सर्वांची पूर्तता यांचा अंदाज येऊन , संसार स्थिरस्थावर होण्यास मदत होणार आहे. सर्वत्र आनंद आणि उत्साह संचारला आहे. अगदी ब्राम्हमुहूर्ती उठून सडा सारवण, गुढ्या, तोरण , पताका, रांगोळ्या, यांनी घर, परिसर, वस्त्या, वाड्या, अगदी राजप्रासाद सुद्धा सजवून , नटवून झाला आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमातून आलेल्या पुरोहितांनी सर्व तयारी केली आहे. आता प्रतीक्षा फक्त मुख्य विधींची आणि मुहूर्ताची.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment