ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ९० त्यावेळी मी तिला म्हणालो होतो कि, " तुझी हि इच्छा नक्कीच पूर्ण करीन. अगदी उद्यासुद्धा लक्ष्मणाला सांगतो तुला सोडायला , येथून जवळच असलेल्या , वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात. तुझं मन भरेपर्यंत रहा तिथे." अगदी कालच घडलेला हा संवाद आणि गुप्तहेराने सांगितलेल्या वृत्तांत याचा गहन विचार करत प्रभू बसलेले आहेत. एका कठीण पेचात परिस्थितीने प्रभुना आणून सोडलं होत. निश्चितच प्रश्न खूप गहन होता. आजपर्यंत खर, दूषण, कुंभकर्ण , रावण आदी राक्षसांना सहज पराभूत करून काळाच्या गर्तेत यमाच्या पाशात नेऊन सोडलेलेल्या प्रभुना एका विचित्र पेचात पकडलं होत नियतीने. गेली अनेक वर्ष जणू नियतीचा हा खेळ सुरु होता. एखाद्या प्रसंगातून बाहेर पडून थोडं समाधान मिळत नाही तोच नवीन पेच, नवीन समस्या, नवीन प्रश्न समोर आणून उभा करत होती नियती. प्रारब्धाच्या ह्या शृंखला तोडण्यासाठी जणू हा जन्म होता कि काय हे ईश्वर जाणे. अर्थात स्वयं ईश्वरी अंश असल्यामुळे प्रत्येक निर्णयाचे योग्य, अयोग्य, दूरगामी परिणाम बघून निर्णय घेणं हि जणू कसोटीच असे. अर्थात बुद्धिमत्ता...