भोग आणि ईश्वर २३७
क्षेपणास्त्र, यान, अवकाश आणि त्याची कक्षा याबद्दल विचार करून झाल्यानंतर आता आपण आत्मरुप तेजाला या अवकाशात भ्रमंती करण्याच्या तंत्राचा विचार करूया. यानाच्या उड्डाणासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करून, गुरुत्वाकर्षणाच्या कित्येक पटीचं बल वापरून, यान प्रचंड वेग निर्माण करून , त्याला पृथ्वी वरून अवकाशाच्या दिशेने, प्रक्षेपित केलं जातं.
यात ऊर्जा, वेग, बल, यांचा वापर करून, कार्य साधलं जातं. हे तिन्ही घटक किती प्रमाणात व कसे निर्माण करायचे हे, यानाचं वजन, वातावरण आणि ज्या ठिकाणा हून हे यान प्रक्षेपित करायचं आहे, त्याचं भौगोलिक स्थान, यावर अवलंबून आहे. गुरुत्वाकर्षण किती प्रमाणात कार्य करत आहे, त्यावर या तिन्ही घटकांच्या निर्मितीचं कोष्टक अवलंबून आहे.
देह हा त्याच पंचमहाभूतरुप तत्वांचा तयार झालेला आहे. यानाचा उपयोग, पृथ्वीच्या कक्षेबाहेर उपग्रह वा जे अंतरिक्षात पाठवायचं आहे त्याला, कक्षेबाहेर अंतरिक्षात पोचवण्यासाठी आहे वा असतो. म्हणजेच यान हे माध्यम आहे. त्यातून साध्य, तो उपग्रह कक्षेत गेला की, तेच यान नष्ट होऊन जातं, आपोआप.
आता इथे देहाचा उपयोग यानासारखा करण्यासाठी ऊर्जा बल निर्माण करून मनरुप क्षेपणास्त्र वापरून आत्मरुप ग्रह कक्षेबाहेर सोडता येतो. त्यासाठी साधनेची आंच बुद्धी व मन याद्वारे आत्म्यापर्यंत पोचवणं महत्वाचं आहे. याचसाठी योगयाग, अष्टांग साधनं, तप इत्यादी अनेक साधनांसह नवविधा भक्तीतून, शास्त्रीय आधारावर मनाच्या बलावर, आत्म्याला या देहातून मुक्ती मिळवून देण्याचे हे अनेक राजमार्ग पूर्वीच्या ऋषीमुनी रूपातील शास्त्रज्ञांनी आपल्या हातात आणून दिले आहेत.
त्याचा वापर करून, कुंडलिनी जागृती, आत्म्याची जाणीव जागी करून, या देहाचा सदुपयोग करून, जीवाला देहाचा उपयोग करून, या मृत्यूलोकाच्या कक्षे बाहेर घेऊन जाणं, हा खरतर उद्देश विधात्याचा ब्रह्मांड निर्मितीमागे आहे. या प्रक्रियेचा उपयोग नित्य करून, आत्म्याला सुक्ष्मरूपात समस्त ब्रह्मांडात भ्रमण करूनच, ऋषीमुनींनी या सूर्यमालेतील सर्व रहस्ये जाणून, आपल्या साठी मांडली. आज ती सर्व रहस्ये तंतोतंत खरी सिद्ध होत आहेत.
पण या सर्व प्रक्रिया शास्त्रशुद्धपणे पार पाडण्याची शास्त्रं, आजच्या काळात, कितपत उपयोगात आणता येतील ही शंका आहे. किंबहुना ही शंका जाणूनच या योगयाग नवविधा भक्तीतून, काळाच्या सर्व कसोटीवर तावून सुलाखून निघालेलं, एकमेव साधन म्हणजे भक्तीची परमोच्च प्राप्ती करून देणारं भगवंतांचं नाम.
या नामाच्या एकाग्रतेत, बाकीच्या सर्व साधनांची ऊर्जा, शक्ती यांची प्राप्ती होतेच, पण हृदयस्थ आत्मा त्या ऊर्जेने सुक्ष्मरूपात देहातून, देहाबाहेर येण्याच्या योग साधनेतील सिद्धीसुद्धा प्राप्त होतात. इतके उच्च प्रतीचे लाभ प्राप्त करून देणारं हे अमूल्य साधन, फक्त नामाचा जप, तेसुद्धा काही त्रास न होता, न घेता, नित्य घेतलेल्या, या नामाने, अष्टांग योगासह, सर्व लाभ मिळवून देतं.
नामाच्या माध्यमातून अजून काय काय साध्य व सिद्ध होऊ शकतं यावर उद्या पुढे चर्चा करूया. म्हणूनच तोपर्यंत नाम घेत रहा, साध्य साधत रहा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment