Skip to main content

भोग आणि ईश्वर ४४१

भोग आणि ईश्वर  ४४१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

काल आपण पहिलं की, आपल्या मनातील अनिष्ट, अप्रस्तुत व नकारात्मक प्रसंगांचे, कर्माचे,  तरंग बराच काळ मनात ठेवणं, हे मानसिक दुर्बलतेचं लक्षण आहे. कारण त्यामुळे आपणच आपल्या मनाला अजूनच कमकुवत, बलहीन  करतो. पण मुळात असे तरंग मनात दीर्घकाळ राहू देणं, हेच मनावर आपलं, नियंत्रण नसल्याचं लक्षण आहे. 

एक गोष्ट लक्षात ठेवा की, दुर्बल मनाची माणसं, अश्या प्रसंगात, आपल्या घडलेल्या चुकीला झाकण्याचा किंवा त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतात. याऊलट सबल मनाच्या व्यक्ती,आपल्या हातून घडलेली चुक मान्य करून त्याबद्दल कोणताही अहं न बाळगता, आपलं मन मोकळं करतात. 

असं स्वच्छपणे मान्य करायचं धैर्य सबळ, सशक्त आणि सुदृढ मनाच्या व्यक्ती दाखवतात. मानसशास्त्रसुद्धा अश्या व्यक्तींना सशक्त व सकारात्मक व्यक्ती म्हणून मानतो. समाजातसुद्धा अश्या व्यक्तींना वेगळ्याच सन्माननीय नजरेने पाहिलं जातं. याऊलट आपली चूक मान्य न करता त्याचं समर्थन वा त्यावर पांघरूण घालून, लपवू पाहणारी व्यक्ती,मनाने उथळ,दूरदृष्टीचा अभाव असणारी घाबरट मनाची आणि सत्याचा सामना करण्याचं धैर्य नसलेली असते. 

आता या सबलता व दुर्बलता या गुण व अवगुणांवर चिंतन करूया. सबलता किंवा दुर्बलता ही मनाची अवस्था वा स्थिती असून, ती प्रारब्ध, कर्मगती, चिंतन आणि संगतीसह अनेक गोष्टीवर अवलंबून असते. बल हा मनाचा व्यास असतो. म्हणजे जितका व्यास मोठा तितकंच मन सबल किंवा कमी व्यास म्हणजे दुर्बलता. हा व्यास दीर्घ किंवा लघु करण्याचं काम सकारात्मक वा नकारात्मक विचार वा लहरी, अनुक्रमे करतात. 

म्हणजे सकारात्मक विचारतरंग, मनाच्या व्यासाची व्याप्ती वाढवून, मनाला सुदृढ करतात. म्हणूनच मन सतत सकारात्मक, शुद्ध व सात्विक तरंगांनी भरलेलं व भारलेलं राहील, यासाठीच पुराणं काळापासून प्रयत्न केले गेले. धर्माची, कर्माची, विचारांची व या सर्वांतून निर्माण होणाऱ्या तरंगांची आवश्यकता याचसाठी आहे आणि असणार. 

आता असे तरंग, कसे प्राप्त करावेत व त्यासाठी काय गोष्टी, ध्यानात ठेवाव्यात, याचा सर्वांगाने विचार करूया. सर्वात प्रथम आपण नकारात्मक विचाराने भारलेले किंवा तसे विचार बाळगणारे आहोत का, हे जाणण्यासाठी काही गोष्टी, आठवून किंवा ताडून पहाव्यात. आपण  घडून गेलेल्या प्रसंगांना कसे सामोरे गेलो. 

एखाद्याच्या बोलण्यावर आपण कशी, कोणत्या प्रकारे व काय प्रतिक्रिया दिली. ती सकारात्मक होती की नव्हती, एखाद्या दुःखद, उदास व निराशाजनक प्रसंगात आपण कसे वागलो वा वागतो, या गोष्टींवरून आपले आपल्यालाच लक्षात येईल की, आपली मानसिकता कशी आहे आणि आपल्या मनाचा व्यास किती मोठा आहे. तो व्यास किंवा ती व्याप्ती वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे त्याचे दीर्घकालीन लाभ आपल्याला प्राप्त होतील. यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. पण नामाने आपल्या मनाला बांधून ठेवत. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१४/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...