भोग आणि ईश्वर ४४९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनातील इच्छा, आकांक्षा व मनीषा यांना गैर व अवास्तव अनावश्यक व अनियंत्रित आणि योग्य व प्रस्तुत या तीन विभागात मोजण्याआधी त्यांचे निकष काय यांचा विचार करूया गैर म्हणजे आपल्या अस्तित्वासाठी किंवा जगण्याच्या मूलभूत गोष्टीसाठी गरजेच्या नसलेल्या इच्छा.यामध्ये पूर्णपणे काल्पनिक आणि आपल्या स्वतः बद्दलच्या चुकीच्या कल्पनांमुळे आपण स्वःतबद्दल स्वतः कडून किंवा इतरांकडून गैर व अवास्तव अपेक्षा व इच्छा बाळगतो.
ज्या अप्रस्तुत तर असतातच, पण स्वबद्दल गैरसमज करून आपण त्या मनात बाळगलेल्या असतात. उदाहरणार्थ आपल्या पैकी अनेकजण अशी इच्छा बाळगून असतो की, माझं लोकांनी कौतुक करावं, माझी वाहवा करावी आणि मला मान द्यावा अशी किंवा तत्सम सुप्त इच्छा आपण सर्वच, मनात बाळगून असतो. त्या तुलनेत, कमी मिळणारा मान वा अजिबात न मिळणारा मान, मनात नैराश्याचं वातावरण निर्माण करतो. ज्यातून एक प्रकारची खिन्नता येत जाते. स्वतःबद्दल निराश भाव जागृत होऊन, त्यातून आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो.
आपल्याला समजायला लागल्यापासून, ही सुप्त स्वरूपा तील इच्छा, मनात घर करून असते. एक उदाहरण लक्षात घ्या, एखाद्या लहान मुलाला, आपण कौतुकाने बोललेलं व रागाने बोललेलं, सहज उमगतं. याला मी पणाची जाणीव म्हणतात. ही इच्छा अगदी जन्माला आलेल्या बाळापासून ते अगदी शेवटच्या घटका मोजणाऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना असते. ही मीपणाची उपाधी, जन्म होताच जागृत होतो.
सोहमचा कोहम झाला की, ही जाण जागृत होऊन जन्मभर आपला पाठलाग करते. ही स्वतःच्या देह म्हणून असलेल्या अस्तित्वाची जिवंत किंवा अभेद्य ओळख आहे. या भावनेशी निगडित विचार, इच्छा व मनीषा व्यक्ती बाळगतो आणि नैसर्गिकपणे आपण त्या उराशी बाळगून, तो स्व मोठा करून, आयुष्यभर त्या स्वला, वाढवून, वृथा अहंकार जोपासतो. या प्रकारातील, अवास्तव, सुप्त वा जागृत इच्छा नष्ट करणं, सर्वात हितकारक आहे. कारण अहं हा शेवटी विनाशाला आणि वृथा अहं सर्व साधन व तपसामर्थ्य, भस्मसात करायला पुरेसा आहे.
या भावाची बीजं, खूप खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे त्यांना नष्ट करायला तितकाच अजोड उपाय करणं, गरजेचं आहे. हा स्वबद्दलचा अहं, तीव्र स्वरूपाचा असतो. तो अभिमान आणि ततपश्चात दुराभिमान यांना जन्म घालतो. वयाबरोबर आणि कर्तृत्वाबरोबर तो वाढत जाऊन, त्या अहंचा वटवृक्ष होतो. याची मुळी अत्यंत घातक असते आणि ती कधी, कुठे आणि कोणत्या प्रसंगी, डोकं वर काढेल, हे परमेश्वरसुद्धा सांगू शकणार नाही.
हा अहं मोठमोठ्या चुका, प्रमाद व अपराध यांचा जन्मदाता आहे. हा जन्मोजन्मीच्या पुण्याईचा, चांगुल पणाचा, धर्माचा कधी घात करून, सर्व मिळवलेलं पुण्य धुळीला मिळवेल, हे ईश्वराला सुद्धा सांगता येत नाही. म्हणून याला हळूहळू नियंत्रित करून, नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. तसा हा नियंत्रित करता येणं मुश्किल आणि नष्ट करणं, त्याहून दुरापास्त आहे.पण तरीही, याला नियंत्रित करण्याच्या उपायांवर उद्या चिंतन करूया. तोपर्यंत, नामाचं औषध नित्य घेतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment