भोग आणि ईश्वर ४३८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनाला श्वासांच्या तालावर डोलायला लावत, श्वासांना शांत करत करत, एका अश्या ठिकाणी मन व श्वास, एक होतात की, त्यातील आनंद हा अवर्णनीय आहे. एखाद्या शास्त्रीय रागदारी तील संगीताच्या नादावर, गुंग होताना, याचा अनुभव आपल्या पैकी अनेकांनी घेतला असेल. इथे संगीताच्या ऐवजी, आपण आपल्याच, श्वासांचा आवाज व लय यांचा आधार घेत आहोत.
कारण मन अंतर्मुख करण्याच्या प्रयत्नात आपण आतील नादाचा सदुपयोग करून घेतल्यास, मन सहज आतमध्ये डोकावतं किंवा आत नेलं जातं. असच शांतपणे बसलेलं असताना, आपण स्वतःच्या मनातील,मेंदूतील व त्यायोगे देहातील त्याज्य व नकारात्मक गोष्टी काढून टाकत आहोत, अशी कल्पना करावी.
मनाच्या गुणधर्मानुसार, कल्पनेतील अनेक गोष्टी, मन इछा उत्पन्न करून साध्य करू शकतं. अश्याच प्रकारे, शक्य होईल तेंव्हा किंवा निदान आठवड्यात एकदातरी, हा प्रयोग करून बघितल्यास, मनातील अनेक चुकीचे, नकारात्मक व त्याज्य विचार, आठवणी नष्ट झालेल्या आढळतील. गघरातील कचरा, धूळ इत्यादी काढून, घर स्वच्छ केल्यानंतर जो आनंद मिळतो, त्याच आनंदाचा प्रत्यय, आपल्याला अश्या प्रयोगातून मिळेल.
नकारात्मक, अनिष्ट व अप्रस्तुत गोष्टी मनातून काढून टाकायचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे, असे विचार वा त्यांच्या लहरी मनात असतील, तर बाहेरून येणाऱ्या, सकारात्मक, शुद्ध व सात्विक विचार लहरींना आत येण्या पासून मज्जाव होईल किंवा अडथळा निर्माण होईल. ज्याप्रमाणे घरातील खिडक्या व दारं यांच्या समोर किंवा यांच्या मार्गात अडसर किंवा चुकीच्या अंतर्गत सजावटीने निर्माण झालेल्या अडचणी असतील,तर स्वच्छ सूर्य प्रकाश व ताजी हवा आत येण्यात अडचणी निर्माण होतील.
त्यामुळे घरातील दूषित हवा बाहेर पडून, स्वच्छ हवा व प्रकाश आत येऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे मनात जर अनिष्ट, त्याज्य व नकारात्मक विचार असतील,तर त्यांच्या लहरींच्या प्रभावाने, सात्विक, शुद्ध व सकारात्मक लहरी निर्माण होण्यात आणि बाहेरून आत येण्यास मज्जाव केला जातो.ज्याप्रमाणे कुकर्म करणाऱ्या व्यक्ती, आपल्या विभागात, चांगल्या, सत्शील सात्विक व्यक्तींना राहू देत नाहीत, त्याप्रमाणे.
म्हणूनही असे त्याज्य विचार नेहमी ठराविक काळाने मनातून, योग्य प्रकारे काढून टाकलेच पाहिजेत. म्हणजेच देहाप्रमाणे मनाची स्वच्छता हीदेखील नित्याची गरज आहे.या सर्वात महत्वाचा तर्काचा मुद्दा म्हणजे विचारांच्या लहरींचं हे युद्ध विचारांनी लढून, योग्य त्या शत्रूंवर नित्य विजय मिळवणं गरजेचं आहे.
यासाठी अनेकांनी अनेक प्रकारचे प्रयोग, योग सांगितले आहेत. पण यासर्वांमागचं तत्व एकच की, जे त्याज्य आहे, ते नाकारून बाहेर पाठवणे. कारण जसा नको असलेल्या लोकांचा घर, कार्यालय किंवा अन्य ठिकाणी त्रास होतो, त्याप्रमाणे नको असलेले विचार त्रास देऊन, मनाची ऊर्जा व बल अकारण खर्च करतात.
उद्या आपल्या नियंत्रणातील तिसरी गोष्ट म्हणजे कर्म, या माध्यमातून आपण मनाची ऊर्जा व शक्ती कशी सशक्त ठेवू शकतो, यावर चिंतन करूया. तोपर्यंत आपण आपलं नित्य नेमाचं नाम घेत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment